अरुण समुद्रे, लातूर
लातूर जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामांनी वेग घेतला आहे. गेल्या वर्षी ही चांगली कामे झाले होती. यंदाही कामांना वेग आला आहे. खरोसा, रामवाडी येथील कामे वेगाने सुरू आहेत. येत्या काळात कामे पूर्ण होण्यासाठी लोकप्रतिनिधीचा निधी गावसमितीला द्यावा अशी मागणी होत आहे.
औसा तालुक्यातील खरोसा, रामवाडी या गावात राज्यसभेचे सदस्य खासदार संजय काकडे यांच्या खासदार निधीतून नाला सरळीकरण आणि खोलीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. खरोसा येथील नाला सरळीकरण कामाची सुरुवात फिनिक्स फाउंडेशनचे संचालक परवेझ पटेल, उपसरपंच भानुदास डोके यांच्या हस्ते झाले.
औसा तालुक्यातील बुधडा गावाचे नाला सरळीकरणाचे काम गेल्या वर्षी लोकसहभाग आणि आमदार बसवराज पाटील यांच्या निधीतून करण्यात आले. बुधडा नाला सरळीकरणाचे काम शिरपूर पॅटर्न प्रमाणे झाले आहे. याकामासाठी गावकऱ्यांनी लोकसमिती निर्माण केली होती. या समितीकडे सहा लाख २० हजार रुपयांचा लोकवाटा जमा झाला होता. या लोकवाट्यातून ३९ हजार ९८७ घनमीटर इतके काम झाले आहे. शासकीय यंत्रसामुग्रीच्या साह्याने सात हजार ७८६ घनमीटर झाले आहे. आमदार निधी पाच लाख ९८ हजार मंजूर झाला होता. त्या निधीतून शासकीय नियमानुसार काम केल्यामुळे अवघे सात हजार २८४ घनमीटर इतके काम झाले आहे. या कामासाठी शासकीय दर हा प्रति घनमीटर ३२ रुपये इतका मान्य आहे. परंतु, लोकसमितीने लोकवाट्यातून हेच काम अवघे साडेपंधरा रुपयांच्या दराने करून घेतले आहे.
या विषयी बोलताना बुधड्याच्या लोकसमितीचे अध्यक्ष प्राध्यापक नागनाथ कनामे म्हणाले, 'जलयुक्त शिवारच्या कामासाठी सरकारने नियम शिथिल करून आमदार, खासदार यांच्या निधीतून करावयाची कामे हे मजूर सोसायट्यामार्फत न करता मंजूर झालेली सर्व रक्कम ही लोकसमितीच्या खात्यावर जमा करावीत. त्यामुळे आम्ही कमी पैशात जास्त कामे करून घेऊ शकतो हे गावो गावी सिद्ध झाले आहे.'
रामेगावच्या शिवारात ही सध्या पाऊन किलो मीटर इतके काम खासदार संजय काकडे यांच्या निधीतून पूर्ण झाले आहे. पुढील कामांसाठी गावकऱ्यांनी पाच लाख रुपये लोकवाटा जमा केला आहे. नियोजित कामासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि मुंबई मॅरेथॉन ही संस्था मदत करणार असून तब्बल नऊ किलो मीटरचे काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती रामेगावचे सरपंच राजेंद्र शेळके यांनी दिली.
खरोसा आणि रामेगाव या शिवारातील पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याचे सांगून खरोशाचे सरपंच भानुदासराव डोके म्हणाले, 'या नाला खोलीकरणातून निघालेली सर्वच माती ही कसदार नसल्यामुळे शेतकरी घेऊन जात नाहीत. ती नाल्याच्या बाजूला सध्या टाकली आहे. त्यामुळे नाल्याला आणि शेतकऱ्यांच्या शेतीला ही तो धोका आहे. त्यामुळे या गेरुचा अधिक भरणा असलेल्या मातीची विल्हेवाट सरकारने तातडीने लावून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.
औसा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या उजनीच्या तेरणा नदीचे गेल्या वर्षी खासदार काकडे, आमदार बसवराज पाटील आणि लोकसहभागातून खोलीकरणाचे काम झाले आहे. सध्या दुष्काळ असतानाही तेरणा नदीच्या या पात्रात पाणी थांबलेले असून त्याचा फायदा गावकऱ्यांना होत आहे. गावातील दोन बोअरला चांगले पाणी असून सारे गाव त्या पाण्याचा वापर करीत आहे, अशी माहिती लोकसमितीचे प्रमुख प्रवीण कोपरकर यांनी दिली. या नदीवरच्या निकामी झालेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचाच वापर आता सिमेंटच्या बंधाऱ्यासाठी केला जात असल्याची माहिती देऊन कोपरकर म्हणाले, 'या कामांमुळे आम्हाला किमान आणखी दोन महिने पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध झाला आहे.'
सिमेंट बंधारे बांधणार
खरोसा आणि रामेगाव शिवारात नाला सरळीकरण आणि खोलीकरणाचे कामे झाल्यानंतर त्या नाल्यामध्ये जलसंधारण विभागाच्या माध्यमातून साखळी पद्धतीचे सिमेंट बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता जी. बी. काजळे यांनी दिली.