दूषित पाण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही ही समस्या सुटली नाही. दूषित पाणी धार्मिक स्थळापर्यंत पोचल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ते पाणी घेऊन महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे कार्यालय गाठले व तक्रारींची पाढा वाचला. केंद्रेकर यांनी तात्कळ दखल घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून दोन दिवसांत प्रश्न सोडवा असे आदेश दिले.
नवाबपुरा वॉर्डात गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. पिण्याचे पाणी व ड्रेनेजचे पाणी याची सरमिसळ होत असल्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे, अशा तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या होत्या. नगरसेवक फिरोज खान यांच्याकडेही तशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. फिरोज खान यांनी नागरिकांच्यावतीने अधिकाऱ्यांकडे तक्रारी मांडल्या, पण त्याची दखल घेण्यात आली नव्हती. शनिवारी केंद्रेकर यांनी नवाबपुरा भागाची पाहणी केली. त्यावेळीही नागरिकांनी दूषित पाण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे मांडला. हा प्रश्न सोडवा व नागरिकांना दिलासा द्या, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मात्र, दोन दिवसांत त्यावर काहीच कारवाई झाली नाही. अखेर आज नागरिकांनी नगरसेवकाच्या नेतृत्वाखाली महापालिकेत येऊन केंद्रेकर यांची भेट घेतली. केंद्रेकर यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे व कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना बोलावून घेतले. नवाबपुरा भागातील दूषित पाण्याची समस्या येत्या दोन दिवसांत सोडवा, तातडीने नवाबपुरा भागाला भेट देऊन त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश दिले.
कारवाई नाही
महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच सुनील केंद्रेकरांनी सगळ्या विभागांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यांनी शनिवारी नवाबपुरा भागाची पाहणी केली होती. या वेळीही नागरिकांनी दूषित पाण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे मांडला. हा प्रश्न तत्काळ सोडवा अशी मागणी केली. तेव्हा केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले. मात्र, त्यावर काहीच कारवाई झाली नाही.
नवाबपुऱ्यात दूषित पाणीपुरवठा.
नागरिक आयुक्तांकडे.
दोन दिवसांत पाणीप्रश्न सोडवा.
पाहणी करून अहवाल द्या.
केंद्रेकरांचे अधिकाऱ्यांना आदेश.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट