मराठवाड्यासाठी पहिल्या टप्प्यात मिळालेल्या ११५६ कोटी ३८ लाख अनुदान वाटपाचे विभागीय प्रशासनाचे प्लानिंग फिस्कटले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अनुदान वाटपाची कालमर्यादा ठरवली असतांना आतापर्यंत केवळ ८७ टक्केच अनुदानाचे वाटप झाले आहे. बहुतांश अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असले तरी परभणी जिल्ह्यात केवळ ४१ टक्के तर जालना जिल्ह्यात केवळ ६२ टक्के अनुदान वाटप झाले आहे.
मराठवाड्यात भीषण दुष्काळामुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. शासनाकडून कापूस वगळून इतर कोरडवाहू पिकांसाठी अनुदान देण्याकरिता २ हजार ६९ कोटी २७ लाख रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली. यातील पहिल्या टप्प्यातील ११५६ कोटी ३८ लाख रुपयांचा पहिल्या टप्प्यातील निधी उपलब्ध करून देण्यात आला. शासनाने अनुदानाची घोषणा केल्यानंतर काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते मात्र ही आशाही जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे धुळीस मिळाली आहे. अनुदान वाटपासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाने कालबद्ध कार्यक्रम आखून दिला होता १५ फेब्रुवारीपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या गावनिहाय व बँकनिहाय याद्याप्रमाणे रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावयाचे होते, यानुसार अनुदान प्राप्त झाल्यानंतर बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटप पूर्ण झाले मात्र जालना आणि परभणी जिल्ह्यामध्ये अनुदान वाटपाची प्रक्रीया अत्यंत संथ गतीने आहे. जालना जिल्ह्याला २२१.४७ कोटी रुपयांची आवश्यकता असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी १२३ कोटी ८० लाख रुपये प्राप्त झाले. मात्र, आतापर्यंत केवळ ७७ कोटी (६२ टक्के) रुपयेच वाटप करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातील अनुदान वाटपाची अवस्था बिकट असून प्राप्त झालेल्या १११ कोटी रुपयांपैकी केवळ ४६ कोटी (४५ टक्के) रुपयांचेच वाटप झाले आहे.
विभागीय आयुक्तांनी केली कानउघाडणी
जालना व परभणी जिल्ह्याच्या अनुदानवाटपाच्या पिछाडीमुळे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी जिल्हा प्रशासनाची कानउघाडणी केली व तत्काळ अनुदान वाटपाच्या सूचना दिल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उर्वरीत निधीसाठी प्रस्ताव
अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ९१३ कोटी रुपयाचे अनुदानाची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मागणी करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून ज्या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यातील निधीचे वाटप पूर्ण झाले आहे अशा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान वाटप करता येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट