सिटी स्कॅन - सांस्कृतिक
-----------------------------
नवे काही शोधताना
-------------------
सादरीकरण आणि गुणवत्तेचा अपूर्व मेळ साधणारी कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी शहरात पार पडली. रंगभूमीवरील तांत्रिक बदलांची चुणूक दाखवणारी स्पर्धा स्थानिक रंगकर्मींसाठी चांगला अनुभव ठरली. स्पर्धेची पारंपरिक चौकट तोडून नवे वर्तुळ निर्माण करणारे नाट्य प्रयोग रसिकांना विशेष भावले.
---------------
tushar.bodkhe@timesgroup.com
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेची पहिली फेरी पाहणे रसिकांसाठी कदाचित खूप कंटाळवाणे ठरत असेल. कारण, दोन-चार नाटकांचा अपवाद वगळल्यास इतर नाटकांची जातकुळी शब्दशः 'हौशी' असते. कामगार अभिनेत्यांना रंगमंच देण्यासाठी नाट्य स्पर्धा सुरू झाली. कामगार कल्याण नाट्य स्पर्धेचे यंदाचे ६३ वे वर्ष होते. औरंगाबाद केंद्रावर प्राथमिक फेरी डिसेंबर महिन्यात झाली. मराठवाड्यातील वेगवेगळ्या कामगार कल्याण केंद्रांनी नाट्य सादरीकरणाची औपचारिकता पूर्ण केली. प्रत्येक नाट्य संघात खरे कामगार किती व इतर कलाकार किती हा वेगळा विषय आहे; मात्र पुरेशी तयारी नसल्यामुळे बहुतेक संघाचे नाट्य प्रयोग अत्यंत सुमार होते. संवादफेक, पार्श्वसंगीत, नेपथ्य, पात्रांची वैशिष्ट्ये, रंगभूषा या नाट्य प्रयोगासाठी आवश्यक घटकांची वानवा होती. पाठांतर हा बहुतेक कलाकारांचा 'वीक पॉइंट' होता. प्रयोग पाहताना प्रॉम्टरला ऐकणे रसिकांसाठी शिक्षा होती. ऐनवेळी संवाद विसरणे, दुसऱ्या कलाकाराच्या संवादात घाईने आपला संवाद घुसडवणे असे अनेक रंजक किस्से प्राथमिक फेरीत घडले. प्रत्येक शहराच्या रंगभूमीला ऊर्जितावस्था देण्यात काही घटक महत्त्वपूर्ण असतात. नियमित नाट्य प्रयोग सादरीकरण, एकांकिका महोत्सव, नाट्य अभिवाचन आणि एकपात्री अभिनय अशा विविध माध्यमातून नाट्य लेखक व कलाकारांना प्रेरणा मिळत असते. इतर विभागातील नाटक पाहूनही स्वतःला 'रिफ्रेश' करण्याची संधी चालून येते. महाराष्ट्रातील नवोदित रंगकर्मी नेमका काय विचार करतात व रंगमंचावर विचार कसे व्यक्त करतात याची रसिकांप्रमाणेच नाट्यकर्मीनाही उत्सुकता असते. नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सरस नाट्य प्रयोगांनी या चांगल्या प्रयोगांची अपेक्षा पूर्ण केली. औरंगाबाद, नागपूर, ठाणे, नाशिक, पुणे, अकोला, मुंबई विभागातील १८ संघांनी नाट्य प्रयोग सादर केले. स्पर्धेतील नाट्य प्रयोगांची निश्चित चौकट असते. चौकटीतच नाट्य प्रयोग सादर होत असल्यामुळे नाटकांना साचेबद्धपणा येतो. अंतिम नाट्य स्पर्धेतील नाटकांची गुणवत्ता तुलनेने सरस होती. अनवट नाट्य संहितांना रंगमंचीय आविष्कारात गुंफताना कलाकारांनी रसिकांनाही कुशलतेने खिळवून ठेवले. 'सापत्नेकराचं मूल' हे मकरंद साठे लिखित नाटक याचे उत्तम उदाहरण ठरावे. निपुत्रिक जोडप्याची कथा 'अॅब्सर्ड' नाट्य शैलीत प्रत्ययकारकरित्या सादर झाली. पार्श्वसंगीत, नेपथ्य व रंगमंचाचा खुबीने वापर करीत कलाकारांनी उत्तम प्रयोग सादर केला. या प्रकारचा प्रयोग अभावानेच पहायला मिळतो. 'अलगद', 'मेन विदाऊट शॅडोज', 'सटवाई अश्व', 'प्रश्न कायद्याचा आहे', 'अस्तित्व अॅट अंश डॉट कॉम', 'मिच्च काळ्या रंगामध्ये बुडवून', 'अपूर्णांक', 'कोण म्हणतं टक्का दिला', 'खुल्या आभाळात', 'कोमल गंधार', 'नकोत नुसत्या भिंती', 'मोरू द सोल्यूशन', 'निखारे', 'या वळणावर' अशा नवीन नाटकांनी रसिक सुखावले. कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अनेक वर्षानंतर औरंगाबाद शहरात पार पडली. त्यामुळे स्पर्धेच्या अंतिम फेरीची सर्वांनाच उत्सुकता होती. नाट्य संघांनीही रसिकांची निराशा केली नाही. राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण नाट्य स्पर्धा अशा स्पर्धेत सरकारी औपचारिकता दिसणे स्वाभाविक असते. नियोजनाचा अभाव आणि समन्वयाचा दुष्काळ अशी सार्वत्रिक ओरड असते. ही स्पर्धा मात्र अपवाद ठरली. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला सभागृहात शहरातील कामगार कल्याण केंद्राचे कर्मचारी सर्वाधिक उपस्थित होते. त्यामुळे इतर दिवशी नाट्य रसिक येतील की नाही अशी शंका होती. प्रत्येक केंद्राने दररोज किमान दहा प्रेक्षक आणावेत असा सुज्ञ सल्ला व्यासपीठावरील पाहुण्यांनी दिला. सुदैवाने, लोकांची रसिकता अजून शिल्लक आहे. जबरदस्तीने प्रेक्षक आणण्याची नामुष्की ओढावली नाही. स्पर्धेची माहिती सर्वदूर पोहचताच रसिकांची गर्दी वाढली. नाटकाचे व नाट्य संघाचे नाव ऐकून रसिक दूरवरून नाटक पाहण्यासाठी येत होते. या स्पर्धेतील नाटकांनी रसिकांना चांगल्या प्रयोगाचा आनंद दिला. कदाचित, नाट्य स्पर्धेची पुरेशी प्रसिद्धी झाली असती तर रसिकांचा प्रतिसाद वाढला असता. नाट्य स्पर्धेची माहिती कळेपर्यंत चार-पाच प्रयोग होऊन गेले होते. शहरातील चार नाट्यशास्त्र विभागांना स्पर्धेत सहभागी करून घेणे गरजेचे होते. याद्वारे दुसऱ्या जिल्ह्यातील नाट्यकर्मीशी स्थानिक नाट्यकर्मींचा परिचय वाढला असता. रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी सक्रिय नाट्यकर्मींच्या एकत्रित प्रयत्नातूनच मराठी रंगभूमीचा लौकिक टिकणार आहे.