म. टा. प्रतिनिधी, नांदेड
पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवला पाहिजे, पाण्याचा जपून वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. पंडित
दिनदयाल उपाध्याय सेवा प्रतिष्ठान नांदेडतर्फे आयोजित बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी येथे 'सेंद्रिय शेती प्रमाणिकरण योजना, प्रबोधन व उपलब्धता' या विषयावरील कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बागडे हे बोलत होते.
पाचपिंपळी येथील प्रा. माधवराव गोपछडे यांच्या शिवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, भारतीय किसान संघाचे दादा लाड, राम पाटील रातोळीकर, प्रा. माधव गोपछडे, धनाजी देशमुख, डॉ. अजित गोपछडे, तहसीलदार सुरेखा स्वामी, उपविभागीय कृषी अधिकारी एम. टी. गोंडेस्वार,
गटविकास अधिकारी देशमुख, उपसरपंच लक्ष्मण कोत्तापल्ले, विठ्ठलराव उपासे, श्रावण भिंलवडे, बालाजी बच्चेवार, हानगीराव गोपछडे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बागडे म्हणाले, 'मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बिकट परिस्थितीतून जाताना पुढे सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. दुष्काळी परिस्थितीत अशा अनेक शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार नेहमी
मदत करत आहे. गतवर्षात शेतकऱ्यांसाठी सरकारने मदतही देऊ केली आहे. पाऊस नसल्यामुळे अन्न धान्य पिकले नाही. त्यामुळे शेतकरी उपाशी राहू नये यासाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना, मजूरांना अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून कमीतकमी दरात धान्य उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांसाठी कमी दरात खतही उपलब्ध करून दिले आहे. लिंबोळी कोटींगयुक्त खत पुरवठाही केला जाणार आहे. ज्यामुळे २० ते २५ टक्के युरिया खत पिकासाठी कमी लागणार आहे. लिंबोळीचे खत हे पिकांसाठी चांगले असून त्यामुळे पिक चांगले राहते व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. दुष्काळ, गरिबी, टंचाईचे ओझ कमी करायचे असेल तर शेती पिकली पाहिजे.'
निसर्ग आता असंतूलीत झाला असून पावसाची हमी राहिली नाही. वर्षाकाठीचा
पावसाचा प्रत्येक थेंब हा वाचवता आला पाहिजे, असे सांगून विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले, 'शेतकऱ्यांनी आपल्या विहिरी शेताच्या उतारावरच केल्या पाहिजे. विहिरीजवळ पाच ते दहा फूट अंतरावर खड्डा खोदून पावसाचा प्रत्येक थेंब त्यात झिरवला पाहिजे. पावसाचे झिरपलेले पाणी हे विहिरीत उतरते, त्यामुळे विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होते. दुष्काळ परिस्थितीत विहिरीचे पाणी पिकांसाठी उपयोगात आणता येते. यातून शेतकऱ्यांना पिकाचे उत्पादन चांगले मिळू शकते. मनरेगातून विहीर पूनर्भरणाच्या कामासाठी सरकार निधी उपलब्ध करून देते याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. या कामांसाठी ग्रामपंचायत स्तरावर शेतकऱ्यांनी मागणी करावी. या योजनेतून दरवर्षी शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनातून आर्थिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे. वर्षाचे पिक चांगले हातात पडले तर शेतकरी सुखी राहील.'
सुरुवातीला माता सरस्वती व पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सरस्वती प्रतिष्ठान आयोजित ठक्करवाड फॉर्महाऊस येथील गौशाळेचे उद्घाटन बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. तळणी परिसरातील नाला सरळीकरणाच्या कामाची बागडे यांनी पाहणी केली. कार्यशाळेस कोल्हे बोरगाव, पाचपिंपळी, तळणी, लोहगाव, गागलेगाव, तोरणा, कुंभरगाव, दुगाव, हरनाळा, मुस्तापूर व परिसरातील शेतकरी, नागरीक आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन मुकुंद उपासे यांनी केली. ग्रामपंचायत सदस्य नागोराव अंबेराव यांनी आभार मानले.