नुसत्या वाङ्यप्रतिष्ठेवरच कवितेचे शिखर उंच-उंच होत जात नसते. कवितेला जनाधार हवा असतो. कवितेच्या सोबत समाज आणि संस्कृती ही असावीच लागते. या पद्धतीचे अहोभाग्य कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या तळहातांवर नक्की लिहिलेले आहे. आमच्या समीक्षेने त्यांच्यावर टीकेचा टक्का मारून बघितला. कविता लेखनाच्या त्यांच्या सातत्यशीलतेवरही खूप बोलून-भांडून झाले; पण या खऱ्या कवीने त्याची कधी पर्वा केली नाही किंवा उत्तर देण्यात आपली प्रतिभा कधी खुली होऊ दिली नाही. रसिकांच्या आणि वाचकांच्याही लक्षावधी जनतेचा सागर पाडगावकरांच्या कवितेकडे सतत लोहचुंबकाप्रमाणे खेचला गेला तो कायमच.
'धारानृत्य', 'जिप्सी'पासून म्हणजे १९५० पासून कवितेसोबतच पक्की गाठ बांधून उत्साहाने प्रवास करणाऱ्या या ज्येष्ठ कवीने 'शब्द', 'क्षणिका' या अलीकडच्या कवितासंग्रहांपर्यंत आपला 'प्रतिभाप्रवास' सुंदर, हार्दिक, मनोवेधीच ठेवला. माणसांचा ध्यास बाळगणाऱ्या कविवर्य मंगेश पाडगावकरांनी माणसांच्या भावनांचीच शब्दयात्रा कवितेच्या दरबारात भरविली. अनुप्रास अथवा यमक यांचा गंध व बाज या थोर कवीला फार सूक्ष्म ठाऊक होता. वरवर हा शब्दांचा खेळ वाटायचा. वरवर ही शब्दक्रीडाच वाटायची; पण त्याच शब्दमैफलीमधून या प्रतिभावंतानं मानवी मन वाहतं ठेवलं. मानवी संवेदनांची साखरमिठी रसिकांना घडविली. कविता आणि गाणं यात त्यांनी लक्ष्मणरेषा ओढून ठेवली नाही कधी.
लोकांचं जीवन सुंदर करणारे हे कवी. जगताना-वागताना कवित्वाचा गौरवास्पद बाणा आणि कणाही या कविवर्यानं नरम, मुलायम होऊ दिला नाही. आपल्या वैभवास्पद कवीपणाच्या बहारदार अस्तित्वाची प्रभा, पाडगावकरांनी आयुष्यभर तेजाची व जनपसंदच सांभाळलेली आहे. समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांनी चिंतनाची भूमी उलगडून दाखविताना वैयक्तिक प्रेमजीवन आणि निसर्गप्रेमातून अनुभवास येणारे भावजीवन हेच पाडगावकरांच्या प्रतिभेचे प्रामुख्याने चिंतन विषय आहेत, अशी बाजू समोर ठेवलेली आहे. ती अर्थातच, समुचित अशीच म्हणायला हवी. पाडगावकरांइतकी दांडगी लोकप्रियता कमी कवींच्या पदरांत पडलेली दिसते. लोकप्रियता हा शब्द मान-सन्मानाचं माप लावताना पुष्कळदा कमी लेखला जातो. त्याच्या खास काही कसोट्या मात्र सांगितल्या जात नाहीत. सोपं-सरळ लिहिणाऱ्यांना कवी न मानण्याचाही एक आडमुठेपणा साहित्यात बिनकामाचा धुमसत ठेवला जातो. यात काही तथ्य नाही. 'सलाम' या संग्रहासाठी भारत सरकारनं साहित्य अकादमी देऊन पाडगावकरांना गौरविलं आहे. समीक्षा ही गोष्ट का विसरत असावी? 'सलाम', 'वात्रटिका', 'उदासबोध' हे त्यांचे कवितासंग्रह व्यवस्था, समाजांतील विरुपांचं रेखन करतात, जे की अप्रतिम, कुलीन आणि अत्यंत महत्त्वपूर्णच आहे. सामाजिक-राजकीय व्यवस्थेतल्या ढोंगाला टरकावणारा शब्द या कवीनं कवितेमधून आयुधासारखा वापरलेला आहे. संयमी व सभ्य विद्रोहाचा हा बाज पुनः एकदा समजून घ्यावा, अशा स्वरूपाचा नक्कीच आहे. निसर्गालाच पहिली प्रेरणा मानणारा आणि समाजातील लोक हेच माझ्या कवितेचे गोकूळ मानणारा हा प्रतिभावंत सूर आणि शब्दांपासून कधीही ढळलेला नाही. लिंबोणीच्या झाडामागे (ललित), युगात्मा, संहिता यांसारखी अप्रतिम संपादनं आणि शर्मिष्ठा (नाट्यकाव्य) या पद्धतीची वेगळी सर्जकता पाडगावकरांनी सिद्ध केली आणि आपल्या प्रतिमेचा खानदानी असणारा कंद वाचकप्रत्ययास आणून दिला आहे. या अनवट प्रतिभेचा हिशेब मात्र समीक्षेने किंवा ठराविक वाचकांनी कधी केला नाही, असं का? मतांची गणितं माडणाऱ्या आणि विवेचनांचे कप्पे करत चर्चा ताणत ठेवणाऱ्या चिंतकांनीही त्याअर्थी मंगेश पाडगावकरांच्या काव्यदौलतीवर जरूर तर अन्यायच केलेला आढळून येतो. असो. एका घरात दहा माणसं एका स्वभावाची नसतात. अन्न व संस्कार समान असूनही हाच अन्याय कवितेला लावला पाहिजे. कोणाचीच समग्र कविता अप्रतिम अशा पठडीतली अजिबात नसते. धारानृत्य ते क्षणिका असे मिळून पाडगावकरांनी जवळपास चाळीस एक काव्यसंग्रह वाचक हाती सोपविलेले आहेत. बबलगम, वेडं कोकरू, आता खेळ नाचा, झुले बाई झुला, सुट्टी एके सुट्टी हे त्यांचं लहान मुलांसाठीचं लेखन तर अप्रतीम अशा पठडीतलं आहे. लेकरांसाठी शब्द कसा लिहावा, याचा आरसा म्हणून पाडगांवकरांच्या बालगीतांचा विचार करता येणार आहे. जिप्सी, सलाम, गझल, तुझे गीत गाण्यासाठी, बोलगाणी, छोरी, मीरा, वात्रटिका, उदासबोध या त्यांच्या सर्वच कवितासंग्रहांनी विक्रमी आवृत्या आणि विक्रीसेवेचे उच्चांक प्रस्थापित केले आहेत, ही घ्टना मामुली समजावी अशा श्रेणीची म्हणता यायची नाही. प्रकाशक हल्ली कवितासंग्रहाला हात लावत नाहीत, आणि कवी आपली पुस्तकं हिंडून वाटतात किंवा 'भेट' शब्द लिहून लोकार्पण करतात, अशी स्थिती आढळताना दिसून येते, अशा एका ठिचकारण्याच्या वातावरणात लक्षावधी रसिकांची यात्रा पाडगावकरांवर अर्धशतकापासून प्रेम करत आलेली आहे. म्हणून त्यांची प्रतिमा जनपसंद जरूर आहे. कविपणाचं अवघं वैभव जे या कवीला लाभलं, ते इतर दुसऱ्याला नाही, हेही ध्यानी घेतलं पाहिजे.
माणसाला जगण्यासाठी चटणीभाकरच फक्ती हवी. असं ठामपणानं म्हणता येत नाही. ती एक मूळ गरज आहेच, पण त्याशिवाय, सूर, ताल, नाद, लय, हास्य, आनंद, सकारात्मकता याच्याशिवाय पण माणूस जगू शकत नाही. जनमानस हे मूळात बहुकोनी, अहुआयामी अर्थात विविध गुणधर्मी अशा स्वरूपाचं असतं. पाडगावकारांच्या प्रातिभिक लेखनीचा धर्म हा असा जनध्यासाशी संलग्न होणारा आहे. त्यांच्या गीत आणि गझलांवर कारागिरी म्हणून आणि कृत्रिम म्हणून तीव्र तिखट आलोचना झाली, पण हिरव्यागार काळजाच्या या दिलेर कवीनं त्याची कधी एक पर्वा केली नाही. भय ठेवले नाही. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी किंवा अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेऊनी जाती किंवा श्रावणात घननिळा बरसला, शब्दांवाचून कळले सारे, भेट तुझी-माझी स्मरते यांसारखी प्रगल्भ आशयाची गाणी त्यांनी पुष्कळ लिहून ठेवली आहेत. सहज अशी शब्दकळा, मूळातून गेयता, संगीताशी एकरूप होणाऱ्या ओळी आणि जनमनांतील भाव पारखणारी कविप्रतिभाः ह्या एकसंध प्रीतीचा भाव, निसर्गाचा वेध, नात्यांची उकल, भावसौंदर्याचा आविष्कार, मानवी संवेदना आणि शब्द-विचार-तत्वः ह्या दिशा आणि मार्गांनी कवितेची-गीतांची पालखी घेऊन चालणारा हा कवी आहे. गीतांना शब्द देताना भडक, आवाजी, रखरखीत व बोचकणारा भाव पाडगावकरांनी गाण्यात येऊ दिला नाही. त्यामुळं रसिकांची श्रेणी पद्धत करून त्यांचं गाण ऐकण्याची गरज नाही. डोंगररांगापासून ते महानगरपर्यंत बसलेल्या कोणत्याही माणसाला त्यांचं गाणं मनोवेधी वाटायला वेळ लागत नाही. मन व कान उघडा असला की पाडगावकर शब्दांतून जनतेचे कवी होऊन जातातच. यावर्षी 'मौज' दिवाळी अंकात 'नवीन' असं शीर्षक असलेली पाडगांवकराची कविता आहे. ताजी छापलेली ही त्यांची शेवटची कविता. त्यात ते लिहितात,
'निःशब्द तीर्थयात्रा ही
भवतीची सगळी सृष्टी
अन पाहू लागली माझी
मज पुन्हा नव्याने दृष्टी!'
.... आणि आता या थोर कवीची ही तीर्थयात्रा रसिकजनांसाठी याक्षणी निःशब्द झाली आहे.
- डॉ. केशव सखाराम देशमुख,
(स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यीपीठ, नांदेड)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट