सिटीस्कॅन क्राइम दोषसिद्धीसाठी सर्वांचा सहभाग गरजेचा पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित नुकतेच कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसाच्या दौऱ्यावर औरंगाबादला येऊन गेले. गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी, शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी आता तक्रारदाराची व्हिडिओ शुटींग व त्याच्याच हस्ताक्षरात तक्रार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोर्टामध्ये फक्त तक्रारदारच फितूर झाल्याने आरोपी निर्दोष सुटतात का? तपासाची पद्धत, पुरावे अशा अन्य बाबी देखील याला कारणीभूत असू शकतात. याकरीता दाखल झालेल्या तपासामध्ये तपासी अधिकाऱ्यांना देखील महत्वाची भूमिका बजावणे गरजेचे आहे. पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी दोन दिवसाच्या आढाव्यामध्ये औरंगाबाद शहर, औरंगाबाद परिक्षेत्र व नांदेड परिक्षेत्रातील गुन्हे व त्याच्या दोषसिद्धीचा आढावा घेतला. २०१४ साली कोर्टात दाखल केलेल्या खटल्यांपैकी ९ ते १० टक्के खटल्यामध्ये आरोपीचे दोष सिद्ध होऊन त्याला शिक्षा झाली आहे. २०१५ मध्ये हे प्रमाण चांगलेच बदलले. दोषसिद्धीचे प्रमाण वाढून ३२ ते ३८ टक्क्यावर त्याची आकडेवारी आली. मात्र, यापेक्षा समाधानकारक टक्केवारी महासंचालकाना अपेक्षित आहे. त्यांनी केलेल्या विधानामध्ये तक्रारदार कोर्टात बदलतो. माझी अशा स्वरुपाची तक्रार नव्हती, पोलिसांनी वेगळेच लिहून घेतले. अशी ओरड त्याची असते. याचा परिणाम कोर्टापुढे आलेल्या खटल्यावर होतो. परिणामी याचा फायदा आरोपीला होऊन तो निर्दोष सुटतो. यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. यावर उपाय म्हणून आता तक्रारदार पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांच्याच शब्दात, त्याच्याच हस्ताक्षरात तक्रार घेण्याच्या सूचना आहेत. तसेच त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी तक्रारदार कोर्टात फितूर झाल्यास हा पुरावा पोलिसांच्या नक्कीच कामी येणार आहे. त्याचा परिणाम देखील सकारात्मक येणार यात शंका नाही. तक्रार घेणाऱ्या पोलिसांचे काम काही अंशी वाढणार आहे. मात्र, त्याचा फायदा देखील पोलिसांनाच होणार आहे, परंतु खटल्याची दोषसिद्धी केवळ तक्रारदाराच्या फितूर होण्यावरच आहे का, हा देखील कळीचा मुद्दा आहे. एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना त्यातील छोट्या बाबी देखील पुरावा म्हणून महत्वाच्या ठरू शकतात. तपास अधिकारी यामध्ये किती तन्मयेतेने तपास करतो यावर देखील सर्व काही अवलंबून आहे. पंचनामे, पुरावे, साक्षीदाराचे जबाब, तपास टिपण, मुद्देसूद केलेला तपास या गोष्टी देखील यामध्ये महत्वाच्या आहेत. तक्रारदार भलेही ठाम असेल मात्र साक्षीदारच फितूर झाल्यास दोषसिद्धीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तपास अधिकाऱ्यानेच जर तपासात गलथानपणा केला असेल तर त्याचे वाभाडे नक्कीच कोर्टात निघणार, त्याचा देखील आरोपीला फायदा होणार हे देखील निश्चित आहे. आता कोर्टात दोषारोपपत्र पाठवताना ते पडताळणी समितीकडून तपासून पाठवण्यात येते. त्यामुळे अनेक त्रुटी लक्षात येऊन त्या दूरही केल्या जातात. महासंचालकांनी तक्रारदाराचे व्हिडिओ शुटींग करून त्याच्याच शब्दात तक्रार घेण्याचा केलेला निर्णय स्तुत्य आहे. मात्र, त्यासोबत शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी सबंधित तपास यंत्रणेनेही हातचे न राखता झोकून काम करणेही गरजेचे असल्याचे नमूद करावे वाटते. vijay.deulgaonkar@timesgroup.com
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट