महापालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही मोहीम उघडली आहे. या मोहिमेत काढून टाकलेले अतिक्रणातील टपऱ्या या मुख्य रस्त्यालगतच्या शेजारच्या रस्त्यावर, गल्लीमध्येच ठाण मांडत आहेत. त्यामुळे हे अतिक्रमण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केले जात असल्याचा प्रकार घडत आहे. त्याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
२ डिसेंबरपासून पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी अतिक्रमण हटाव पथकाने शिवाजी चौक ते एक नंबर पाटीपर्यंतच्या मुख्य रस्ता व फुटपाथवरील भाजीचे, फळाचे दुकाने हटवले. शिवाजी चौक ते दयानंद महाविद्यालय गेट या मार्गावर भटक्या विमुक्त जमातीतील लोहार काम करणाऱ्यांचे पाल ही उद्धवस्त करण्यात आले. बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या इनोव्हा, स्कार्पिओसारख्या गाड्या ज्यांचे वर्षानुवर्षाचे अतिक्रमण काढण्यात आले. परंतु, या बेकायदा गाड्यांचा ताफा सायंकाळनंतर पुन्हा त्याच जागी येऊन उभे राहिलेला दिसून येतो. सायंकाळी ज्या फळ विक्रेत्यांना फुटपाथवरुन हटवले ते चक्क मुख्य रस्त्यावर येऊन उभे राहत आहेत. काही टपरीधारकानी त्यांच्या टपऱ्या कैलासनगर भागातील उषाकिरण पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस लावल्या आहेत.
दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातीलच परंतु, शिवाजी चौकाकडे येणाऱ्या मार्गावरील रस्त्यावरील अतिक्रमणाला महापालिका पथकाने धक्का लावलेला नाही. त्याबद्दल या परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजस्थान विद्यालय ते देशीकेंद्र विद्यालय या मार्गावर दोन्ही बाजूला बेकायदेशीर वाहतूक करणारी वाहने उभी असतात. या वाहनांना अजूनही हटविण्यात आले नाही.
अतिक्रमण प्रतिबंधक विभागासाठीचे उपायुक्त डॉ. प्रदिप ठेंगल म्हणाले, शहरातील सर्वच अतिक्रमणे काढली जाणार आहेत. त्यात भाजीवाले किंवा गाडीवाले असा भेद केला जाणार नाही, तसेच काढलेली अतिक्रमणे ही इतरत्र पुन्हा उभी केली जात असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. अडथळा आणल्याप्रकरणी अंगद सूर्यवंशी आणि त्याच्या तीन साथीदाराविरुद्ध गुन्हा नोंदवला असल्याचे डॉ. ठेंगल यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट