चाकोरीबद्ध नोकरीच्या वाटेवरून जाण्याच्या हेतुने बी.ई. केमिकल व एमबीए केले. मार्केटिंगचा जॉब करतानाच 'आपण का उद्योजक होऊ नये,' या विचाराने डोके वर काढले. त्या दृष्टीने विचार-अभ्यास सुरू केला आणि चार वर्षांच्या अनुभवानंतर काय वाट्टेल ते झाले तरी उद्योगच करायचाच, या जिद्दीने 'कोरुगेटेड बॉक्स'च्या मैदानात उडी घेतली. उद्योगात घुसलेला जवळचा नातेवाईक 'प्लॉप' ठरल्यामुळे कुटुंबाला धाकधूक होती; परंतु ही धाकधूक जिद्द-चिकाटी-नियोजन-आर्थिक शिस्तीने यशस्वीरित्या मोडून काढली. ऑर्डर मिळविण्यासाठी प्रत्येक 'युनिट'वर पावले झिजवली आणि अनुभवी स्पर्धकांमध्ये स्वतःचे आगळे-वेगळे स्थान स्वतःच्या हिमतीवर निर्माण केले. ११ लाखांचा टर्नओव्हर केवळ ८ वर्षांत अडीच कोटींवर नेणारे शहरातील उद्योजक म्हणजेच अमोल दाभाडकर.
दाभाडकर कुटुंबीय मूळचे गोलटगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील रहिवासी; परंतु अमोल यांचे वडील पद्माकर हे शिक्षण-नोकरीनिमित्त औरंगाबाद शहरात स्थायिक झाले ते कायमचेच. अमोल यांचे शिक्षण स.भु. शाळेत व महाविद्यालयात झाले. अमोल यांनी कधीही ७५ टक्क्यांखाली गुण मिळवले नाही. गणित-विज्ञान हे आवडीचे विषय असल्याने अकरावी सायन्सला प्रवेश घेतला आणि बारावीनंतर जेएनईसीमध्ये केमिकल शाखेला प्रवेश घेतला. अर्थात, 'केमिकल' या विषयामध्ये विशेष आवड होती असे नाही, तर त्या शाखेला तेव्हा नोकरीसाठी चांगली 'डिमांड' होती म्हणून त्या शाखेला प्रवेश घेतला. बी.ई. फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तेव्हाच्या ट्रेंडनुसार एमबीए केले आणि एमबीए होताच 'मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च'मध्ये कॉर्डिनेटर म्हणून अमोल रुजू झाले. वर्षाच्या अनुभवानंतर 'फोरेस् इंडिया लिमिटेड'मध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून संधी चालून आली. अडीच-तीन वर्षातील मार्केटिंगच्या विविधांगी अनुभवामध्ये 'आपण स्वतःच उद्योजक का होऊ नये,' या प्रश्नाने अमोल यांना विचारप्रवृत्त केले. आपणही छोटा उद्योग नक्कीच करू शकतो, हा आत्मविश्वास वाढत गेला आणि उद्योजक होण्याचा निश्चय झाला. त्याचदरम्यान 'कोरुगेटेड बॉक्सेस'च्या निर्मितीने अमोल यांचे लक्ष वेधले आणि याच उद्योगामध्ये पाय रोवण्याचे त्यांनी निश्चित केले, मात्र या उद्योगाचे तब्बल ३५ ते ४० युनिट (आज ५५ ते ६० युनिट आहेत) त्यावेळी औरंगाबादेत होते आणि बहुतेकांकडून नकारात्मक फिडबॅक मिळत होता. 'तुझ्याकडे ऑर्डर आहे का? ऑर्डर नसेल तर युनिट उभारून काय उपयोग?' असे सांगून माघार घेण्यासाठी इतरांकडून प्रयत्न केला जात होता, मात्र काही झाले तरी आपण ऑर्डर मिळवूच, त्यासाठी काय वाट्टेल ती मेहनत घेण्याची अमोल यांची तयारी होती. आई-वडिलांचा नकार नव्हता; परंतु जे काही करशील ते काळजीपूर्वक कर, असे त्यांचे सांगणे होते. तोपर्यंत अमोल यांचे लग्न झाले होते, दोन मुलेदेखील होती. त्यामुळे या स्थितीत आणि अशा टप्प्यावर निर्णय घ्यायचा असेल तर विचाराअंती व उद्योगाची सगळी माहिती घेऊन, अभ्यास करून घ्यावा लागेल, याची पुरती जाणीव अमोल यांना नक्कीच होती. अर्थात, अभियंता असलेल्या पत्नी दिप्ती यांचीही त्यांना साथ होतीच. योगायोगाने कधी-काळी निव्वळ गुंतवणूक म्हणून वाळूज एमआयडीसीमध्ये वडिलांनी प्लॉट घेऊन ठेवला होता, त्या ठिकाणी स्वतःचे युनिट सुरू करण्याचे अमोल यांनी निश्चित केले. अत्यंत काळजीपूर्वक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि युनिटसाठी किमान ३८ लाखांची मशीनरी आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. अलाहाबाद बँकेचे वडील 'लॉयल कस्टमर' होते व त्याचवेळी प्रोजेक्ट चांगला असल्याची खात्री झाल्यामुळे अमोल यांना बँकेने ३० लाखांचे कर्ज मंजूर केले. कर्जाची रक्कम तसेच चार वर्षांच्या नोकरीतील सेव्हिंग्ज, आई-वडिलांसह पत्नीच्या आर्थिक आधारातून २००७मध्ये 'शारदोपसना इंडस्ट्रिज' नावाने युनिट उभे राहिले.
कठीण काळावर मात
सुरुवातीच्या काळात ९-१० कामगार नेमले होते; पण ऑर्डरच नव्हत्या. मग सुरू झाला ऑर्डर मिळविण्यासाठीचा कठीण संघर्ष. ऑर्डर मिळविण्यासाठी वाळूजमधील प्रत्येक छोट्या-मोठ्या युनिटवर पावले झिजवण्यास प्रारंभ केला. प्रत्येक युनिटवर जायचे, संबंधित मॅनेजरचे नाव, नंबर मिळवायचा, लेखी कळवून अपॉइंटमेंट मिळवायची, भेटून स्वतःच्या प्रोडक्टची माहिती द्यायची, विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर मिळाली तर ऑर्डर, असा सगळा कार्यक्रम सहा-सात महिन्यांपर्यंत अखंडपणे सुरू होता. विशेष म्हणजे गॉडफादर नसतानाही हळुहळु ऑर्डर मिळू लागली आणि मिळालेल्या संधीचे म्हणजेच ऑर्डरचे सोने करणे सुरू झाले. कुठल्याही कंपनीच्या प्रॉडक्टनुसार 'कोरुगेटेड बॉक्स' तयार करून देतानाच त्यावर प्रिटिंग आणि पंचिंग करुन दिल्यास त्या कामासाठी बॉक्सेस दुसरीकडे पाठविण्याची गरज पडणार नाही व एकाच छताखाली सगळी कामे होऊ शकतात, हे लक्षात येताच त्याची मशिनरी घेतली आणि कामामध्ये आणखी सुसूत्रतता आली. हळुहळु कस्टमर वाढत गेले आणि सध्या २५ मोठ्या युनिटला, तर २५-३० छोट्या युनिटला बॉक्सेस पुरविण्यात येत आहेत. आज 'शारदोपासना'चे ४० पेक्षा जास्त 'लॉयल कस्टमर' आहेत, जे कधीही दुसरीकडे जात नाहीत, हे अमोल यांचे यश आहे. गुणवत्ता व अचूक प्रोडक्टसह ते योग्य दरांत मिळणार, याची खात्री असल्यानेच ते आमचे 'लॉयल कस्टमर' असल्याचे अमोल म्हणतात, मात्र आजतागायत तारेवरची कसरत कधीही संपलेली नाही. 'क्राफ्ट पेपर' हे मुख्य रॉ-मटेरियल असून, त्याचा स्टॉक १२ महिने मेन्टेन ठेवणे, त्याच्या सप्लायरला ७ दिवसांत पेमेंट देणे, ऑर्डर मिळताच एक-दोन दिवसांत डिलिव्हरी देणे व पेमेंटसाठी मात्र ६० ते ९० दिवस प्रतीक्षा करणे, या चक्रामध्ये सगळा उद्योग पहिल्यापासूनच सुरू आहे. यामध्ये सगळ्या प्रकारची तारेवरची कसरत करावी लागते आणि काटेकोर नियोजन, आर्थिक शिस्त असल्याखेरीज हे शक्य नसल्याचे अमोल म्हणतात.
पॅशन असेल तरच..
ही सगळी तारेवरची कसरत करून मिळणारा उद्योजकीय निर्मितीचा आनंद-समाधान वेगळेच आहे, जे कुठल्याही नोकरी मिळू शकत नाही. मुळात काय वाट्टेल ते झाले तरी कुठल्याही परिस्थितीत हार न मानता काही तरी निर्माण करण्याची पॅशन असेल व ती शेवटपर्यंत टिकणार असेल, तरच उद्योगाकडे तरुणांनी वळले पाहिजे. नोकरी आवडत नाही किंवा बॉसशी पटत नाही म्हणून उद्योग करून बघू, या उद्देशाने उद्योग-व्यवसाय करता येऊ शकत नाही, असे ते स्पष्टपणे म्हणतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट