सर्व शिक्षा अभियानातंर्गत शिक्षण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या हंगामी निवासी वसतिगृहामुळे विद्यार्थीनींचे स्थलांतर थांबले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या वर्षा भोसीकर यांनी केले.
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील हंगामी वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. शालेय समिती अध्यक्ष मधुकर डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सरपंच बालाजी देवकांबळे, केंद्र प्रमुख विठ्ठल आचने, मुख्याध्यापक बेबी हजेरा, हणमंतराव पेठकर, कृष्णा भोसीकर, सदाशिवराव मंगनाळे, भीमराव स्वामी, अमलापुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वर्षा भोसीकर यांच्या हस्ते फीत कापून वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. सावित्रीबाई फुले व सरस्वती देवी यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना भोसीकर म्हणाल्या, 'ग्रामीण भागातील ऊस तोड कामगार तसेच विठभट्टी कामगार हे मोठ्याप्रमाणावर स्थलांतरित होत असतात. त्यांच्या सोबत त्यांची मुले सुद्धा जातात. त्यामुळे वर्षातील तीन ते चार महिने शिक्षणापासून वंचित राहतात. हे थांबवण्यासाठी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व शिक्षा अभियानातर्गत शिक्षण विभागा मार्फत अशा विद्यार्थ्यांसाठी हंगामी वसतिगृह चालवण्यात येतात. या विद्यार्थ्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था मोफत करण्यात येते. त्यामुळे त्यांची शाळा बुडणार नाही, याची दक्षता घेतली जाते.'
कंधार तालुक्यात १९ हंगामी वसतिगृहे चालू करण्यात आली आहेत. ९३३ विद्यार्थी या योजेनेचे लाभ घेत आहेत. फुलवळ येथील वसतिगृहामध्ये ५२ विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी अशी सूचना उद्घाटनप्रसंगी भोसीकर यांनी व्यवस्थापन समितीला दिली. प्रास्ताविक केंद्रप्रमुख आचने यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष राठोड यांनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट