औरंगाबाद ः औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होऊन २९५ दिवस उलटले; मात्र, वॉर्डांमध्ये कामांसाठी निधीच मिळत नसल्यामुळे नगरसेवक त्रस्त झाले आहेत. वॉर्डांमध्ये देखभाल-दुरुस्तीचीही कामे केली जात नसल्याची खंत नगरसेवक व्यक्त करीत आहेत. नागरिकांच्या प्रश्नांना तोंड देताना प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांची अवस्था बिकट झाली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल २३ एप्रिल २०१५ रोजी जाहीर झाला. त्यानंतर आतापर्यंत, तब्बल २९५ दिवसांत नगरसेवकांना कामांसाठी निधीच मिळालेला नाही. निवडणुकीमुळे पालिके प्रशासनाने चार महिन्यांचे लेखानुदान मंजूर करून घेतले होते. प्रशासकीय खर्चासह अत्यावश्यक खर्चासाठीची त्यात तरतूद केली होती. स्थायी समिती स्थापन झाल्यामुळे पालिकेचे नियमित बजेट लगेचच सादर होईल आणि विकासाच्या कामांना सुरुवात होईल, अशी अाशा नगरसेवकांना होती, पण स्थायी समितीचा अर्थसंकल्प लांबत गेला. पालिकेच्या प्रशासनाने ७ ऑगस्ट २०१५ रोजी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर दोन महिन्यांनी स्थायी समितीने सर्वसाधारण सभेला अर्थसंकल्प सादर केला. तो अंतिम करण्याचे अधिकार सर्व नगरसेवकांनी महापौरांना दिले. अर्थसंकल्प अंतिम करण्याचे काम सध्या महापौरांकडून सुरू आहे.
अर्थसंकल्पच तयार नाही. त्यामुळे कामे कशी करणार, असा प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांनी वॉर्डांतील कामांकडे पाठ फिरवली आहे. वॉर्डात कामेच होत नसल्याची तक्रार करीत नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत व सर्वसाधारण सभेत आवाज उठवला. त्याचा परिणाम म्हणून आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बैठक घेऊन वसुलीच्या प्रमाणात विकास कामे करण्याची भूमिका घेतली. प्रत्येक नगरसेवकाने १५ लाखांची कामे प्रस्तावित करावीत. पहिल्या टप्प्यात ही कामे करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले, मात्र अद्याप ही कामे देखील सुरू झाली नाहीत, अशा तक्रारी आहेत.
वॉर्डात रस्ते तर सोडाच, पण ड्रेनेज, पाणीपुरवठ्याशी संबंधित देखभाल दुरुस्तीची कामेही वॉर्डात झाली नाहीत. अत्यावश्यक कामे झालीच पाहिजेत, पण तिही होत नाहीत. धोरणात्मक निर्णयाच्या नावाखाली कामांमध्ये आडकाठी घातली जाते. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची कोंडी होत आहे.
- नितीन चित्ते, नगरसेवक, भाजप
वॉर्डात विकासकामे करण्याची आश्वासने देऊन निवडून आलो, पण दहा महिन्यांत एकही काम झाले नाही. कामांबद्दल नागरिक प्रश्न विचारतात. त्यांना उत्तरे देताना नाकीनऊ येतात. बजेट नाही, हे ऐकून कंटाळा आला आहे. गरज लक्षात घेऊन छोटी-मोठी कामे झालीच पाहिजेत.
- संगिता वाघुले, नगरसेवक, एमआयएम
जशी वसुली, तशी विकास कामे, असे धोरण आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरले. आता नगरसेवकांच्या वॉर्डात १५ लाखांची कामे होत आहेत. दुसऱ्या टप्प्यात दहा लाखांची कामे होणार आहेत. कामे करून घेणे हे नगरसेवकावर अवलंबून असते.
- रेणुकादास वैद्य, गटनेते, शिवसेना
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट