म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
'गेल्या चार वर्षांपासून पाऊस नाही, पाणी नाही. पेरण्यांवर केलेला खर्च वाया जातोय. आमच्या डोक्यावर अडचणींचा मोठा डोंगर आहे साहेब... सरकारनं काहीही दिलं नाही. आता तुम्हीच सांगा आम्ही जगायचं कसं..,' अशा व्यथा केंद्र सरकारच्या दुष्काळ पाहणी पथकासमोर शेतकऱ्यांनी शुक्रवारी व्यथा मांडल्या.
कापसावर लाल्या रोग पडला, पाते गळाले, वाढ खुंटली, तुरीला आळ्या लागल्या. सरकारने अद्याप आम्हाला काहीही दिलेले नाही, जनावरांनाचारा नाही, गेल्या चार वर्षंपासून अशीच स्थिती आहे, असेही आडूळ, एकतुनी व पाचोड येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आडूळ, एकतुनी व पाचोड या गावांच्या शिवारात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पथकात केंद्रीय कृषी आयुक्त डॉ. एस. के. मल्होत्रा, केंद्रीय कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग, केंद्रीय पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. एच. आर. खन्ना, राज्याचे अप्पर मुख्य सचिव (कृषी) डी. के. जैन, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांची उपस्थिती होती.
औरंगाबाद येथून सकाळी साडेआठच्या सुमारास दौऱ्याला सुरुवात झाली. बीडकडे पथक जात असताना पथक अचानक आडूळ शिवारात जनार्धन भावले यांच्या शेतात गेले. यावेळी त्यांचे भाऊ एकनाथ भावले यांच्यासोबत श्री. मल्होत्रा व श्री. जैन यांनी संवाद साधला. यावेळी भावले यांनी पथकासमोर अडचणींचा पाढाच वाचला. 'पावसाने सतत दिलेल्या धोक्यामुळे पाणी नाही. सध्या अनेक अडचणींना तोड देत आहोत. यामुळे उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षाही उत्पादन कमी आहे. एका एकरामध्ये १५ क्विंटल कापूस काढतो, मात्र आता उत्पादन घटून ६ क्विंटलवर आले आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षाही परिस्थिती बिकट असल्याचे आहे. कापूस, तुरीवर रोग पडल्याने पाते गळाले आहेत.'
त्यानंतर पथकाने एकतुनी गावच्या शिवारात बाबुराव चव्हाण यांच्या शेतातील मोसंबीच्या बागेला भेट दिली. जळालेले आणि सुकलेले मोसंबीची झाडे पाहून दुष्काळाची तीव्रता पथकाच्या लक्षात आली. मल्होत्रा यांनी बाबुराव चव्हाण यांच्यासोबत संवाद साधला. 'अडीच एकरात ४४० मोसंबीची झाडे लावली, मात्र पाऊस नसल्याने बाग जळून चालली आहे. पाणी नसल्याने उत्पन्न नाही. लाखो रुपये खर्च केले. येत्या १५ दिवसात बागेला पाणी नाही मिळाले तर सर्व काही संपून जाईल. २०१२ला बोअर घेतला, मात्र आता त्यालाही पाणी नाही. जनावरांसाठी कारखान्यांवरून चारा आणावा लागतो, ५ हजार रुपये खर्च करून ४५ किलोमीटरवरून टँकर आणावे लागते. आमच्या गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे द्यावे. शासनाकडून मदम मिळावी व कर्जमाफी करावी,' अशी मागणी चव्हाण यांनी केली.
पथक बीडकडे निघाले यावेळी त्यांनी पाचोड येथील एका शेताला भेट दिली. तेथे मंदाबाई धारकर यांच्याशी पथकाने चर्चा केली. कापूस आणि तुरीला पाणी मिळाले नाही. जूनमध्ये साडेतीन एकरामध्ये कापसाच्या २५ बॅग लावल्या, यातून फक्त दीड क्विंटल कापूस निघाला. चांगला पाऊस असेल तर एका एकरामध्ये ८ क्विंटल कापसाचे उत्पादन होते. गेल्या तीन-चार वर्षांपासून पाऊस नसल्यामुळे अनेक अडचणींना ससमोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी तूर किमान ५ क्विंटल तरी निघाली होती. यंदा शेंगाही लागल्या नाहीत. दुष्काळाने आमचे वाटोळे केले, असे त्यांनी सांगितले.
पुढे पथक पाचोड गावाजवळच्या शिवरातील मनोज नरवडे व रणवीर नरवडे यांच्या शेतात गेले. तेथील फळबागांची पाहणी केली. मोसंबी आणि आंब्याची बाग जळून गेल्या तर, चिकुची बाग सुकत असल्याचे निदर्शनास आले. शेतातील ९५ फूट खोल विहीर कोरडीठाक पडली असल्याचेही पथकाने पाहिले. विहिरी जवळच तयार करण्यात आलेले शेततळेही कोरडे पडले आहे. फळबाग उत्पादक असलेले नरवडे हे परदेशातही आंबा व इतर फळांची निर्यात करत असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी पथकातील अधिकाऱ्यांना दिली.
........
दौऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना कृषी आयुक्त मल्होत्रा यांनी शेतकऱ्यांशी अत्यंत बारकाईने चौकशी केली. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाचा शेतीसाठी किती उपयोग झाला, शेतामध्ये कोणते वाण लावले, पाऊस असताना व नसताना उत्पादन किती झाले, शासनाच्या विविध योजना तुमच्यापर्यंत पोचल्या काय, सुखी व समाधानी आयुष्य जगण्यासाठी काय करावे लागेल, यासह अनेक प्रश्न विचारले.
........
तूर, कापूस, मोसंबी या पिकांची पाहणी केल्यानंतर पथकाने पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांचे मामा नरवडे यांच्या मामाची पाचोड येथे असलेली फळबाग पाहिली. आंबा, मोसंबी, चिकू अादी फळांचे उत्पादन घेणारे नरवडे यांच्याशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. 'एकेकाळी अमेरिका, जपान या देशांमध्ये फळे पाठवत होतो, मात्र गेल्या दोन वर्षांपासून निर्यात होत नसून दुष्काळामुळे जीवन जगणे अवघड झाले अाहे,' असे नरवडे यांनी पथकाला सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट