Sudhir.Bhalerao
@timesgroup.com
औरंगाबाद : ग्रामदैवतांची सेवा करणारा समाज म्हणून गुरव समाजाची फार पूर्वीपासून ओळख आहे. बारा बलुतेदारांमध्ये हा समाज गणला जाई. बलुतेदारी बंद झाली. मात्र, गावकीची पद्धत अद्याप रुढ आहे. गावकीच्या रुढी, परंपरा, रितीरिवाज हा समाज अद्यापही पाळतो. गुरव समाज हा अल्पसंख्य समाज आहे. आहार, संस्कृती, संस्कार आदी कारणांवरून पडलेल्या पोटजातीत विभागलेला हा समाज विखुरलेला आहे. गाव तिथे मंदिर आणि मंदिर तिथे गुरव पुजारी असे समीकरण बनलेले आहे.
एकेकाळी गावातील सर्वांशी सतत संपर्क असलेला समाज म्हणून गुरव समाजाची ओळख. प्रामुख्याने ग्रामीण भागात गुरव समाजाची उपजीविका मंदिरातील दक्षिणा, बलुतं, शिधा वा इतर मोबदला यावर होते. देवस्थान व्यवस्थापन व पुजारी उपजीविका यासाठी काही ठिकाणच्या देवस्थानांना सरकारी जमिनी इनाम देण्यात आल्या आहेत. गुरव समाजासमोर इनामी जमिनीचा मोठा प्रश्न उभा ठाकलेला आहे. अनेक देवस्थानाच्या इनामी जमिनी या अन्य लोकांना कसण्याकरिता दिलेल्या आहेत. त्याचे उत्पन्न मंदिराला अथवा पुजाऱ्याला मिळत नाही. तसेच मंदिरातील दक्षिणा, देणग्याही पुजाऱ्याला मिळू नयेत म्हणून देवस्थानात ट्रस्ट स्थापन करून देणग्या, दक्षिणा या ट्रस्टकडे जमा केल्या जातात. गुरव समाजाचा हा हक्कही अशा पद्धतीने हिरावण्यात आला आहे, अशी खंत औरंगाबाद जिल्हा गुरव समाज मंडळाचे सचिव रामनाथ कापसे यांनी व्यक्त केली. गावात बेल वाटणे, पत्रावळी तयार करणे, देवदेवतांची पूजा करणे या परंपरेला घसरण आल्यानंतर अनेकांनी शहराकडे धाव घेतली. शिक्षणाकडे कल वाढला. शिक्षणामुळे गुरव समाजातील युवा पिढीची दिशा बदलत असली तरी आजही ग्रामीण भागातच हा समाज मोठ्या संख्येने राहात आहे. ओबीसी प्रवर्गात असलेल्या गुरव समाजाला आरक्षणाचा फारसा लाभ झालेला नाही. पूर्वी ग्रामीण भागात शिक्षणाच्या फारशा सुविधा नव्हत्या. गावातील शाळेत जेवढे शिकायला मिळाले तेवढेच शिक्षण घेतले जात होते. शिक्षणाचे महत्त्व समजल्याने गुरव समाजातील ज्येष्ठांनी आपल्या मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रेरित केले. पूर्वी चौथी ते दहावीपर्यंत शिक्षण होत होते. आता उच्च शिक्षण घेण्याकडे कल वाढला आहे. चांगल्या शिक्षणामुळे नोकरी अथवा व्यवसायात या समाजातील युवा पिढीने शिरकाव केला आहे. मुलांबरोबरच मुलींनीही या लक्षणीय झेप घेतली आहे. वैद्यकीय, इंजिनीअर क्षेत्रातही गुरव समाजातील मुले-मुली आता दिसू लागली आहेत, असे सचिव कापसे यांनी सांगितले.
वधू-वर परिचय मेळावा
गुरव समाज राज्यभर विखरुलेला आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये हा समाज प्राध्यानाने दिसून येतो. औरंगाबाद जिल्ह्यातही हा समाज संख्येने बऱ्यापैकी आहे. समाजातील शिक्षित होत असलेल्या युवा पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यातील एक आव्हान म्हणजे योग्य जोडीदार मिळण्याचे. त्यासाठी वधू-वर परिचय मेळावा घेण्यास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत १७ मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यातून अनेकांना सुयोग्य जोडीदारही मिळाले आहेत. शिक्षणामुळे मुला-मुलींच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत. प्रत्येकाला अनुरुप जोडीदारच हवा असतो, असे कापसे यांनी सांगितले.
विविध उपक्रमांचे आयोजन
सामूहिक विवाह, मुंजी सोहळे यांसह विविध उपक्रम घेतले जातात. समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप, दसरा, दिवाळी स्नेहमिलन, रक्तदान शिबिर, महिलांसाठी आरोग्य शिबिर, कर्तबगार महिलांचा सत्कार असे विविध कार्यक्रम सातत्याने घेतले जातात. मात्र, समाजाला एकत्रित कार्यक्रम घेण्याकरिता समाजाचे स्वतःचे एकही सांस्कृतिक सभागृह नाही. गुरव समाज हा विखुरलेला असल्याने या समाजाचे प्राधान्य दिले जात नाही. समाजाला एकत्र करणे अवघड असले तरी संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले जातात आणि त्यात समाजातील सर्वांचा मोठा सहभाग असतो असे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्हा गुरव समाज मंडळ कार्यकारिणी - अध्यक्ष स. सो. खंडाळकर, उपाध्यक्ष रोहिणी शेवाळे, सचिन रामनाथ कापसे, सहसचिव सुवर्णा मुंगीकर, कोषाध्यक्ष दामोधर पाटील पवार. सदस्य - पुंडलिक सोनवणे, विष्णू बचाटे, सुधीर छत्रपती, कृष्णा दांडगे, सुभाष सोने, रविकांत साळुंके.
महिला मंडळ कार्यकारिणी - अध्यक्ष मंगल काळे, उपाध्यक्ष कविता कापसे, संगीता खंडाळकर, सचिव मीना साळुंके, सहसचिव संगीता राजूरकर, कोषाध्यक्ष वनिता सोनवणे, सहकोषाध्यक्ष सुवर्णा सुरडकर. सदस्य - क्षमा गोरक्ष, स्वाती छत्रपती, सरला मुंगीकर, कांता बचाटे, मीना मुंगीकर, उज्ज्वला क्षीरसागर, नीलिमा पुजारी, कमल ढोले, सुवर्णा धानोरकर, कविता एरंडे, मंगल डांगे, सीमा दांडगे, सीमा शेवाळे.
युवक मंडळ कार्यकारिणी - अध्यक्ष सुशील ढोले, उपाध्यक्ष आनंद बोरुळकर, सचिव कृष्णा गजभार, सहसचिव योगेश बचाटे, कोषाध्यक्ष प्रशांत दांडगे. सदस्य - नागेश मुंगीकर, वैभव भंडारे, प्रदीप कापसे, संदीप गजभार, सुनील दांडगे, प्रवीण पवार, प्रदीप गुरव, नीलेश बचाटे, नेताजी बचाटे, जिज्ञेस खंडाळकर, कुलदीप गुरव.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट