जिल्हा प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात शुक्रवारी मोंढ्यातील एका दुकानातून १२६ क्विंटल तूर डाळ जप्त करण्यात आली. त्याचबरोबर जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यात ६३ क्विंटल डाळ जप्त करण्यात आली.
यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांनी सांगितले की, जुना मोंढा येथील संजयकुमार ग्यानचंद पाटणी यांच्या दुकानावर टाकलेल्या छाप्यात सुमारे १२६.८० क्विंटल डाळीचा साठा जप्त केला. त्यांनी या साठवणुकीसाठी कुठलाही परवाना सादर केला नव्हता. याशिवाय साठवणुकीमागे कुठलेही कारण ते देऊ शकले नाहीत. यामुळे त्यांचे दुकान सील करण्यात आले आहे. गेल्या ३ दिवसांत १०६ ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. या पुढील कारवाईसाठी महापालिका आणि पोलिस यंत्रणेचे सहकार्य घेण्यात येत आहे.
औरंगाबाद शहरात ५ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. फुलंब्रीत २, कन्नड २, पैठण २, वैजापूर २, गंगापूर २ अशा एकूण १२ पथकांनी जिल्ह्यात छापे टाकले. जिल्ह्यात २६ ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. यात तूर १५.९२ क्विंटल, मूग २६.६४, हरभरा १०.९७, उडीद ११.४० क्विंटल डाळ जप्त करण्यात आली. एकट्या शहरातून १२६ क्विंटल साठा जप्त करण्यात आला आहे. दुकानदार संजयकुमार पाटणी यांच्या दुकानास सील करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरा दुकानदारांना परवाना देण्याचे काम सुरू असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट