Sudhir.Bhalerao
@timesgroup.com
औरंगाबाद: एकेकाळी गावा-गावांत सोनार समाजाचे प्रस्थ होते. सुवर्ण नियंत्रण कायदा आल्यानंतर सोनार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला घरघर लागली. एकेकाळी आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या या समाजाची मोठी पिछेहाट झाली. त्यांच्यासमोर संघर्ष करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. सोनार समाजातील युवा पिढीने शिक्षणाची कास धरली आणि नोकरी वा अन्य व्यवसाय त्यांना खुणावू लागले. सोने-चांदीचे दागिने बनवण्याची कलाकुसर मात्र हरवून जात असल्याची खंत ज्येष्ठांना वाटत आहे. भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर 'सोने की चिडिया' म्हणून भारताचे वर्णन केले जात असे. सोने-चांदीचे कलाकुसर केलेले दाग-दागिने नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. सोने-चांदीचे दागिने बनवणे यात सोनार समाजाचा हातखंडा. वेळोवेळी अनेक संकटांचा सामना करणारा हा समाज आपल्या कलाकुसरीमुळे वेगळी प्रतिमा ठेवून होता.
स्वातंत्र्यापूर्वी संपूर्ण देशात एक प्रस्थ असलेल्या सोनार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला स्वातंत्र्यानंतर मात्र घरघर लागली. २४ ऑगस्ट १९६८ हा दिवस सोनार समाजासाठी काळा दिवस ठरला. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सुवर्ण नियंत्रण कायदा निर्माण केला. या कायद्यामुळे सोनार समाजाची पाळेमुळे अक्षरशः उद्धवस्त झाली. अनेक सुवर्णकारांनी आत्महत्या केली. अनेकांची आर्थिक स्थिती बिघडली आणि हा समाज विखुरला गेला, अशा शब्दात मराठवाडा लाड सुवर्णकार बहुउद्देशीय विकास मंडळाचे अध्यक्ष भास्करराव टेहरे यांनी समाजावर ओढवलेल्या संकटाचे वर्णन केले. देशभर विखुरलेला हा समाज सुवर्ण नियंत्रण कायद्याने निर्माण केलेल्या संकटामुळे एकत्र आला. या कायद्याला त्यांनी प्रचंड विरोध केला. परंतु केंद्र सरकारने आपला निर्णय बदलला नाही. त्यामुळे सोनार समाजाची आर्थिक परिस्थिती बिघडत गेली. मालक असलेल्यांना कारागीर म्हणून काम करण्याची वेळ आली. सोने-चांदीच्या व्यवसायात अन्य समाजाची मंडळी उतरली आणि सोनार समाजाची चमक-धमक हरवून गेली. सुवर्ण नियंत्रण कायद्यामुळे जवळपास ७० टक्के सुवर्णकारांना आपला पारंपरिक व्यवसाय सोडून द्यावा लागला. अन्य व्यवसाय करून ते आपले कुटुंब चालवू लागले. ६ जून १९९० रोजी सुवर्ण नियंत्रण कायदा संपुष्टात आला. सुवर्ण उद्योगाला पुन्हा झळाळी येऊ लागली. परंतु तेव्हा सोनार समाजाची भूमिका केवळ एक कारागीर म्हणून राहिली होती, असे टेहरे यांनी सांगितले. सोने-चांदीचे दाग-दागिने बनवण्याची कलाकुसर कायम असल्याने सोनार समाजाने पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली. अन्य समाजातील मंडळी या व्यवसायात प्रस्थापित होत होती. आधुनिक साधनांचा उपयोग वाढल्यामुळे सोनार समाजाच्या मक्तेदारीला पुन्हा एकदा आव्हान मिळाले. या आव्हानाचा सामना करण्याकरिता सोनार समाज एकवटला. १९९८ रोजी मराठवाडा लाड सुवर्णकार बहुउद्देशीय विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. सोनार समाजात प्रमुख सात पोटजाती आहेत. लाड, आहेर, पांचाळ, वैश्य, दैवज्ञ, माळवी अशा पोटजाती होत. नरहरी सेनेच्या माध्यमातून सोनार समाजातील सर्व शाखांना एकत्र आणण्यात आले. राज्यात सोनार समाजाची लोकसंख्या एक कोटीपेक्षा अधिक आहे. मराठवाड्यात पाच-सहा लाख लोकसंख्या सोनार समाजाची आहे. सोनार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला पुन्हा झळाळी प्राप्त करून द्यायची असेल, तर संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे आवश्यक आहे. या मागणीसाठी २००४पासून आम्ही लढा देत आहोत. अद्यापही सरकारने आमची मागणी गांभीर्याने घेतलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
सोनार समाजातील ८० टक्के लोक हे संघर्षाचे जीवन जगत आहेत. सोनार समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश असला तरी त्याचा कोणताही फायदा समाजाला झालेला नाही. त्यामुळे आर्थिक विकास महामंडळाची समाजाला नितांत गरज आहे. महामंडळ स्थापन झाले, तर सोनार समाजाची हरवलेली दिशा सापडू शकेल. सोनार समाजातील युवा पिढीचा शिक्षणाकडे कल वाढला आहे. पूर्वी दहावीपर्यंत शिक्षण घेऊन नंतर वडिलांचा व्यवसाय पुढे चालवण्याचा ट्रेंड होता. आता हा ट्रेंड राहिलेला नाही. उच्च शिक्षण घेऊन नोकरी अथवा अन्य व्यवसाय करण्याकडे युवा पिढीचा कल आहे. मुलांबरोबरच मुलींचेही शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. साहजिकच मुला-मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. संघटनेच्या माध्यमातून वधू-वर परिचय मेळावा आणि सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. सोने-चांदीचे दाग-दागिने घडवण्याची कला जोपासण्याकडेही कल कायम आहे. निवडक मुले सुरत येथील सुवर्ण कलाकेंद्रात प्रशिक्षणासाठी जात आहेत. राज्यातही आता अनेक ठिकाणी या कलेचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. देव-देवतांचे टोप बनवण्याची शैली हे औरंगाबाद जिल्ह्यातील सोनारांचे खास वैशिष्ट्य आहे. नरहरी महाराजांची जयंती साजरी करण्याची प्रथा सर्वप्रथम औरंगाबादेत सुरू करण्यात आली. मराठवाडा भूषण पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, परिचय मेळावा, महिलांसाठी विविध कार्यक्रम असे विविध उपक्रम संघटना नियमित राबवत असते.
वसतीगृह उभारण्याची योजना
जटवाडा येथील कलावती पब्लिक स्कूलशेजारी दहा हजार स्वेअरफूट जागा समाजासाठी देण्यात आली आहे. या जागेवर मंदिर, वसतीगृह उभारण्याची कल्पना आहे, असे अध्यक्ष भास्करराव टेहरे यांनी सांगितली.
पाच मे रोजी विवाह सोहळा
पाच मे २०१६ रोजी राज्यस्तरीय सामुदायिक विवाह सोहळा औरंगाबादेत आयोजित करण्यात आलेला आहे. यात सोनार समाजातील सर्व शाखांचा समावेश आहे. १०१ वधु-वरांचे विवाह यात होणार आहेत. या सोहळ्याचा सर्व खर्च नरहरी सेना करणार आहे.
मराठवाडा लाड-सुवर्णकार बहुउद्देशीय विकास मंडळ कार्यकारिणीः अध्यक्ष भास्करराव टेहरे, सचिव सुहास बार्शीकर, उपाध्यक्ष भगवान शहाणे, कार्याध्यक्ष शशीकांत उदावंत, सहसचिव बंडू टाक, कोषाध्यक्ष कैलास गुटे. महिला प्रतिनिधी - अनिता शहाणे, शोभा टेहरे, विजया बार्शीकर, शोभा मंडलिक, जयश्री गुटे, आशा सावखेडकर.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट