श्री घृष्णेश्वर मंदिराच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात भारतीय पुरातत्व विभागाने लावलेले बॅरीकेड्स संतप्त दुकानदारांनी मंगळवारी रात्री काढून टाकले. यामुळे अतिक्रमणधारकांपुढे प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येते. यावरून मंदिर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मंदिर परिसरात कोणतेही वाहन जाऊ नये, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्रावण महिन्यात बॅरीकेट्स लावण्यात आले होते. खासदार राजकुमार धूत यांच्या पुढाकाराने मंदिर परिसरात सुशोभिकरण करून उद्यान तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याआधी दुकानदारांना पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. हे प्रयत्न सुरू असताना येथील दुकानदारांनी व्यवसाय होत नाही, उपासमारीची वेळ आल्याचा कांगावा करत मंगळवारी रात्री आठच्या सुमाराला बॅरीकेट्स काढून टाकले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे कर्मचाऱ्यांसह पोहोचले तेव्हा अनेक दुकानदार बॅरीकेट्स काढतांना दिसले. पोलिस आल्याचे लक्षात येताच दुकानदारांनी पळापळ केली. उज्वला चव्हाण, माया पवार, आयना पवार, संतोष भालेराव यांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील प्रसंग टळला.
पुन्हा बॅरीकेट्स लावले
मंदिर परिसरात एकही वाहन येऊ नये यासाठी बुधवारी एएसआयचे हेमंतकुमार हुकरे, पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत यांच्या उपस्थितीत बॅरीकेड्स पुन्हा लावण्यात आले.
काय घडले होते?
९ मे २००६ रोजी सायंकाळी वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात आरडीएक्सचा साठा पकडण्यात आला होता. मुंबई एटीएसच्या पथकाने नांदगाव येथून येणारी टाटा सुमो व इंडिका कारचा पाठलाग केला. चालकाने टाटा सुमो मंदिराच्या समोरील दुकानांच्या परिसरात वळविली. या मोटारीत १६ एके ४७ रायफल, ३२०० काडतूस, ६२ मॅगझिन, ४३ किलो आरडीएक्स, ५० हँडग्रेनेड आढळून आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट