म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
क्रांतिचौक ते रेल्वे स्टेशन रस्त्याला गेल्या तीन वर्षांपासून ग्रहण लागले आहे. रस्ता नकाशानुसार तयार करण्यात न आल्यामुळे २३ कोटी रुपये खर्चूनही धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या डांबरीकरणाचे काम रखडले आहे आणि रेल्वे स्टेशनलगत त्याची रुंदीही कमी झाली आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी खुला करण्यात आलेला हा 'बाळासाहेब ठाकरे महामार्ग' शहरवासीयांसाठी दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत चालला आहे. आधी रस्त्याच्या दुभाजकामध्ये जागोजागी अंतर (गॅप) ठेवण्यात आले होते. त्यातून ये-जा करणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून तेथे गतिरोधके बसविण्यात आली. एसएससी बोर्ड, इंजिनिअरिंग कॉलेज, चेलिपुरा हायस्कूल, बन्सीलालनगर या ठिकाणी ही गतिरोधके आहेत. पुढे अपघात टाळण्यासाठी हे सर्व गॅप बंद करण्यात आले. एसएससी बोर्डपासून जालना रोडला जोडणारा रस्तादेखील दुभाजक बांधून बंद करण्यात आला. मात्र, या सर्व ठिकाणी आधी बांधलेले गतिरोधक आजही तसेच आहेत. उस्मानपुरा चौकात गतिरोधकाची गरज आहे, परंतु गतिरोधक कोठे हवे, कोठे नको याची काळजी महापालिका अधिकाऱ्यांनी कधीच केली नाही. त्यामुळे या चौकात दररोज अपघात होत आहेत. गतिरोधकाअभावी क्रांतिचौकाकडून भरधाव वेगाने येणारी वाहने, संत एकनाथ रंगमंदिराकडून येणाऱ्या वाहनांवर वारंवार धडकत आहेत. एसएससी बोर्डसमोरचा गॅप बंद करण्यात आल्यामुळे बोर्डापासून पीर बाजारपर्यंतचा सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता निकामी झाला आहे. पीर बाजार, प्रतापनगर भागातील संपूर्ण वाहतूक आता क्रांतिचौकमार्गे किंवा पदमपुरामार्गे अदालतरोड अशी केली जात आहे.
रुंदीकरणाचा खेळखंडोबा
क्रांतिचौकपासून रेल्वे स्टेशनपर्यंतच्या या अडीच किमी रस्त्याची रुंदी जागोजागी कमी-जास्त झाली आहे. रस्ता ज्या कंत्राटदाराने तयार केला, त्याच्या मालकीच्या 'मॅनॉर' हॉटेलचा ८ फूट भाग रस्त्यामध्ये आला होता. या अतिक्रमणावर तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी मार्किंगही केले होते, परंतु त्यांची बदली झाल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले. आजही ही इमारत रस्त्यावर उभी आहे, परंतु अतिक्रमित भाग वाचविण्यासाठी हॉटेलच्या विरुद्ध दिशेने असलेल्या राणी लक्ष्मीबाई उद्यानावर हातोडा मारण्यात आला. रस्त्याची उद्यानालगतची संपूर्ण बाजू अधू झाली आहे. क्रांतिचौक ते उस्मानपुरादरम्यान भूसंपादन न झाल्यामुळे डांबरी रस्ता अर्धवट झाला आहे. नकाशानुसार डांबरी भाग साडेतीन मीटरचा हवा, परंतु सध्या तो दीड ते दोन मीटर एवढाच रूंद आहे. एसएससी बोर्ड, इंजिनिअरिंग कॉलेज, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, चेलिपुरा हायस्कूल या इमारतींनी जागा देऊ केली, परंतु ती ताब्यात घेण्याची, भूसंपादन करण्याची तत्परतादेखील पालिकेने दाखविली नाही. त्यामुळे तेथेही रस्ता अरूंद झाला आहे.
विजेच्या खांबांचा अडथळा
रस्त्यालगतचे विजेचे खांब आणि फायर ब्रिगेडसमोरची डीपी, रस्ता खुला करून एक वर्ष उलटले तरी हटविण्यात आलेली नाही. खांब आणि डीपी हटविण्याचे पैसे महापालिकेने भरले, पण अधिकाऱ्यांनी पाठपुरावा न केल्यामुळे वीज मंडळाने कोणतीही हालचाल केलेली नाही. रेल्वे स्टेशनलगत रस्त्यासाठी रेल्वेच्या जागेचे भूसंपादन करणे गरजेचे आहे. बाजारभावाप्रमाणे किंमत देऊन जागा घेण्याची अट रेल्वे खात्याने घातली आहे. त्यामुळे महापालिकेने त्या ठिकाणी रस्ताच केलेला नाही.
पादचाऱ्यांचे हाल
एकूण १२० फूट रुंद असलेल्या या रस्त्यावर फुटपाथ नाहीत की झेब्रा क्रॉसिंगही नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो. अडीच किलोमीटरच्या अंतरात अनेक ठिकाणी फुटपाथची तरतूदही केलेली नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दुभाजकात वृक्षारोपण प्रस्तावित होते, परंतु कंत्राटदाराने त्यात चक्क बांधकामाचा 'राडारोडा' भरण्याचे काम सुरू केले आहे. दगड, विटा, वाळूच्या या ढिगाऱ्यात झाडे कशी जगणार हा प्रश्नच आहे. दुभाजकातील दिवेदेखील बंद असल्यामुळे हा रस्ता अंधारात बुडून जातो. अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा व त्याला कंत्राटदाराची जोड मिळाल्याने हा महत्त्वाकांक्षी रस्ता धोकादायक ठरत चालला आहे.
ठाकरे महामार्गाबद्दल आज बैठक
क्रांतिचौक ते रेल्वे स्टेशन या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्गाबद्दल शुक्रवारी विशेष बैठक होणार आहे. महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत सिडको कार्यालयात सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे. ठाकरे महामार्गाच्या रखडलेल्या कामाकडे नगरसेवक विकास जैन, गजानन बारवाल आणि नंदकुमार घोडेले यांनी महापौर व आयुक्तांचे लक्ष वेधले. या रस्त्यावरची अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही ही कामे केली जात नाहीत, असे जैन म्हणाले. '२३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुखांची जयंती आहे. तोपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करा,' असे घोडेले म्हणाले. अपूर्ण असलेल्या कामांबद्दल शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी खुलासा केला. ते म्हणाले, 'कंत्राटदाराला पेमेंट न केल्यामुळे कामे अपूर्ण आहेत.' चर्चेचा एकूणच नूर लक्षात घेऊन केंद्रेकर यांनी या रस्त्याबद्दल उद्या शुक्रवारी सकाळी बैठक घेण्याचे जाहीर केले. या बैठकीला नगरसेवक, अधिकाऱ्यांनी यावे, कंत्राटदारालाही बोलवावे असे निर्देश त्यांनी दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट