January 19, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उशिरा आल्याच्या कारणावरून महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या टेम्पोच्या चालकाला तरुणाने मारहाण केली. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता राजाबाजार, गवळीवाडा येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख जमील शेख इक्बाल शेख (रा. हर्षनगर, लेबर कॉलनी) हा तरूण महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या टेम्पोवर चालक म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता वॉर्ड क्रमांक ४७ राजाबाजारमधील गवळीवाडा येथे कचरा उचलण्याचे काम सुरू होते. यावेळी आरोपी उमेश खुन्नीवाले (रा. गवळीवाडा) हा तरुण त्या ठिकाणी आला. गाडी उशिरा का आणली, असा जाब विचारला. यावेळी जमीलने ही आपली दुसरी फेरी असल्याची माहिती दिली. या गोष्टीचा राग आल्याने उमेशने शिवीगाळ करीत जमीलला मारहाण केली. 'पुन्हा गाडी उशिरा आणली तर बघून घेईल,' अशी धमकी दिली. याप्रकरणी जमीलच्या तक्रारीवरून उमेशविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
January 19, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेत विविध विभागांमार्फत वैयक्तिक लाभाच्या राबविल्या जाणाऱ्या योजनांचा निधी मार्चपूर्वी योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे. यावर विशेष लक्ष असणार असून कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
चौधरी म्हणाले की, जिल्हा परिषदेत वैयक्तिक लाभाच्या व इतर लाभाच्या योजनांचा पैसा खर्च करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. यासाठी विभाग प्रमुखांना कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजना मार्गी लावण्यासाठी प्रत्येक विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहे. काहींच्या निविदा झालेल्या आहे तर काहींच्या निविदा होतील. त्यामुळे वेळेत लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जिल्हा परिषदेतील विविध योजनांच्या लाभासाठी दर पत्रकानुसार खरेदी करावी यासाठी काही पदाधिकारी, सदस्य प्रयत्न करत होते. या मागणीला खो देत जिल्हा परिषद प्रशासन ई-निविदेवर ठाम आहे. विविध विभागांच्या लाभासाठीच्या खरेदीसाठी ई-निविदेच्या माध्यमातूनच खरेदी केली जाईल, असेही चौधरींनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 19, 2016, 1:30 pm
औरंगाबाद : धान्य घेऊन जाणारी मालगाडी परळी ते घाटनांदूरदरम्यान मंगळवारी रुळांवरून घसरली. मालगाडीचे तीन डबे लोहमार्गावरून पटरीवरून घसरले आहे. या घटनेत कोणतीही प्राणहानी झालेली नाही. या अपघातानंतर चार रेल्वेच्या फेऱ्या बदलण्यात आल्या आहेत.
परळीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटनांदूर येथून सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान धान्य घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे तीन डबे रुळावरून घसरले. मालगाडी वेळीच नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अपघात टळला. डबे काढण्यासाठी रेल्वे विभागाकडून विशेष क्रेन पाठविण्यात आले. हा लोहमार्ग एकेरी असल्यामुळे मदत पोहोचविण्यास उशीर झाल्याची माहिती रेल्वेच्या स्थानिक सूत्रांनी दिली. मालगाडीचे डबे घसरल्याने नांदेड ते बंगळुरू रेल्वे मुदखेडमार्गे वळविण्यात आली आहे. याशिवाय बंगळूर ते नांदेड रेल्वे विखाराबाद येथून वळविण्यात आली. पूर्णा-हैदराबाद पॅसेंजर रेल्वे परळी पर्यंतच चालविण्यात येणार आहे. हैदराबाद ते पूर्णा रेल्वे उदगीर येथूनच हैदराबादकडे पाठविण्यात आली, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 19, 2016, 11:26 am
म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
हॉटेल व लॉजमध्ये राहणाऱ्या ग्राहकांची माहिती दिली नाही म्हणून वेरूळच्या सहा हॉटेल व लॉज मालकांविरुध्द कलम १८८ अन्वये खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले वेरूळ येथील हॉटेल व लॉज मालकांमध्ये गणेश गायकवाड (शिवकृपा लॉज), हरिहर शिंदे (साई गेस्ट हाउस), सुनील शहा (प्रसन्ना लॉज), संजय भागवत ( न्यू कैलास लॉजिंग ), उमेश वाबळे ( श्री दर्शन लॉज), सुरेखा निगुडकर व संतोष कलारे ( कैलास लॉज) यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक ग्रामीण नवीनचंद्र रेड्डी व अप्पर अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादी विरोधी सेलचे पोलिस उपनिरीक्षक बी. के. ठाकूर , एम. आर. मोरे, एस. आर. खरात, डी. एस. चंदनसे, एल. एच. सपकाळ, एस. एम. बोराडे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 19, 2016, 11:27 am
म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेल्या खरीप अनुदानाचा पहिला टप्पा रब्बी हंगामाच्या शेवटी-शेवटी का होईना तहसीलला जमा झाला आहे. १३ कोटी २९ लाख ५९ हजार ९०८ रुपयांच्या या निधीमुळे शेतकऱ्यांना थोडासा आधार मिळणार आहे.
सिल्लोड तालुक्यात यावर्षी पावसाने गुंगारा दिला. खरिपातील पीक वाळून गेले. शासनाने दुष्काळ जाहीर केल्यामुळे दुष्काळी अनुदान केव्हा मिळेल या विवंचनेत शेतकरी होते. शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाने पहिल्या टप्प्यात १३ कोटी २९ लाख रुपायांचा निधी तहसील कार्यालयाला पाठविला आहे. ऑनलाइन पध्दतीने संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तो लवकर जमा होणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या गावागावात तलाठ्याकडून याद्या बनविणे चालू आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बँक खाते नंबर नाही त्याच्यासाठी तलाठी मंडळीकडून बँक खाते जमा करण्याची मोहीम जोरात सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांची यादी तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात लावली आहे.
एकरी २,७५० रुपये
६८ रुपये गुंठ्याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. हेक्टरी ६,८०० रुपये व एकरी २,७२० रुपये या प्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. तलाठ्यांनी बँक खाते नंबर तहसील कार्यालयाला दिल्यानंतर तत्काळ या मदतीचे वाटप केले जाणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
January 19, 2016, 11:28 am
वाळूजः कामगार व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिटू कामगार संघटनेने मंगळवारी बजाजनगरातील मोरे चौकात जेलभरो आंदोलन केले. आंदोलनातील २५ महिलांसाह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
सिटू-किसान आणि शेतमजूर युनियनतर्फे कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारला जागे करण्यासाठी दुपारी १२ वाजता महाराणा प्रताप चौकातून मोर्चा काढून मोरे चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यमान सरकारवर कामगारांच्या प्रश्नाना बगल देत असल्याचा आरोप उध्दव भवलकर यांनी केला. यावेळी लक्ष्मण साक्रुडकर, पंडित मुंडे, श्रीकांत पाटील, सतीश कुलकर्णी, शंकर नन्नुरे, श्रीकांत पोपटे, भगवान भोजने, तनुजा जोशी, विश्वनाथ शेळके, नितीन देशमुख यांच्यासह शेकडो आंदोलकांनी सहभाग नोंदविला.
एमआयडीसी वाळूज व वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, धनंजय येरूळे पोलिस उपनिरीक्षक राहुल भदरगे, रावसाहेब जोंधळे, सुर्वणा देगलूकर आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी आंदोलनकर्तांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 19, 2016, 11:29 am
म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन बाजार समितीच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्षात पळापळ सुरू झाली आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता गेल्यामुळे बडे नेते राजकीय आश्रयस्थान मिळवण्यासाठी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू वरकड हे उद्या २९ समर्थक कार्यकर्त्यांसह मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
शिवसेना प्रवेशासंदर्भात प्राथमिक बैठकाही झाल्या असून मातोश्रीवर प्रवेश सोहळा होणार असल्याचे सुत्रांकडून समजते. थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा व्हावा यासाठी कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस व मनसेला मोठा हादरा बसणार आहे. गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेना भक्कम करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे. अलीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये झालेल्या पद वाटपामुळे हिरमोड झालेल्या काही नेत्यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजू वरकड यांच्याशी संपर्क साधला आता त्यांनी शिवसेना प्रवेशाला दुजोरा दिला आहे. शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना प्रवेशाबाबत अंतिम चर्चा झालेली असून त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही झटका बसण्याची शक्यता आहे. मनसेचे हर्षल हिवर्डे यांनी शिवसेना सहसंपर्कप्रमुख माजी आमदार अण्णासाहेब माने यांची भेट घेऊन युवासेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
एका दगडात दोन पक्षी
आमदार बंब यांच्या ताब्यातील खुलताबाद नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी एमआयएमने तयारी सुरू केली आहे. आमदार इम्तियाज जलील यांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने खुलताबादेत संपर्क वाढविला आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना शह देण्यासाठी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन बाजार समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने एकीकडे आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. इतर पक्षातील नाराजांनाही ओढण्याची तयारी झाली आहे. जुने नवे शिवसैनिकांना एकत्र आणून संघटना बांधणी सुरू झाली आहे. नाराज कार्यकर्त्यांना अशासकीय समिती तसेच संघटनात्मक पदे देऊन खूश केले जाण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 19, 2016, 11:31 am
म. टा. प्रतिनिधी, पैठण
तालुक्यातील नदीपात्रात तस्करांनी उच्छाद मांडला आहे. ठिकठिकाणी अवैध वाळू उपसा जोरात सुरू आहे. त्यामुळे गोदाकाठच्या भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. या गावांमध्ये उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई जाणवणार असून वाळू चोरी रोखावी अशी मागणी वाघाडी, मायगावच्या, वडवलींच्या ग्रामपंचायत सदस्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. मात्र, प्रशासन याकडे गांभीर्याने पहात नाही.
मागच्या एक महिन्यापासून जुने कावसन, मौलाना साहब दर्गा, आयटीआय, वडवली, वाघाडी, मायागाव, नायगाव, टाकली अंबड, हिरडपुरीसह तालुक्यातील बहुतांश गोदाकाठ गावांच्या गोदापात्रात वाळू चोरी सुरू झाली आहे. वाळू चोर
जेसीबी मशिनच्या सहाय्याने नदीपात्रात जवळपास तीस ते पस्तीस फूट खोल खणून वाळूचे उत्खनन करून वाळू चोरी करत आहेत. गोदावरी नदीवरील हिरडपुरी व आपेगाव बंधारे पूर्णपणे कोरडे पडल्याने तस्करांना वाळू चोरी करण्यास कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे दिवसरात्र वाळूचा भरमसाठ उपसा सुरू आहे.
यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून या भागातील भूगर्भातील पाणी पातळीस धोका निर्माण झाला आहे. भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली जात आहे. परिणामी आगामी उन्हाळ्यात या भागात तीव्र पाणी टंचाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावातील वाळूचोरी रोखावी यासाठी मायगाव वाघाडीच्या सरपंच लताबाई घटे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलिस अधीक्षकांना निवेदन दिलेले आहे. तर आठ दिवसात वाळू चोरी थांबली नाही तर उपोषण करू, इशारा वडवलीचे ग्राम पंचायत सदस्य गणेश पवार यांनी दिला आहे.
आगामी उन्हाळ्यात आम्हाला पाण्यासाठी तरसावे लागणार आहे. वाळू चोरी रोखावी अशी मागणी मी मागच्या एक महिन्यापासून पैठणचे तहसीलदार किशोर देशमुख यांच्याकडे करत आहे. मात्र, कोणतीही कारवाई झालेली नाही.
- गणेश पवार, ग्रामपंचायत सदस्य, वडवली
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 19, 2016, 11:36 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केळगाव मुर्डेश्वर (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) येथे जमिनीच्या वाटपावरून सावत्र पित्याचा चाकू-कुऱ्हाडीचे घाव घालून खून करणाऱ्या मुलाला तसेच दुसऱ्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी मंगळवारी (१९ जानेवारी) ठोठावली.
या प्रकरणी हर्षल पुंडलिक इंगळे (२८, रा. केळगाव मुर्डेश्वर, ता. सिल्लोड) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मृत पुंडलिक संपत इंगळे यांचा विवाह आधी कांताबाई व नंतर आरोपी छायाबाई यांच्याशी झाला होता. मृत पुंडलिक इंगळे हे कांताबाई व दोन मुलांसह राहत होते, तर त्यांच्या शेजारी आरोपी व दुसरी पत्नी छायाबाई, तिचा मुलगा व आरोपी दिपक हे राहात होते.
आरोपी दिपक व आरोपी छायाबाई हे मृत पुंडलिक इंगळे यांच्याशी जमिनीच्या वाटपावरून नेहमी भांडणे करीत होते. २३ एप्रिल २०१० रोजी पुंडलिक यांचा मुलगा व फिर्यादी हर्षल याचे लग्न होणार होते. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या लग्नाच्या पत्रिकेत आरोपी छायाबाई व आरोपी दिपक यांची नावे नसल्यावरून दोन्ही आरोपींनी २८ मार्च २०१० रोजी पुंडलिक यांच्याशी वाद घातला. त्याचरात्री घरालगत कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागल्याने, पुंडलिक, हर्षल व कांताबाई हे आवाजाच्या दिशेने पाहण्यासाठी गेले असता तिथे आरोपी छायाबाई व आरोपी दिपक हे रात्री साडेदहाच्या सुमारास शेतातील कापूस चोरून वेचताना आढळून आले. त्यावेळी लग्नानंतर वाटणी करू, असे पुंडलिक यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावरून आरोपींनी पुंडलिक यांच्याशी वाद घातला आणि वादाचे रूपांतर भांडणात व भांडणाचे रूपांतर हाणामारीत सुरू झाले. त्यावेळी आरोपी दीपक याने हर्षल यांच्यावर चाकूने वार केला. त्यानंतरही समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुंडलिक यांच्या छातीवर दीपकने गंभीर वार केले. त्याचवेळी आरोपी छायाबाई हिने हर्षल व पुंडलिक यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. त्यात पुंडलिक खाली कोसळताच दोन्ही आरोपी पळून गेले. त्यानंतर जखमी हर्षल यांनी पुंडलिक यांना सिल्लोडच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी फिर्यादी हर्षल यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक (कै.) जी. एन. कानडे यांनी केला होता.
पृथक्करण अहवाल ठरला महत्वाचा
या खटल्यावेळी सरकार पक्षाकडून एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी प्रत्यक्ष साक्षीदार व फिर्यादी हर्षल, कांताबाई इंगळे व घाटीतील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास झिने यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच रासायनिक पृथक्करणाचा अहवालही महत्वाचा ठरला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने दोन्ही आरोपींना जन्मठेप तसेच प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला. सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
January 19, 2016, 11:37 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पर्यटनासाठी बाहेरगावी गेलेल्या नागरिकाचे घर फोडून चोरट्यांनी ३६ हजारांचा ऐवज लांबवला. राणा नगर येथे गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास अनंत उंटवाले (वय ६० रा. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, राणानगर, जालना रोड) हे नागरिक कुटुंबासहित ७ जानेवारी रोजी पर्यटनासाठी बाहेरगावी गेले होते. शनिवारी ते घरी परतले. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या किचनच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला. घरातील सोन्याचांदीचे दागिने, देवी देवतांच्या मूर्ती, रोख रक्कम व एलईडी असा ऐवज त्यांनी चोरून नेला. घरी परतल्यानंतर हा प्रकार उंटवाले यांच्या लक्षात आला. त्यांनी पोलिस ठाणे गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 19, 2016, 11:38 am
औरंगाबाद : डॉ. चित्रा डकरे खुनप्रकरणाला तब्बल दीड महिना उलटला आहे. अद्यापही पोलिसांच्या तपासाला यश आलेले नाही. दरम्यान, त्यांच्या हिवरखेड (ता. मोर्शी) या मूळ गावी गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी भेट देत त्यांच्या पुतण्याची चौकशी केली. मात्र, या चौकशीमध्ये ठोस अशी माहिती समोर आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हडको एन ९ परिसरातील विमलज्योती हौसिंग सोसायटीमध्ये २ डिसेंबर २०१५ रोजी डॉ. चित्रा डकरे यांचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता. त्यांचे हातपाय चोरट्यांनी बांधले होते. दीड महिना उलटला तरी या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. डॉ. चित्रा डकरे व त्यांचे पती दिनेश डकरे हिवरखेड ता. मोर्शी, जि. अमरावती येथील रहिवासी आहेत. मुलीला भेटण्यासाठी ते औरंगाबादला आले होते. पोलिसांच्या पथकाने यापूर्वी त्यांच्या मूळ गावी जाऊन नातेवाईकांची चौकशी केली होती. दरम्यान, या तपासामध्ये काही बाबी खटकल्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक व राजपूत व त्यांचे पथक दोन दिवसांपूर्वी हिवरखेड येथे जाऊन आले. यामध्ये डकरे यांच्या पुतण्याची चौकशी करण्यात आली. मात्र, यामध्ये पोलिसांच्या तपासाला दिशा देईल अशी मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लाखाचे पारितोषिक पडून : या गुन्ह्यासंदर्भात माहिती असल्यास ती कळविणाऱ्याला पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी एक लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. मात्र, गुन्ह्याला पूरक ठरेल, अशी कोणतीही माहिती पोलिसांना अद्यापपर्यंत मिळालेली नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 19, 2016, 11:38 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आरोग्यास हानीकारक असा इशारा लिहिलेला नसलेल्या विदेशी सिगारेट विकणाऱ्या राका ट्रेडर्सवर सिटीचौक पोलिसांनी छापा टाकत दोघांना अटक केली. मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधवमंडी बांबू मार्केट येथील राका ट्रेडर्स येथे विदेशी सिगारेट विक्री केल्या जात होत्या. या सिगारेटवर आरोग्यास हानीकारक असा वैधानिक इशारा लिहिलेला नव्हता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पीएसआय गंभीरराव व पथकाने या दुकानावर छापा टाकला. दुकानामध्ये ब्लॅक, पॅरिस व रॉयल लिव्हर या विदेशी सिगारेटचा साठा आढळून आला. दुकानमालक संजय जेवरीलाल राका व मयुर संजय राका (दोघे रा. महावीर चौक) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २००३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 19, 2016, 11:39 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरासमोर कचरा जाळण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता जयभीमनगर, टाऊन हॉल येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाईदा शेख यांचे जयभीमनगर येथे किराणा दुकान आहे. सोमवारी सकाळी त्यांनी दुकानातील कचरा झाडून घराच्या बाजूला जाळला. घरासमोर कचरा जाळण्याच्या कारणावरून त्यांचा शेजाऱ्यासोबत वाद झाला. यावेळी त्यांनी दिलेल्यात तक्रारीत आरोपी सुनीता बोर्डे, कांचन म्हस्के, सुनीता म्हस्के, अरूण म्हस्के, मंगल व नाना म्हस्के यांनी शेख यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला मारहाण केली. नाना म्हस्के यांनी यावेळी तिचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात दुसऱ्या गटाने देखील तक्रार दिली आहे. यामध्ये घरासमोर कचरा जाळू नका, असे सांगितल्याने त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी शेख आयुब, नाईदा शेख अयुब, शबनम युसूफ शेख, शेख शायद नवाब, मुन्नी नवाब शेख, आशू शेख यांच्याविरुद्ध मारहाण व अयुब शेखविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
January 19, 2016, 11:42 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वडिलांनी रेल्वेत सोडलेल्या व लग्नाचे आमिष दाखवून दोन महिने शोषण केलेल्या पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री साडेदहा वाजता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बदनापूर पोलिसांना माहिती कळविल्यानंतर अवघ्या दोन तासात आरोपी व त्याच्या काकूला ताब्यात घेण्यात आले. पीडित तरुणीवर घाटीमध्ये पोलिस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बेगमपुऱ्यातून गुन्हा बदनापूर व नंतर जालन्याला वर्ग करण्यात आला आहे.
पूर्णा येथील २२ वर्षांच्या तरुणीला तिच्या वडिलांनी झोपेत असताना रेल्वेत सोडण्याचा प्रकार नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सणाच्या दोन दिवस अगोदर घडला. यानंतर धोपटेश्वर (ता. बदनापूर) येथील प्रल्हाद खोजेकर या मजुराने तिला लग्नाचे आमिष दाखवित घरी नेले व दोन महिने तिचे लैंगिक शोषण केले. या कामी त्याला त्याच्या काकूने सहकार्य केले. गेले दोन महिने या तरुणीला डांबून ठेवले होते.
वर्गाच्या फेऱ्यात गुन्हा अडकला
ही तरुणी घाटी परिसरात आढळल्याने सुरुवातीला बेगमपुरा पोलिस ठाण्यात बलात्कार, डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, बलात्काराचा हा प्रकार धोपटेश्वर येथे घडल्याने बदनापूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला. या गुन्ह्याची सुरुवात जालना रेल्वेस्टेशनवर झाल्याने बदनापूर पोलिसांनी हा गुन्हा कदीम जालना पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास किती गांर्भियाने होणार आहे, याबाबत साशंकता आहे.
अशी केली सुटका
या लैंगिक शोषणामुळे त्रस्त झालेल्या या तरुणीने शुक्रवारी रात्री खोजेकर कुटुंब झोपल्यानंतर पलायन करीत बदनापूर रेल्वेस्टेशन गाठले. मात्र, खोजेकर कुटुंबाने तिचा शोध घेतला. तिला स्टेशनवरच मारहाण करण्यात आली. रविवारी तरुणीने धाडसाने पुन्हा पलायन करीत औरंगाबाद गाठले. घाटी हॉस्पिटलच्या शेडमध्ये ती एक दिवस थांबली होती. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिला उपचारासाठी घाटीत दाखल केले. तिच्यावर वॉर्ड क्रमांक २९ मध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिसांची दिशाभूल
बेगमपुरा पोलिसांनी बदनापूर पोलिसांना सोमवारी रात्री गुन्हा दाखल केल्यानंतर माहिती दिली. अवघ्या दोन तासात धोपटेश्वर गाठून प्रल्हाद व त्याच्या काकूला ताब्यात घेण्यात आले. प्रल्हाद हा विवाहित असून लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली आहे. प्रल्हादने यावेळी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जालना रेल्वेस्टेशनवर पीडित तरुणीने आपल्यासोबत ओळख वाढविली. ती स्वखुषीने आपल्या घरात राहत होती. तसेच गुरुवारी तिला पूर्णा येथे जाण्यासाठी आपण रेल्वेस्टेशनला सोडल्याची माहिती त्याने दिली. मात्र, प्रत्यक्षात आपण पळून जात स्वतःची सुटका केल्याची माहिती या तरुणीने दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 19, 2016, 11:43 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उशिरा आल्याच्या कारणावरून महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या टेम्पोच्या चालकाला तरुणाने मारहाण केली. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता राजाबाजार, गवळीवाडा येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख जमील शेख इक्बाल शेख (रा. हर्षनगर, लेबर कॉलनी) हा तरूण महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या टेम्पोवर चालक म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता वॉर्ड क्रमांक ४७ राजाबाजारमधील गवळीवाडा येथे कचरा उचलण्याचे काम सुरू होते. यावेळी आरोपी उमेश खुन्नीवाले (रा. गवळीवाडा) हा तरुण त्या ठिकाणी आला. गाडी उशिरा का आणली, असा जाब विचारला. यावेळी जमीलने ही आपली दुसरी फेरी असल्याची माहिती दिली. या गोष्टीचा राग आल्याने उमेशने शिवीगाळ करीत जमीलला मारहाण केली. 'पुन्हा गाडी उशिरा आणली तर बघून घेईल,' अशी धमकी दिली. याप्रकरणी जमीलच्या तक्रारीवरून उमेशविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 19, 2016, 11:44 am
औरंगाबाद: शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) पेपरफुटीमुळे राज्यात खळबळ उडाली. पेपर रद्द होणार की काय, याबाबत अद्याप विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत जेथे पेपर फुटला त्याच जिल्ह्यात पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत. डीटीएड, बीएड स्टुंडट असोशिएशनतर्फे याबाबत निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १६ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेतील पहिल्या क्रमांकाचा पेपरफुटीमुळे राज्यभर खळबळ उडाली. याप्रकरणी बीड आणि पुण्यात गुन्हे दाखल झाले. यानंतर पेपर रद्द करणार की काय, याबाबत शासनस्तरावरून मंगळवारी सायंकाळपर्यंत कोणताही निर्णय झालेला नव्हता. पूर्णपणे पेपर रद्द करण्यात येऊ नये. ज्या जिल्ह्यामध्ये प्रश्नपत्रिका फुटली होती, त्याच जिल्ह्यातील परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दुष्काळाचा विचार करत विद्यार्थ्यांना नव्याने परीक्षा देणे आर्थिक नुकसानीचे आहे. त्यामुळे याचा शासनाने विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे. विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर अध्यक्ष संतोष मगर, सचिन चौधरी, तजेश मोगले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 19, 2016, 10:30 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील गुड्डू हा पिवळा वाघ मंगळवारी सकाळी दगावला. पिंजरा स्वच्छ करण्यासाठी त्याला दुसऱ्या पिंजऱ्यात नेले होते. पिंजरा स्वच्छ करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या आघातामुळे पिंजरा स्वच्छ करणारे सेवकही हबकले.
गुड्डू आणि दीप्ती ही पिवळ्या वाघाची जोडी पंजाबमधील 'चतबीर झू'मधून आणली होती. १९९८मध्ये या दोघांचा जन्म झाला. औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयात त्यांना २०००मध्ये आणण्यात आले. त्यावेळी ते दोन वर्षांचे होते. गुड्डू आणि दीप्तीमुळे प्राणिसंग्रहालयातील पिवळ्या वाघांचा पाळणा हालत गेला. प्राणिसंग्रहालयात नऊ पिवळे वाघ होते. त्यापैकी नकुल आणि दुर्गा यांना शनिवारी मध्यप्रदेशातील मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयासाठी पाठवण्यात आले. आज एका वाघाचा मृत्यू झाला. त्यामुळे संग्रहालयात सहा वाघ शिल्लक राहिले आहेत.
गुड्डू काल सायंकाळी तंदुरुस्त होता. पिंजऱ्यात त्याला मोकळे सोडण्यात आले होते. रात्री त्याला नेहमीप्रमाणे जेवणही देण्यात आले. आज सकाळी साडेआठ वाजता गुड्डू आणि दीप्तीचे केअरटेकर चंद्रकांत काळे यांनी दोघांचे पिंजरे स्वच्छ करण्यासाठी त्यांनी पिंजऱ्याच्या आवारात प्रवेश केला. आतल्या बाजूला एकाला एक लागून पाच पिंजरे आहेत. त्यातील एका पिंजऱ्यात गुड्डू तर, दुसऱ्यात दीप्तीला ठेवण्यात आले होते. गुड्डूचा पिंजरा स्वच्छ करण्यासाठी काळे यांनी त्याला शेजारच्या रिकाम्या पिंजऱ्यात हलविले आणि पाइपने पाण्याचा फवारा मारत पिंजरा स्वच्छ केला. त्यानंतर गुड्डूवर पाण्याचा फवारा मारून त्याला स्वच्छ करण्यासाठी काळे वळाले. गुड्डू पिंजऱ्यात झोपला होता. त्यांनी त्याला हाताने हालवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठला नाही. त्याने हालचालही केली नाही. त्यामुळे काळे एकदम हबकले. पाइप खाली टाकून त्याने प्राणी संग्रहालयाच्या संचालकांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. गुड्डू दगावल्याची माहिती त्यांनी कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर एकच धावपळ सुरू झाली. संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे प्राणी संग्रहालयात पोचले. त्यांच्या पाठोपाठ महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ आले. प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास गुड्डूवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ह्रदयविकाराच्या झटक्याचे कारण
गुड्डूचा मृत्यू उतारवयामुळे व मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे झाल्याचे, पोस्टमार्टेमनंतर पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मनोहर देवरे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'गुड्डूची उजवी किडनी आकाराने लहान व उजवी किडनी मोठी होती. यकृतामध्ये गाठी झाल्या होत्या आणि त्याला ह्रदयविकाराचा झटका देखील आला होता. वाघाचे सरासरी वय १८ ते २० वर्ष असते. गुड्डू १८ वर्षांचा होता. गुड्डूच्या शरीरामधील काही अवयव तपासणीसाठी पुणे येथील विभागीय रोग अन्वेषन प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.' पोस्टमार्टेम करताना पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. टी. काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नाकर नागापूरकर, डॉ. बी. एन. येळावार आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
January 20, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील वडोदबाजार येथील आठवडी बाजारात जळगांव जिल्ह्यातून विकण्यासाठी आणलेल्या चोरीच्या तीन शेळ्या व इंडिका कार, असा दोन लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे
चोरीच्या शेळ्या विकण्यासाठी वडोदबाजार येथील आठवडी बाजारात येत असल्याची माहिती वडोदबाजार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. यावेळी सोमवारी सायंकाळी पाच वाजता खामगाव फाट्यानजिक फरशी येथील गायरानातून जाणारी संशयित इंडिका कार (एम एच ०१, ए एम ४१६१) पोलिसांना आढळून आली. त्यात तीन शेळ्या होत्या. हेडकॉन्स्टेबल जनार्दन राठोड व गणेश कोरडे यांनी शेळ्यांसह कार ताब्यात घेतली. याप्रकरणी निसार फनातुला मुलतानी (रा. पिरबावडा हल्ली मुक्काम संजयनगर गल्ली नंबर ७, औरंगाबाद), चेतन ढाकरे (रा. मंगरूळ दस्तगीर ता. धामणगांव जि. अमरावती), मसरत सरदार मुलतानी (रा. येवला जि. नाशिक) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना अटक करून मंगळवारी फुलंब्री कोर्टासमोर हजर केले असता जामिनावर मुक्तता केली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एन.पी. शिंदे यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 20, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
दुष्काळाचे अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी व सातबारावर आईचे नाव लावण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना एका तलाठ्याला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. खुलताबाद येथील शिराजी खानावळीत मंगळवारी दुपारी तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख अय्युब शेख पाशा मियाँ (वय ५७, रा. कसाबखेडा ता. खुलताबाद), असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. ते बोडखा, लोणी तलाठी सजा येथे कार्यरत होते. दुष्काळाच्या झळांनी आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे या प्रकरणावरून लक्षात येते. तक्रारदाराने डिसेंबर २०१५ मध्ये तलाठी शेख अय्युब याच्याकडे अर्ज केला होता. बोडखा येथील गट नंबर २३३ मधील सातबारा उताऱ्यामधून आईचे नाव कमी करणे व सावखेडा येथील गट नंबर १५ मधील सातबारामध्ये स्वतःसह आईच्या नावाची नोंद घेणे आणि शासनाकडून आलेले अनुदान खात्यावर जमा करणे यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष तक्रारींची पडताळणी केली. तत्काळ लाच आणून दे, असे तलाठ्याने सांगितले. लाचलुचपत पथकाने तत्काळ सापळा रचून शेख अय्युब याला लाच घेतांना पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी, उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. एस. शेगोकार, प्रमोद पाटील, गणेश पंडुरे, अश्वलिंग होनराव, सचिन शिंदे, नितीन घोडके, सहायक फौजदार दिलीप राजपूत यांच्या पथकाने केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 20, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वच्छता कराच्या माध्यमातून गोळा झालेले ११ कोटी ३१ लाख रुपये महापालिकेने स्वच्छतेच्या कामावर खर्च न करता ही रक्कम कंत्राटदारांच्या खिशात टाकली आहे. त्यामुळे शहराची स्वच्छता बाजूलाच राहिली, पण विकास कामांच्या नावाखाली कंत्राटदार व अधिकाऱ्यांची चांदी झाल्याचे बोलले जात आहे. परिणामी शहराला कचऱ्याचा विळखा पडला आहे.
महापालिका क्षेत्रातील प्रत्येक घरातून, व्यावसायिक मालमत्तेतून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्यात यावा, तो घराच्या ठिकाणी किंवा दुकानांच्या ठिकाणीच जमा केला जावा. तेथून तो थेट कचराडेपोवर पाठवण्यात यावा या आदर्श संकल्पनेतून महापालिकेने २०१२-१३मध्ये स्वच्छता कर आकारणीचा फंडा काढला. यासंदर्भातील प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर
ठेवण्यात आला.
सर्वसाधारण सभेनेही त्याला मान्यात दिली. या प्रस्तावानुसार महापालिकेने निवासी मालमत्तांसाठी १०० रुपये तर, व्यावसायिक मालमत्तांसाठी ५०० रुपये स्वच्छता कर आकारणे सुरू केले. २०१२-१३पासून २०१५-१६ पर्यंत मालमत्ता कराच्या नोटीसच्या माध्यमातूनच स्वच्छता कराची आकारणी करण्यात आली.
महापालिकेच्या नोंदीनुसार १ लाख ९४ हजार मालमत्ता आहेत. त्यापैकी २२ हजार २०० मालमत्ता व्यावसायिक आहेत. निवासी मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी १ कोटी ७१ लाख ८० हजार रुपये तर, व्यावसायिक मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी १ कोटी ११ लाख रुपयांचा स्वच्छता कर जमा केला जातो. चार वर्षांत या करांची रक्कम ११ कोटी ३१ लाख २० हजार रुपये जमा झाली. या झालेल्या रक्कमेतून महापालिकेने घराघरांत, प्रत्येक दुकानात ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या कुंड्या उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्या उपलब्ध करून देण्याची तरतूद स्वच्छता कराच्या प्रस्तावात होती. घरोघरी किंवा दुकानांसमोर जाऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चार वर्षांच्या काळात ओला व सुका कचरा कधीच वेगवेगळ्या पद्धतीने गोळा केला नाही. स्वच्छता कराच्या रक्कमेतून नवीन वाहनांची खरेदी देखील या काळात झाली नाही. त्यामुळे स्वच्छता कराच्या माध्यमातून गोळा झालेला कर कंत्राटदारांची बिले देण्यासाठी खर्च करण्यात आल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. नागरिकांवर आर्थिक बोजा टाकून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम करण्यात आल्याचे बोलले
जात आहे.
कोट्यवधींचा कर तिजोरीत
- शहरातील निवासी मालमत्ता ः सुमारे १ , ७१, ८००
- शहरातील निवासी मालमत्ता ः सुमारे १ , ७१, ८००
- व्यावसायिक मालमत्ता ः २२, २००
- प्रत्येकी शंभर रुपयां वर्षभरात निवासी मालमत्तांकडून जमा होणारा स्वच्छता कर ः १ कोटी ७१ लाख ८० हजार
- प्रत्येकी शंभर रुपयां वर्षभरात व्यावसायिक मालमत्तांकडून जमा होणारा स्वच्छता कर ः १ कोटी ११ लाख
- चार वर्षांत निवासी व व्यावसायिक मालमत्तांकडून जमा झालेला स्वच्छता कर - ११ कोटी ३१ लाख २० हजार
(कर संकलन रुपयांमध्ये)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧