म. टा. प्रतिनिधी, नांदेड
ग्रंथ हेच गुरु मानून प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळ्या ग्रंथांचे वाचन करून वाचन संस्कृतीला उजाळा द्यावा, तसेच साहित्य वाचनातून वेगवेगळ्या पद्धतीचा विकास घडवून आणावा, असे आवाहन करून वाचन संस्कृती खेड्यापाड्यापर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत, असे मत शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.
नांदेड ग्रंथोत्सवाचे उद्घाटन सोमवारी पार पडले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, तर आमदार हेमंत पाटील, आयुक्त सुशील खोडवेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गंगाधर पटने, मसापचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, प्रख्यात साहित्यिका डॉ. वृषाली किन्हाळकर, श्रीकांत देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती.
आमदार हेमंत पाटील म्हणाले, 'सध्याच्या काळात ग्रंथ विकत घेवून त्याचे वाचन करणे दुर्मिळ झाले आहे. घरात असलेल्या ग्रंथांचा अभ्यास करून त्याचे आकलन करणे महत्त्वाचे आहे. मात्र, आजकाल असे होत नाही. अनेक ठिकाणी वाचनालये निर्माण झाली. मात्र, केवळ अनुदान लाटण्यापुरते त्यांचे काम झाले आहे. अशा केवळ अनुदान लाटणाऱ्या वाचनालय व ग्रंथालयांचा पर्दाफाश झाला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.'
नांदेडमधील वाचन कट्टे मनपाने बंद केली आहेत. ती तात्काळ सुरू करावीत, अशी मागणीही त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी ग्रंथ चळवळीची मोठी परंपरा आहे. संत वाड्मय, अर्वाचीन, प्राचीन, मध्ययुगीन, स्वातंत्र्य चळवळ आणि त्यानंतरचा काळ हे आता जागतिकीकरणाचा प्रवाह यातही साहित्य निर्मिती झाली आहे. समाजाला दिशा देण्यासाठी साहित्याची निर्मिती होवू लागली, असून वाचन संस्कृतीचे माध्यम आणि संदर्भ बदलू लागले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती पोहचविणे यासाठी आता प्रयत्न गरजेचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
कुलगुरु डॉ. विद्यासागर यांनी ज्ञानाष्ठित समाजाच्या निर्मितीत वाचनाचे मोठे महत्त्व आहे. या वाचनातूनच प्रगल्भता होते व मेंदूच्या क्षमतेचा विकास होतो, यामुळे मानवी जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी ग्रंथ वाचन व्हायलाच हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे आणि ग्रंथराज प्रतिकृतीचे यावेळी पूजन करण्यात आले. सूत्रसंचलन देवदत्त साने यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले.
लक्षवेधी ग्रंथदिंडी
ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, आयटीआय चौक येथून आमदार हेमंत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक तु. शं. कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम, बी. जी. देशमुख, ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष गंगाधर पटने, निर्मलकुमार सूर्यवंशी आदींच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. पालखीत राज्यघटना आणि विविध ग्रंथ ठेवण्यात आले होते. टाळ मृदंग, ढोलताशे, दिंड्या, पताका, वासुदेव यांच्यामुळे ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. वाघ्या-मुरळी, वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगामुळे दिंडीत उत्साहाचे वातावरण होते. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनीही ग्रंथदिंडीत सहभाग घेऊन, वाचाल तर वाचालच्या घोषणांनी चैतन्य निर्माण केले.