म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'समांतर जलवाहनी योजनेअंतर्गत पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम गतीने पूर्ण करा,' असे निर्देश महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे समांतर जलवाहिनीच्या कंपनीला दिलेल्या नोटीसचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
समांतर जलवाहनीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. बैठकीला महापालिकेचे अधिकारी, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीचे अधिकारी उपस्थित होते. दरमहिन्याच्या दुसऱ्या बुधवारी समांतर जलवाहिनीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक होत असते, त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान २००० मिलिमीटर व्यासाचे पाइप टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी केंद्रेकर यांना देण्यात आली. जलवाहिनी टाकण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रेकर यांनी पालिका व कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. अन्यही बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला. पालिका आयुक्तांनीच जलवाहिनी टाकण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिल्यामुळे औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला बजावण्यात आलेल्या नोटीसचे काय होणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पालिका आयुक्तांनी कंपनीला अभय दिले का, की राजकीय दबावाखाली आयुक्तांना हे निर्देश द्यावे लागले, अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट