Ashish.choudhri@timesgroup.com
शाळेला जायला धड रस्ता नाही. पावसाळ्यात तर पायपीटच. अशा खडतर वस्तीवरील शाळेतील पहिली, दुसरीचे विद्यार्थी मात्र मोठ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना लाजवतील अशा प्रकारे शतकीपासून हजार, लाख, कोटी आणि अब्ज या संख्या ओळखतात. संख्याओळख असो की जोडशब्द, वाक्य. मुलांची नावे असोत की गणितातील बेरीज वजाबाकी. क्षणाचाही विलंब न लावता विद्यार्थी उत्तरे देतात. त्यासाठी त्यांना घोकंपट्टी करावी लागत नाही, की अभ्यासात रटाळपणा नाही. त्यांना हे शक्य झाले आहे ते विजय गायकवाड या शिक्षकामुळे. या गुरुजींनी स्वतःची सांकेतिक भाषा तयार केली आणि त्याच भाषेतून ते अध्यापनाचे धडे देतात. वैजापूरपासून चार किलामीटर अंतरावर असलेल्या हिंगेवस्ती येथील जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा. शिक्षकाचा हा वेगळा मार्ग 'हिंगेवस्ती पॅटर्न' अशी ओळख निर्माण करतो आहे.
हे संगणकीय युग म्हणून ओळखले जाते. अशा या युगात शिक्षणाच्या नवनव्या पद्धतीही येत आहेत. पारंपरिक पद्धत आणि घोकंपट्टी शिक्षणावर विद्यार्थीही नाराज असतात. त्यांना ते कंटाळवाणे वाटते. अनेक शाळांमध्ये पुस्तकांची घोकंपट्टी करत अभ्यासक्रम पूर्ण केला जाताना दिसतो, परंतु ही हिंगेवस्तीची प्राथमिक शाळा यापेक्षा वेगळी ठरली ती या शिक्षकाच्या प्रयत्नामुळे. विजय गायकवाड या शिक्षकाने स्वतःची सांकेतिक भाषा विकसित केली आहे. हे गुरुजी मराठी, गणित किंवा इंग्रजी विषय असो, याच सांकेतिक भाषेतून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देतात. ही भाषा विद्यार्थ्यांच्या एवढी अंगवळणी पडलेली आहे की, त्यांना प्रत्येक विषय सोपा वाटायला लागतो. मुळाक्षरे, बाराखडीला गायकवाड यांनी हावभाव निश्चित करत एक सांकेतिक खूण दिलेली आहे. उदा. 'अ' असेल तर कपाळावर आडवी रेघ, 'ब' असेल तर बोटांना तसा आकार देणे. अशा प्रकारे 'क', 'ख', 'ग', 'घ' अशा प्रत्येक अक्षराला सांकेतिक खूण दिली आहे. याच सांकेतिक भाषेतून गुरुजी मुलांना अक्षरांची ओळख करून देतात. हावभावातून शिकायला मिळते आणि ते आनंददायी ठरल्याने मुलांचाही शाळेकडचा कल वाढला. या शाळेत दररोज शाळेत शंभर टक्के उपस्थिती असते. शिकण्यापेक्षा आपण खेळत शिकतोय अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. गीतातील हावभाव ओळखून मुले ५ व ६ अंकी संख्या चटकन् ओळखतात. दसलाख, कोटी, अब्जच्या वरील आकडे मोजताना अनेकांची भंबेरी उडते, परंतु या शाळेतील दुसरी, तिसरीचे विद्यार्थी १ लाख ७६ हजार कोटींचा भष्टाचार झाल्याची बातमी वर्तमानपत्रात क्षणार्धात वाचतात. ही सारी गुरुजींच्या सांकेतिक भाषेची किमया आहे. कोणी पाहुणे आले तर त्यांचे स्वागत गुरुजींच्या सांकेतिक भाषेनेच होते. गुरुजी ती भाषा मांडतात आणि विद्यार्थी पाहुण्यांचे नाव सांगतात. त्यांनी दिलेले शब्द असो की संख्या. विद्यार्थी गुरुजींच्या याच भाषेतून ओळखतात.
गुरुजी कृती करतात आणि शब्द, संख्या विद्यार्थी मांडतात. अशा गमती जमतीतून विद्यार्थ्यांना शब्द, पाढे, इंग्रजी वाक्ये शिकविली जातात. इंग्रजी ग्रामर यासह कॅट, मॅट, लुकिंग, स्लीपिंग असे शब्दही विद्यार्थी यातूनच शिकतात. पटसंख्या ओळखणे, पाढे, कवितांच्या माध्यमातून अंकगणित ओळखणे, दिशांवरून अंकगणित ओळखणे हाच विद्यार्थ्यांचा अभ्यास बनला आहे. जोडशब्द, वाक्य ओळखणे, वाक्य तयार करणे हे सोपे झाले आहे.
घोकंपट्टीपेक्षा यातच मुले रमतात आणि त्यातूनच त्यांना ज्ञान मिळते. अभ्यासाची गोडी कायम त्यांच्या मनामध्ये राहते, त्यांचे लक्ष केंद्रीत राहते. त्यांची एकाग्रता वाढण्यासही मदत होते, असे गायकवाड गुरुजी सांगतात. वस्तीशाळा असल्याने सुरुवातीला विद्यार्थी संख्या कमी होती. २२ ते २५ विद्यार्थी होते. उपस्थितीही कमी असायची. आज अशी परिस्थिती आहे की उपस्थिती शंभर टक्के आहेच, पण विद्यार्थी संख्या वाढते आहे. ३३ विद्यार्थी शाळेत आहेत. गुरुजींच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे वस्तीतील कुटुंबांसह परिसरातील नाईकवस्ती, फकिराबादवाडी, नागिनपिंपळगाव येथील पालकही आपल्या मुलाला या शाळेत प्रवेशासाठी विचारणा करतात, परंतु शाळेकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अडचणी निर्माण येतात. शाळेतून बाहेर गेलेले विद्यार्थी आज माध्यमिक शाळांमध्ये चांगल्या प्रकारे शिकतात. त्यांना आत्मसात करणे अतिशय सोपे झाल्याचेही गायकवाड अभिमानाने सांगतात. विद्यार्थ्यांना सामान्यज्ञान ज्यात राज्यातील जिल्हे अशा पद्धतीने तोंडपाठ झाले आहेत. साधुसंतांची नावेही याच पद्धतीतून लक्षात राहतात.
गावकऱ्यांचेही पाठबळ
शाळेला गावकऱ्यांचे चांगले पाठबळ आहे. इमारतीसाठी शिक्षणप्रेमी कचरू पाटील कोल्हे यांनी आपली ४ गुंठे जमीन दान दिली आहे. इमारत किंवा इतर साहित्यासाठी शाळेला गावकऱ्यांसह इतर दानशूरांनीही आर्थिक स्वारुपाची मदत केली आहे. यातून शाळेचा परिसर, झाडांच्या कुंड्या, संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आली. विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटावे यासाठी प्रत्येक वृक्षाला विद्यार्थ्याचे नाव देण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघाचेही कायम लक्ष असते. त्यामुळेच शाळेला आयएसओचा दर्जाही मिळाला. वस्तीवरील रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी शाळा आकर्षणाचे केंद्र आहे.
प्रेरणा अशी मिळाली...
हिंगेवस्तीवर २००९ ला शिक्षक म्हणून रुजू झालो तेव्हा शाळेत दोन मुले पूर्णतः मूकबधीर (दिव्यांग) होती. त्यांना शिकविण्याचे आव्हान समोर होते. यातून मार्ग काढण्यासाठी सांकेतिक भाषेची कल्पना सुचली. १९९७ला बाहेगावला होतो तेव्हा आमच्या कुलकर्णी सरांकडून याचे धडे मला घेता आले. आघूरला बदली झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये यासह इतर उपक्रमांमुळे या पद्धतीकडे फारसे लक्ष गेले नाही. येथे आल्यानंतरही या मुलांकडे पाहिले आणि तयारी सुरू केली आणि ही भाषा विकसित केली. पाहता पाहता विद्यार्थ्यांनी ही भाषाही आत्मसात केली आणि आता पहिला किंवा बालवाडीला आलेला विद्यार्थी लगेचच ही सांकेतिक भाषा आत्मसात करतो. सगळ्यांसोबत त्याला वर्गात शिकविले की त्याला ताबडतोब ही भाषा जमते. ग्रामीण भागात या भाषेला भोप्याची भाषा म्हणतात. याच ग्रामीण भाषेतून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सोपा वाटावा, रटाळ वाटू नये यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरल्याचे लक्षात आले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट