राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी जालन्यात एका कार्यक्रमात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मांडताना मराठवाडाही वेगळे राज्य करावे, अशी भूमिका मांडली होती. अणे यांनी वेळोवेळी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित करून राज्यातील राजकीय, सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून दिली. मराठवाडा स्वतंत्र राज्य करावे, या त्यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. विविध राजकीय, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र एकसंध राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
फुकटचा सल्ला देण्याची गरज नव्हती
मराठवाडा स्वतंत्र राज्य करा, असा फुकटचा सल्ला श्रीहरी अणे यांनी देण्याची गरज नव्हती. त्यांनी कुणीही तसा सल्ला विचारला नव्हता. शासनाने त्यांच्याकडे जे काम सोपवले आहे, ते काम त्यांनी निमूटपणे करावे. सल्ले देत बसण्याची उठाठेव त्यांनी करू नये. श्रीहरी अणे आणि मराठवाडा यांचा संबंध काय. मराठवाड्याशी त्यांचा काहीही संबंध नसताना त्यांनी त्यांनी स्वतंत्र राज्याची वल्गना का करावी. अशी वक्तव्ये करून अणे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे त्या विधानाचा निषेध आम्ही विधानसभेतही केला आहे. श्रीहरी अणे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करून आम्ही विधानसभेचे सोमवारचे कामकाज बंद पाडले आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर मी स्वतः ठाम आहे.
- संजय शिरसाट,आमदार, शिवसेना.
...तर करार संपुष्टात
विदर्भाची निर्मिती झाली तर नागपूर करार संपुष्टात येणार आहे. या करारात मराठवाडा, महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाला आहे. मराठवाड्याचे स्वतंत्र अस्तित्व अपरिहार्य आहे. विधिमंडळात स्वतंत्र विदर्भाचा ठराव होईल त्याचवेळी वेगळ्या मराठवाड्याचा ठराव केला पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात येईल. ही जनता विकास परिषदेची भूमिका नसून ती वैयक्तिक आहे. परिषदेत प्रामुख्याने संयुक्त महाराष्ट्राच्या विचारांचे प्राबल्य आहे. गेल्या ५६ वर्षांत उपेक्षाच हाती आली आहे. परिषदेतही स्वतंत्र मराठवाड्याच्या बाजूने मते व्यक्त होत आहे. सापत्न वागणूकच मिळाली आहे. वैधानिक विकास मंडळाचा उपायसुद्धा तकलादू ठरला आहे. वेगळ्या राज्याशिवाय पर्याय नाही. आज मराठवाड्यात त्यासाठी चळवळ नाही, पण ते करण्यासाठी अनेक समूह सक्रिय झाले आहेत. आज मराठवाड्यातील सामान्य जनतेचा पाठिंबा नसला तरी उद्या माझ्या भूमिकेला निश्चितच पाठिंबा मिळेल. कारण गेल्या पाच दशकात मराठवाड्याचा विकास झालाच नाही.
- प्रदीप देशमुख, जेष्ठ वकील
हा शहिदांचा अपमान
अखंड महाराष्ट्रासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यसैनिकांनी मोठा संघर्ष केला. शहिदांच्या बलिदानाचा हा अपमान आहे. विदर्भ, मराठवाडा स्वतंत्र करण्याचे अनेकदा वक्तव्य राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केले आहे. त्यांचा बोलविता धनी कोण हे उघड झाले पाहिजे. त्यांची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने केलेले हे वक्तव्य निषेधार्ह आहे.
- सतीश चव्हाण, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
विकासासाठी स्वतंत्र राज्य हवे
विदर्भाबरोबर मराठवाडा राज्याचीही निर्मिती व्हावी, असे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलेले मत योग्य आहे, असेच म्हणावे लागेल. मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला, पण आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुणे, नाशिक आदी भागांचा विकास झाला आहे. त्या तुलनेते मराठवाडा हा विभाग मागासलेलाच राहिला, हे उघड सत्य आहे. मराठवाड्याने चार मुख्यमंत्री दिले, पण अपेक्षित विकास होऊ शकला नाही. शेवटचा पर्याय म्हणून छोट्या राज्याचा पर्याय स्वीकारला पाहिजे, असे मला वाटते.
- अविनाश डोळस, नेते भारिप बहुजन महासंघ
वेगळे होण्याची भाषा अयोग्य
मराठवाड्याला वेगळे करण्याची भाषा योग्य नाही. महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. कोणत्याही स्वतंत्र राज्याचा विचार केल्यास, उद्योग, खनिज संपत्ती; तसेच त्या ठिकाणी उद्योगांचा विचार करण्याची गरज आहे, मात्र मराठवाड्याचा विचार केल्यास तशी कोणतीही व्यवस्था नाही. पर्यटन उद्योगावर मराठवाड्याचा निभाव लागू शकत नाही. यामुळे सध्यातरी याबाबतचा विचार करणे योग्य नाही. सध्या विदर्भात सुरू करण्यात आलेले प्रकल्प, विविध योजना कार्यान्वित करून विदर्भ स्वतंत्र्याच्या वाटेवर आहे. आतापर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी मराठवाड्यावर अन्याय केला आहे. हे जरी सत्य असले तरी मराठवाडा हा संयुक्त महाराष्ट्राचा भाग, तो वेगळा कोणीही करण्याची भाषा करू नये किंवा त्याबाबत विचार ही करू नये.
- इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम
विकासाला बाधक
श्रीहरी अणे यांची मागणी पूर्णपणे राजकीय आहे. भाजप हे लहान-लहान राज्यांचे समर्थन करते. मुख्यमंत्र्यांचा आकडा जास्त दाखवण्याचा हा फंडा असून, यातून विकास साधला जाऊ शकत नाही. स्वतंत्र मराठवाड्याची मागणी हे एक पॉलिटिकल स्टंट आहे.
- बुद्धीनाथ बराळ, कामगार नेते
पॉलिटिकल गेम
स्वतंत्र मराठवाडा राज्याची अणे यांची मागणी म्हणजे पॉलिटिकल गेम आहे. अणे हे विदर्भ स्वतंत्र होण्याच्या बाजूने आहेत, त्यामुळे ते मराठवाड्याला सोबत घेऊ पाहत आहेत, मात्र मराठवाड्याला वेगळे व्हायचे नाही. मराठी माणसांसोबत राहून स्वतचा विकास करून घ्यायचा आहे. मराठवाड्याला झुकते माप देण्याचे यशवंतरावांचे आश्वासन होते, ते पूर्ण होताना दिसत नाही. एखाद्या विभागाचा विकास करणे याचा सरकारच्या धोरणांशी संबंध येतो त्यामुळे वेगळे होऊन फार काही मिळणार नाही.
- डॉ. भालचंद्र कानगो, राज्य सचिव, भाकप
भावना तपासणे गरजेचे
वेगळा विदर्भ किंवा वेगळा मराठवाडा अशी भावना लोकांच्या मनात का निर्माण होते हे पाहणेही गरजेचे आहे. विकास झाला नसला की अशा भावना निर्माण होतात. विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास आजवर साधला गेलेला नाही, अनुशेष दूर झाला नाही. विकास होणे आवश्यक आहे. आमचे सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
- विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग
मराठवाड्याचा विकास होणे आवश्यक
मराठवाडा महाराष्ट्रात सामील होताना काही अपेक्षा बाळगल्या होत्या. दुर्दैवाने त्यात यश आले नाही. सत्ता कोणाचीही असो विकास मात्र पश्चिम महाराष्ट्राचाच झाला. विदर्भाचाही विकास झाला किंबहुना ही आकडेवारी नुकतीच समोर आली. तुलनेत मराठवाडा मात्र मागासलेलाच राहिला. मराठवाडा वेगळा केला तर मुक्ती लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्यांवर अन्याय होईल. आम्ही हे कदापीही होऊ देणार नाही. त्याऐवजी मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. श्रीहरी अणे यांचे वक्तव्य राज्यात दुफळी निर्माण करणारे आहे. गंभीर दुष्काळ पडलेला असताना दुसराच मुद्दा उपस्थित करून लक्ष दुसरीकडे वेधून घेण्याचा प्रयत्न होत आहे, हे दुर्दैवी आहे.
- सुभाष झांबड, आमदार, काँग्रेस
दुष्काळ आमच्यासाठी महत्त्वाचा
सध्या मराठवाडा दुष्काळाचे चटके सहन करीत आहे. सलग तिसऱ्या वर्षी मराठवाड्यात दुष्काळ पडला आहे. त्यावर काय उपाययोजना करता येते, याचा विचार न करता स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी करणे योग्य नाही. मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात विनाअट सामील झाला. त्यावेळी मराठवाड्याने कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी मराठवाड्याकडे सतत दुर्लक्ष करावे, असा होत नाही. मराठवाड्याने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने झुकते माप दिले आहे. त्यामुळे युतीने मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र मराठवाड्याचा उपस्थित केलेला मुद्दा समयोचित नाही. पूर्वीचे सरकार पश्चिम महाराष्ट्राच्या बाजूने होते. आताचे सरकार विदर्भाच्या बाजूने आहे. मराठवाड्याचा कुणी वालीच नाही का, असा प्रश्न निर्माण होतो.
- समीर राजूरकर, माजी नगरसेवक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट