अरुण समुद्रे, लातूर
लातूरच्या पाणीप्रश्नावरून काँग्रेसने नागपुरात धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर, शहरात मात्र काँग्रेसवरच निशाणा साधण्यात येत आहे. महापालिकेसह राज्यातही बराच काळ सत्ता असताना, काँग्रेसला पाण्याच्या प्रश्नाची आठवण आली नाही आणि आता तेच आंदोलन करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
लातूरचा पाणीप्रश्न तीव्र झाला असून, दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीपुरवठ्यासाठी रेल्वेचीही मदत घेण्याचा विचार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, महापौर अख्तर शेख आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी नागपूरमध्ये धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाने काँग्रेसने स्वत:चीच कोंडी केली असल्यामुळे, विरोधकांनीही हीच संधी साधण्याची तयारी केली आहे. या परिस्थितीला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप करताना, भाजपचे बाबू खंदाडे यांनी पत्रक काढून काँग्रेसचे धरणे आंदोलन कसे श्रेय घेण्यासाठी सुरू असल्याची टीका केली आहे. गेल्या १२ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी माकणी धरणातून लातूरला पाणीपुरवठ्यासाठी मंजूर केलेला निधी, त्यासाठीच्या पाइपलाइनसाठीच्या टेंडर प्रक्रियेबाबत आयुक्तांबरोबर केलेला पत्रव्यवहार यांकडे लक्ष वेधले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी २३ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन, पाणीपुरवठ्यासाठी माकणी धरणातून पाणी आणण्याचे सर्वेक्षण झाल्याचे सांगितले होते. त्याचा अहवाल तीन दिवसांमध्ये राज्य सरकारला पाठविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, त्या अहवालाचे काय झाले, याचा पाठपुरावा पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केला का, असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात येत आहे. पाण्याच्या प्रश्नासाठी पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी गेल्या महिन्यापासून करत असूनही, ही सभा बोलावली नाही, याकडे पालिकेतील विरोधी पक्षनेते मकरंद सावे यांनी लक्ष वेधले आहे.
महापौरांना प्रश्न
- महापालिकेमध्ये काँग्रेसची पूर्ण सत्ता असताना, पाण्यासाठी पालिकेकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?
- पाण्याची बचत करण्यासाठी बांधकामे बंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणती पावले उचलली?
- शहरामध्ये बेकायदा बांधकामांमधून लाखो लिटर पाण्याचा वापर होत आहे. त्यांना कोणाचे संरक्षण आहे?
नाराज नगरसेवकांची पाठ
काँग्रेसच्या नगरसेवकांनी लातूरच्या प्रश्नावर नागपुरात धरणे आंदोलन केले आणि त्यानंतर त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या आंदोलनामध्ये सर्वच नगरसेवकांचा सहभाग नव्हता, हे दिसत आहे. नाराज नगरसेवकांनी नागपुरातील या आंदोलनाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे या आंदोलनाचा फार्स दिसून येत असल्याकडेही बोट दाखविण्यात येत आहे.
काँग्रेसची देशात अनेक वर्षांपासून सत्ता आहे आणि लातुरातही काँग्रेस तीस वर्षांपासून कारभार पाहात आहे. लातूरकडेच मुख्यमंत्रिपद असतानाही, शहराच्या शाश्वत पाणीपुरवठा योजनेसाठी काय केले, ते जनतेला त्यांनी सांगावे. त्यामुळे लातूरचे आमदार आणि पालिकेतील काँग्रेस नगरसेवकांना आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच नाही. त्याऐवजी, या पाणीटंचाईला कसे जबाबदार आहोत, याचे आत्मपरीक्षण करावे.
- मकरंद सावे, विरोधी पक्षनेते, लातूर महापालिका
पाण्याचे नियोजनच नाही
काँग्रेसकडून पाण्यासाठी आंदोलन करताना, पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना सहभागी का करू दिले नाही, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसकडे राज्यात सत्ता असताना, शहरात आयुक्तालयाची इमारत बांधण्यात आली. आयुक्तालयाला मंजुरी नसतानाही हे काम झाले. तसेच, पुढील २५ वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून, उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र, शहराच्या भविष्यातील पाण्याच्या गरजेचा विचार करून, अशी कोणतीही योजना उभारण्यात आली नाही, याकडेही अनेक जण लक्ष वेधत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट