पाणीपुरवठा, आरोग्य, शालेय पोषण आहारावरून प्रशासन धारेवर
सुरेश कुलकर्णी, जालना
दुष्काळ असतानाही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून नाकारलेला निधी, त्यातून प्रलंबित पडलेल्या पाणीपुरवठा योजना यांसह शालेय पोषण आहार आणि ग्रामीण आरोग्य केंद्र यांमुळे जालन्याच्या जिल्हा परिषदेमध्ये मंगळवारी घमासान दिसून आले. जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी या कारभाराचे वाभाडे काढताना, अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे अत्यंत आक्रमक झालेले सदस्य आणि पडती भूमिका घेणारे अधिकारी अशा अवस्थेमध्ये सुमारे पाच तास जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चालली.
जालना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला मंगळवारी दुपारी सुरुवात झाली. जिल्हा परिषदेतील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, सभापती शहाजी राक्षे, ए. जे. बोराडे, कृषी सभापती लीलाबाई लोखंडे, संगीता कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपमुख्याधिकारी मुकिम देशमुख यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चर्चेसाठी समोर आला. अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याच्या योजना अडकून पडल्या आहेत. त्यातच एका अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून, निधी नाकारल्याचे वास्तव सभागृहासमोर आले आणि घमासान चर्चेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे, भाजपचे राहुल लोणीकर आणि शिवसेनेचे बाप्पासाहेब गोल्डे यांनी राजकीय बंधने झुगारून पदाधिकाऱ्यांना चांगलेच अडचणीत आणले. जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष आहे.
सभेच्या प्रारंभीच राष्ट्रवादीचे सदस्य सतीष टोपे म्हणाले, 'राष्ट्रीय पेयजल योजनेमधील १० कोटी रुपये ग्रामपंचायतींना देणे बाकी आहेत. जिल्ह्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुन्या योजना दुरूस्तीची कामे ठप्प झाली आहेत. बिले का देत नाहीत? निधी का आणत नाहीत? नवीन कामे तर बंद आहेत, परंतु जुन्या कामाची दुरूस्ती बंद करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्र्यांकडे जाण्याची काही अडचण आहे का? आपल्याला काही पक्षाची अथवा गटातटाची अडचण तर येत नाही ना? तशी अडचण असेल तर आम्ही ही मागणी करू शकतो.'
उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर म्हणाले, 'राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी लागणाऱ्या निधीचा मागणी अहवाल नियोजन मंडळाकडे पाठविला आहे. तो निधी प्राप्त झाल्यावर संपूर्ण बिले आदा करण्यात येणार आहेत.' राहुल लोणीकर म्हणाले, 'मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना येत्या मार्चपासून सुरू होणार असून, यामध्ये नवीन पाणीपुरवठा योजना व जुन्या पाणीपुरवठ्याची देखभाल करण्यात येणार आहे. मात्र तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या माहिती अहवालात ५० टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडे शिल्लक आहे. इतर कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी केली होती.' ही बाब सभागृहासमोर येताच जोरदार गोंधळ उडाला. आता हा अहवाल कसा काय गेला, कोणत्याही पदाधिकाऱ्यांना ठाऊकच पडले नाही, ही आणखी एक बाब लक्षात आली. दोन्ही अधिकारी बदलून गेले आहेत, आपण सगळे मिळून पालकमंत्र्यांना लवकरच साकडे घालून प्रश्न मिटवू, असे सांगत खोतकरांनी सर्वांनाच अटोपते घेण्याची विनंती केली.
पोषण आहारातही गोंधळ
शालेय पोषण आहारात बालकांना दिला जाणारा आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून, त्यामध्ये आळ्या व किडे असल्याचे शिवसेना सदस्य बप्पासाहेब गोल्डे यांनी सभेत मांडले आणि पुन्हा एकदा वातावरण पेटले. 'अंबड तालुक्यातील लेंभेवाडी येथे एका बचत गटाला पोषण आहार योजनेत बालकांसाठी सुगडी तयार करून पुरविण्याचेे काम देण्यात आले होते. सुगडी बनविण्याचा प्रकल्प लेंभेवाडी येथे सुरू असल्याचे दाखवून अत्यंत निकृष्ट दर्जाची सुकडी बनविण्यात येत आहे. स्वत: अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशी करून कारवाई करणार होते. त्याचे काय झाले?' असा संतप्त सवाल गोल्डे यांनी केला. जो पोषण आहार बालकांना दिला जातो, तो जनावरेही खाऊ शकत नाहीत. त्याचा प्रत्यय आपण कधीही पाहावा. गेल्या दहा वर्षांपासून कित्येक समित्या नेमण्यात आल्या. त्यांचा आजपर्यंत अहवाल आला का? या प्रकरणी आपण न्यायालयात जाणार असून नागपूर अधिवेशनात ही माहिती पाठविणार असल्याचे ते म्हणाले. उपाध्यक्ष अनिरूद्ध खोतकर म्हणाले, 'पोषण आहाराची निविदा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मागविण्यात येते. आपण फक्त देखभाल करण्याचे काम करतो. तेच काम प्रामाणिकपणे करायला हवे.' असे म्हणत जवळपास सर्वच सदस्य संतापले.
आरोग्यावरून आव्हान
जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आरोग्य केंद्र आता सहा दिवस पूर्णपणे चालू राहणार आहेत, या आरोग्य सभापती ए जे बोराडे यांच्या वक्तव्याचा माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी भलताच समाचार घेतला. 'एक दवाखाना सलग दोन दिवस उघडा दाखवा, तातडीने राजीनामा देतो,' असे खुले आव्हानच त्यांनी सभागृहात दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट