म. टा. प्रतिनिधी, जालना
जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. पॅनेल पद्धतीने लढविण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुकीतील विजयामध्ये राजकीय पक्षांचे स्थान फारसे स्पष्ट होत नसले, तरीही बहुतांश ग्रामपंचायतींवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यातील ६५० ग्रामपंचायतीसाठी एक नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. गावातील विकासकामाच्या नाड्या हाती येणार असल्यामुळे, चुरशीने प्रचार झाला आणि तेवढ्याच स्पर्धात्मकरित्या मतदानही झाल्याचे दिसून येत होते. गावस्तरावरील प्रश्नांबरोबरच नव्या सत्तेवर आलेल्या राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या कारभाराचा मुद्दाही प्रचारात होता. या निकालातून, ग्रामीण जनतेने भाजप सरकारच्या कारभारावर समाधान व्यक्त केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. तर, ग्रामीण भागामध्ये भाजपची जादू चालली नाही, असा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. निकाल जाहीर झाल्यानंतर, सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची कार्यालये विजयानंतर गुलालाने माखलेल्या विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी भरलेली दिसत होती.
प्रतिष्ठेच्या जामवाडीमध्ये भाऊसाहेब वाढेकर व प्रशांत वाढेकर यांच्या पॅनेलने ९ पैकी ७ जागांवर विजय मिळविला. तर, दहीफळ काळे येथील सर्व सातही जागा जिंकत काँग्रेस समर्थकांनी एकहाती वर्चस्व मिळविल्याचा दावा करण्यात आला. आंतरवालामध्येही ९ पैकी ८ जागा जिंकून, काँग्रेसच्या पॅनेलने एकहाती सत्ता मिळविली. धारकल्याण, पारेगाव, जैतापूर, कुंभेफळ, वडगाव, जळगाव, सारवाडी, पिरकल्याण या गावांमध्येही विजयाचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तर, भोकरदन, जाफराबाद, अंबड, बदनापूर या तालुक्यांमध्ये भाजपच्या पॅनेलना सर्वाधिक जागा मिळाल्या असून, भाजपचे वर्चस्व यातून दिसत असल्याचा दावा पक्षाकडून म्हटले आहे. घनसावंगी, जालना आणि अंबड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर गुलालाची उधळण करतानाच, मोबाइल फोटो काढण्याचा ट्रेंडही जोरात होता. त्यामुळे व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मीडियावर या फोटोंचा आणि विजयाच्या घोषणांचा धुमाकुळ सुरू झाला होता.
'कामांना पावती'
जिल्ह्यामध्ये सर्वत्रच भाजपच्या कामांना मतदारांनी प्रतिसाद दिला असून, बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपचीच सत्ता आली आहे, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यांच्या कार्यालयामध्ये विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
'दुष्काळी कामांना पसंती'
जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी परतूर आणि मंठा तालुक्यामध्ये भाजपचे वर्चस्व दिसून आल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील दुष्काळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, सरकार म्हणून ठामपणे कामे करून घेतली. त्यामुळे मतदारांनी भाजपला पसंती दिल्याचे म्हटले आहे.
'भाजपविरोधात रोष'
सत्तेवर आलेल्या भाजपच्या नेत्यांनी वर्षभरात विकासाची कामे करण्याऐवजी पोकळ गप्पाच मारल्या. त्यामुळे ग्रामीण मतदारांनी रोष मतपेटीतून व्यक्त करत, सत्ताधाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे,' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे.
'राष्ट्रवादीचा विजय'
घनसावंगी, जालना आणि अंबड तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण केल्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. घनसावंगीतील ४३, जालन्यातील १८ आणि अंबडमधील २४ ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'जालन्यावर भगवा'
जालना विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे एकतर्फी वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. या मतदारसंघातील ४० पैकी २८ ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय मिळवत, त्यांवर भगवा फडकला आहे, असे प्रतिपादन आमदार अर्जुन खोतकर यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट