Sudhir.Bhalerao@timesgroup.com
औरंगाबादः एखाद्या क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरी आयुष्याची दिशा बदलण्यास कारणीभूत ठरते, असा अनुभव जालना जिल्ह्यातील शेतमजूर, ऊसतोड कामगारांच्या मुलींना आला आहे. पालकांनी त्यांच्या विवाहाचा घाटही घातला होता, पण खेळाचे मैदान गाजविल्यामुळे पालकांना हा निर्णय बदलावा लागला.
रोहिणी पाष्टे (पिठोरी सिरसगाव), पूजा शिंदे (पाल ठोकून राहते), सोनी काळे (सिद्धेश्वर पिंपळगाव), मनिषा राठोड (पिठोरी पिसरगाव तांडा), दीपाली बर्वे (दह्याळा), दीपाली घाडगे (चुर्मापुरी), अनिता राठोड (गोंदीतांडा), राधा शिंदे, तृप्ती राठोड (गुंडेवाडी), अंजनी गायकवाड (बारसवाडा), सुलभा खरात (पाथरवाला), राधा खरपडे (एकलहेरा), वर्षा शिंदे (नालेवाडी) या ऊसतोड, मोलमजुरी, मातीकाम करणाऱ्या कुटुंबातील मुलींनी क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवला आहे.
त्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन माजी खासदार अंकुशराव टोपे यांनी या मुलींना शाळेत प्रवेश घ्यायला लावला. रोहिणी पाष्टेने चिलीमध्ये झालेल्या 'स्लम सॉकर' आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मराठवाड्याचे प्रतिनिधित्व केले. तिच्या कामगिरीमुळे कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या संघाची चर्चा होऊ लागली.
क्रीडा शिक्षक शेख रफिक अफसर यांनी त्यांना मैदानावर आणले. त्यांच्या क्रीडा प्रशिक्षणाला खो-खोपासून सुरुवात केली. खो-खोतील प्रगती पाहून त्यांनी नंतर कुस्ती, अॅथलेटिक्स, फुटबॉल हे खेळही खेळण्यास सुरुवात केली. प्रारंभी प्रतिस्पर्धी संघांतील मुलींकडील आधुनिक साहित्य, कीट पाहून त्या घाबरत असत. २०१३मध्ये या मुलींना सर्वप्रथम खेळाचे संपूर्ण कीट देण्यात आले. त्यावेळी मुलींनी पहिल्यांदा बूट घालून मैदानावर अफलातून कामगिरी बजावली. मत्स्योदरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर डॉ. भागवत कटारे यांनी या मुलींसाठी निवास व भोजन व्यवस्था मोफत केली. त्यांना आधुनिक कीटही उपलब्ध करून दिले. प्रशांत तौर यांच्या मदतीमुळे या मुलींच्या कामगिरीचा आलेख उंचावत आहे.
राष्ट्रीय पातळीवर ठसा
राधा शिंदे, तृप्ती राठोड यांनी राष्ट्रीय पातळीवर दोन वेळा सुवर्णपदक जिंकले. अंजनी गायकवाड, वर्षा शिंदे, रोहिणी पाष्टे, शीतल प्रभारे यांनीही राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविला. कुस्तीत अनिता राठोड, तृप्ती राठोडने ब्राँझपदक जिंकले आहे. खो-खोमध्ये या संघाने वर्चस्व कायम ठेवले आहे. प्रत्येक वर्षी त्यांचा संघ राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरत आहे.
विवाह टळले...
दहावीचे शिक्षण घेत असतानाच पालकांनी या मुलींची लग्ने ठरवली होती. ऊसतोड कामगारांमध्ये मुलींची लग्ने कमी वयातच होतात. त्यामुळे मुलींची लग्ने पालकांनी ठरवली होती. खेळातील प्रगतीमुळे क्रीडा शिक्षकांनी त्यांच्या पालकांना समजावून सांगितले आणि त्यांनीही मुलींच्या करिअरला मिळालेली दिशा पाहून आपला निर्णय बदलला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट