Dhananjay.Kulkarni@timesgroup.com
तो काळ १९९६चा. सुखा-सुखी नोकरी करावी आणि संसार करावा अशा पठडीतील सुखवस्तू कुटुंबातील धारणा. या धारणेत न अडकता काहीतरी 'आउट ऑफ बॉक्स' करायचे आणि उद्योजकच व्हायचे, हे लक्ष्य घेऊन मनीष पाडळकर यांनी वाळूज औद्योगिक क्षेत्रात पाऊल ठेवले. वडील शिवकुमार पाडळकर बँकेत अधिकारी. उद्योगाची तशी पार्श्वभूमी वडिलांकडे नाही, परंतु काका जयंत पाडळकर उद्योजक. उद्योजकतेचे खरे बाळकडू मनीष यांना तिथेच मिळाले. 'आस्थापनेत सरळ सरळ काकांसोबत उद्योग करू आणि मालकच होऊ... काकांचीच फॅक्ट्री, ती आपली फॅक्ट्री होईल,' असे म्हणत सहज उद्योजकाच्याच खुर्चीवर बसता आले असते, परंतु मनीष यांनी तसे केले नाही. १९९५मध्ये शिक्षण झाल्यावर १९९६मध्ये काकांनी सरळ एक कामगार म्हणून रुजू होण्याचा आदेश दिला. तो शिरोधार्ह मानत कंपनीत रुजू होऊन मनोज यांनी कामास सुरुवात केली. एक सर्वसामान्य कामगार म्हणून जाताना वाळुजला डुगडुगीत (सिक्स सीटर) घरून डबा घेऊन जाणे सुरू केले. वर्षभरात त्यांनी कामगार, पर्चेस मॅनेजर, अकाउंट, निर्मिती (प्रोडक्शन), पॅकिंग, सेलिंग, मार्केटिंग विभागात पडेल ते काम केले. काका जयंत यांच्या कृपा इलॅस्टोमरमध्ये काम करताना गाठीशी आलेल्या अनुभवाने त्यांना समृद्ध केले. काकांकडेही नोकरी करायची नाही, स्वतःचा व्यवसाय सुरू करावा ही मनातील इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. छोटेसे युनिट सुरू करून काकांनाच रॉ-मटेरिअल पुरविण्याचा उद्योग सुरू करावा हे ठरले. त्यानंतर ८ जून १९९७ला मनीष प्रिसिजन वर्क्स नावाने कंपनी सुरू केली. एकीकडे काकांची फॅक्ट्री, दुसरीकडे आपले स्वतंत्र युनिट असे काम सुरू झाले. आपला प्रांत निर्मितीचा (मॅन्युफॅक्चरिंग) आहे. त्यात आपल्याला गती आहे, असा आत्मविश्वास दृढ झाला आणि त्यांनी ऑटोमोबाइल प्रेस कम्पोनंट बनविण्याची कंपनी सुरू केली. १९९७मध्ये त्यांना व्हेरॉक कंपनीतून पहिला ब्रेक मिळाला आणि आज ते यशाच्या शिखरावर पोचले आहेत. आतेभाऊ विनय मार्कंडेय याला सोबत घेतले. त्याची साथ मोलाची ठरली. वाळूजमध्ये जमीन घेणे, मशीनरी उभारणे, कामगारांची जुळवाजुळव करणे, भांडवल उभारणे, नुकसानीची तयारी ठेवणे आणि उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने असलेल्या वेगवेगळ्या परवानग्या यांचा अभ्यास सुरू केला. गॉडफादर जयंत पाडळकरांचा वरदहस्त होताच, पण त्या कुबड्या ठरू नयेत हेच मनीष पाहत राहिले. सुरुवातीला व्हेरॉक एकच कंपनी मिळाली. पहिल्या वर्षी फक्त ६ लाख रुपये उलाढाल झाली. आज टू व्हीलर, थ्री व्हीलर गाड्यांच्या इंजिनचे प्रेस कम्पोनंट मनीष पाडळकरांचे आहे. व्हेरॉकचे ते व्हेंडर असून, रबर-मेटल शीट्स, व प्रिसिजन वर्कस््मध्ये अढळपद निर्माण केले आहे. २०पेक्षा जास्त स्पर्धक कंपन्या आहेत, पण वेगळेपण टिकवून ठेवण्यात मनीष यांची मेहनत आहे. आज १५ जणांना थेट, तर २५ जणांना अप्रत्यक्ष रोजगारही दिला आहे. वाळूजमध्ये जागा घेण्यापासून युनिट सुरू करणे व अठरा वर्षांत २ कोटीहून अधिकचा टर्नओव्हर देणारे मोजके मराठी उद्योजक आहेत, त्यात मनीष पाडळकरांचा समावेश होतो.
सुरुवातीला आर्थिक अडचणी असल्या तरी त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. वडील आणि काकांनी सुरुवातीला फक्त २ लाख रुपये देऊन उद्योग सुरू करण्यास सांगितले होते. ते पैसे व्याजासह परत करताना दोन वर्षांत जो आत्मविश्वास आला. तोच आत्मविश्वास ते आपल्या १५ कामगारांनाही देतात. मनीष आपल्या कामगारांचा पगार बँकेत जमा करतात. त्यांनी १५ जणांचा विमाही उतरविला असून, कामगारांना आर्थिक शिस्त लावली आहे. संघर्षाच्या वाटेत यश पादाक्रांत करताना पत्नी रुपाली यांनीही फार मोठी साथ दिली, असे मनीष सांगतात. उद्योजक व्हा, सुरुवातीला आलेल्या नुकसानीला भांडवल करा आणि तेच गुंतवा, असे ते आवर्जून सांगतात. आज २ कोटींचा वार्षिक टर्नओव्हर महिन्याला २ कोटींचा करणे हे मनीष यांचे लक्ष्य आहे. यासाठी आधुनिक मशीनरी, टेक्नॉलॉजीची कास धरणे, कुशल मनुष्यबळ विकसित करणे यावर ते भर देत आहेत. भविष्यात स्वतःच मशिनरी बनवण्याचा त्यांचा मानस आहे.
उद्योजक होताना...
उद्योग क्षेत्रात येण्यापूर्वी सर्वप्रथम स्वत:ला जाणून घ्यावे. आपल्या अंगात कुठले कौशल्य आहे, भांडवल किती आहे, कर्ज किती मिळू शकेल, मोक्याची जागा आहे का, तयार केलेल्या उत्पादनाला बाजारात किती प्रतिसाद मिळेल, कच्च्या मालाचा पुरवठा योग्यरित्या होईल का, तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच मार्केटिंगचे तंत्रही आत्मसात करायला लागेल, याचाही विचार करावा, असे ते सांगतात. नोकरी करूच नका, त्याने बंधने येतात आणि स्वप्न अपुरे राहतात, असे ते म्हणाले. एकदा या क्षेत्रात यायचे निश्चित झाले की, सर्वप्रथम नकारात्मक भूमिकेला लाथ मारावी. आपले ध्येय निश्चित करावे. ते गाठण्यासाठी प्रयत्नांची जोड द्यावी. जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावरच उद्योजकतेत यशस्वी होता येते. सतत काहीतरी नवे करण्याचा ध्यास असावा. मेहनतीची तयारी ठेवावी. कितीही संकटे आली तरी हार मानू नये. केवळ कामगारांशीच नव्हे तर कच्च्या मालाचे पुरवठादार, व्यापारी, वितरक यांच्याशीही सलोख्याचे संबंध ठेवावेत, हेच माझ्या यशाचे गमक आहे, असे मनोज सांगतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट