समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांमधील पोलिसांची भिती नष्ट झाली पाहिजे. त्यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत व कॉलेजमधील तरुणांच्या ज्ञानाचा परिणामकारक वापर व्हावा यासाठी वैजापूर उपविभागात 'मी पण पोलिस' ही संकल्पना राबवण्यात येणार येईल, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी हर्ष पोतदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समाजातील गुन्हे रोखणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. पण त्यासोबतच पोलिस व सर्वसामान्य नागरिकांमध्ये मैत्रीचे संबंध असणे गरजेचे आहे. जपान व जर्मनीसारख्या देशात गुन्हे रोखण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग अर्थात सामाजिक पोलिस ही संकल्पना राबवण्यात येते. विशेष पोलिस महासंचालक विश्वास नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहरातही या संकल्पनेचा वापर करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर वैजापूर उपविभागात अभियांत्रिकी व लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामाबाबत दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मोकाट जनावरांमुळे शहराच्या स्वच्छतेत बाधा येत असून यापुढे नगर परिषदेच्या सहकार्याने या जनावरांच्या मालकांविरुद्ध मुंबई पोलिस कायद्यानुसार कारवाई
करण्यात येईल. अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी पोलिस निरीक्षक बापुसाहेब महाजन यांनीही यापूर्वी राबवण्यात आलेल्या पोलिस मित्र या संकल्पनेची माहिती दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट