लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या मैदानावर आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी लातुरात सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढला.
भाईकट्टी यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील अभय साळुंके, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, पोलिस यांचे फोन कॉलची तपासणी करून त्यांना त्वरीत अटक करावी आणि मोक्का कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सर्व पक्षांच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.
भाईकट्टी यांच्या संपूर्ण परिवाराला पोलिस संरक्षण द्यावे, भाईकट्टी यांनी शाहू कॉलेजच्या बेकायदा इमारती संदर्भात केलेली मागणी शासनाने पूर्ण करावी, आरटीआयखाली काम करणाऱ्या राज्यातील नागरिक कार्यकर्त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेऊन पारदर्शक, गतिमान प्रशासनाची चुणूक दाखवावी, भाईकट्टी यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्यांना व आव्हान स्वीकारणाऱ्यांना तात्काळ अटक करून शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करावी आदी मागण्या करण्यात आल्या. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. पानसरे यांच्या मारेकरी पुराव्याअभावी सापडत नाहीत, याचा निषेध ही करण्यात आला.
डॉ. आंबेडकर पार्कवरून निघालेल्या मोर्चाच्यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाने तोंडाला काळ्यापट्टया बांधल्या होत्या. या मोर्चाला विरोध करणारे पत्रक छावा आणि अन्य संघटनांनी काढल्यामुळे मोर्चा निघणार किंवा नाही याची मोठी उत्सुकता शहरात होती. परंतु, निर्भयपणे, शिवसेना आणि मनसे वगळता सर्वपक्षाचे नेते रस्त्यावर उतरले होते. मोर्चात शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, ओबीसी महिला काँग्रेसच्या पुनम शहाणे, सभागृह नेते नरेंद्र अग्रवाल, नगरसेवक राहुल माकणीकर, प्रशांत पाटील, अशोक गोविंदपूरकर, अॅड. भारत साबदे, अॅड. प्रदिप मोरे, चंद्रकांत चिकटे, प्रा. व्यकंट कीर्तने, मुप्टाचे प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, सिद्धेश्वर लटपटे, अॅड. आर. झेड. हाश्मी, अॅड. संतोष गिल्डा, बसवंतअप्पा उबाळे, उमाकांत पंचाक्षरी, इराण्णा पावले, शैलेश भुजबळ, विश्वनाथ खोबरे, प्रा. सुधीर देशमुख, बाळ होळीकर, प्रीती गुर्जर, हमीदखान पठाण, बरकत काझी, अॅड. अतिश चिकटे, जीवन कांबळे, विनोद खांडके, बसवंत भरडे, बाबुअप्पा सोलापूरे, सुभाष लवटे यांचा सहभाग होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट