यंदा मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता गतवर्षीपेक्षा अधिक आहे. फेब्रुवारी महिन्यातच आटलेले जलस्त्रोत आणि टँकरच्या दीडहजारी आकड्यामुळे पावसाळ्यापर्यंत कसे जगायचे, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला पडला आहे. उपलब्ध पाण्याच्या स्थितीवरून यंदा गेल्यावर्षीपेक्षाही भयंकर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची स्थिती आहे.
सध्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील १३४२ गावे व ५१६ वाड्यांना १७९९ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यातील टँकरचा आकडा केवळ ३६१ होता. अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्याच्या जनतलेला दुष्काळाचा फटका सहन करावा लागत आहे. खरीप रब्बीची पीक वाया गेल्यामुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आता ऐन फेब्रुवारी महिन्यात हंडाभर पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे. केवळ ग्रामीण मराठवाडाच नव्हे तर, निम्म्या नगरपालिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. सध्या औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उन्हाची दाहकता वाढत असल्यामुळे बहुतांश लहान मोठे तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे गावांची तहान भागवण्यासाठी टँकरची संख्या वाढवण्यात येत आहे. ज्या गावांमध्ये टँकर सुरू नाही, अशा गावातील लोकांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याची स्थिती आहे. सध्या विभागात १७९९ टँकरने पाणी पुरवठा केला जात असून, सर्वाधिक ४७० टँकर बीड जिल्ह्यात सुरू आहेत, तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी २ टँकर सुरू आहेत. प्रत्येक आठवड्यात किमान ६० ते ८० टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. पाणीटंचाईमुळे प्रशासनाकडून विभागातील ४४२२ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
सध्या विभागातील ८४३ प्रकल्पांमध्ये फक्त ७ टक्के (५३३.३२ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी १८ फेब्रुवारी रोजी विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये १२०३ दशलक्ष घनमीटर (२३ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. येत्या चार महिन्यांत मराठवाड्याला पुन्हा पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.
गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये ११९२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. आता अधिग्रहणाची संख्या चारपटीने वाढली आहे. सध्या ४४२२ विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. दर आठवड्याला २५० ते ३०० ने अधिग्रहणाच्या संख्येत वाढ होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट