छावणीच्या सीईओंची संरक्षणंत्र्यांकडे तक्रार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सचोटी, निस्पृहता, प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी आम्हाला नकोच आहेत. आम्ही केलेली अतिक्रमणे, बेकायदा काम त्यांनी त्यांनी खपवून घ्यावे. तरच तो अधिकारी चांगला, असा समज सध्या राजकारणात रूढ होताना दिसतोय. त्यामुळेच नियमावर बोट ठेऊन काम केले, अनधिकृत बांधकाम पाडले, पथकर रद्द करताना कोणालाही विचारले नाही म्हणून छावणीच्या सीईओ पूजा पलिचा यांची उपाध्यक्ष किशोर कच्छवाह यांनी थेट संरक्षणंत्र्यांकडे तक्रार केली.
पलिचा यांचा कारभार हुकुमशाही आहे. त्या विकास कामांत अडथळे निर्माण करतात. नगरसेवकांना अर्वाच्च भाषेत बोलून विकास निधी थांबवतात, असा आरोप तीन पानी तक्रार निवेदनात केला आहे. त्यात १० हून अधिक मुद्दे मांडले आहेत. निवेदनावर किशोर कच्छवाह, संजय गारोल, प्रशांत तारगे, पद्मश्री जैस्वाल, शेख हानिफ, शेख राफत बेग, प्रतिभा काकस या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संरक्षणमंत्र्यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 'पलिचा यांनी चार्ज घेतल्यापासून छावणीचा विकास खुंटला आहे. त्यांना औरंगाबादहून बदली करून घ्यायची असल्यामुळे त्यांचे छावणीकडे लक्ष नाही. चार्ज घेण्यापूर्वी परिषदेच्या बैठकीत मंजूर झालेल्या विविध वर्क ऑर्डर इश्यू करण्यासाठी त्या टाळटाळ करतात. नगरसेवकांची कामे करण्यास टाळटाळ करतात. त्यांच्या कामामुळे पथकर वसूल केला जात नाही. यामुळे ४० लाखांचे नुकसान झाले. पथकरासंबंधी टेंडरच्या अनुषंगाने कायदेशीर बाबींचे उल्लंघन पलिचा यांनी केले आहे.'
बांधकाम पाडल्यामुळे तक्रार : २९ व ३० नोव्हेंबर रोजी पूजा पलिचा यांनी छावणीतील बेकायदे बांधकामे पाडली. यामध्ये वडा पाव सेंटर, मिश्री मेडिकल, सागर दरक मोबाइल स्टोअर यांचा समावेश होता. छावणीचे उपाध्यक्ष किशोर कच्छवाह यांच्या राजस्थान स्वीट मार्ट आणि हॉटेल सुभाष टी यांचा शेड, जिना काढला. या कारवाईचा राग मनात धरून किशोर कच्छवाह यांनी संरक्षमंत्र्यांकडे तक्रार केल्याचे मानले जाते.
पूजा पलिचा नगरसेवकांविरोधात आहेत. त्यांच्या हुकुमशाही कारभारामुळेच छावणीचा विकास खुंटला आहे. संरक्षणमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी, यासाठी आम्ही त्यांना दिल्लीत भेटून निवेदन दिले आहे.
- किशोर कच्छवाह, उपाध्यक्ष, छावणी बोर्ड
मी सध्या दोन-चार दिवसांपासून बाहेरगावी आहे. संरक्षणमंत्र्यांना त्यांनी भेटून सीईओंविरोधात तक्रार केली आहे का, याची मी आल्यावर चौकशी करतो. सध्या या विषयावर काहीही बोलू शकत नाही.
- ब्रिगेडिअर मनोज कुमार, अध्यक्ष, छावणी बोर्ड
उपाध्यक्ष, नगरसेवकांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. बोर्ड मिटींगमध्ये जे ठरते त्याची अंमलबजावणी करते. छावणीतील विकास कामांना चालना देते. कर्मचारी वर्गाशी माझा चांगला संबंध आहे. आता उपाध्यक्ष, नगरसेवक माझ्या विरोधात का, हे कळत नाही. नियम, सूचना, कायदे, विकास निर्णयांची कडक अंमलबजावणी करणे चुकीचे असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही. या सर्व बाबी मी अध्यक्ष ब्रिगेडिअर मनोज कुमार यांना सांगितल्या आहेत. - पूजा पलिचा, सीईओ, छावणी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट