म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हजारो शहरवासीयांच्या स्वप्नातल्या हक्काचे घर यंदाही पुन्हा जवळपास ६ ते ८ टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. रेडी रेकनरच्या दरात वाढ करा, अशी सूचना शासनदरबारी पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सततचा दुष्काळ, रिअल इस्टेटमधील मंदी यामुळे ही दरवाढ करू नये, अशी मागणी होती. मात्र, आम आदमीच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली जाण्याची शक्यता आहे.
दरवर्षी रेडी रेकनरचे दर १ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येत होते. मात्र, मुद्रांक शुल्कात सुसूत्रता आणण्यासाठी तसेच आयकराच्या परिगणणेसाठी १ एप्रिल ते ३१ मार्च हा कालावधी विचारात घेण्यात येतो. त्यामुळे यावर्षीपासून हे दर १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. आतापर्यंत या दरात प्रत्येक वर्षी दहा ते पंधरा टक्के वाढ होत असे. राज्य सरकारला शुल्क वा कराच्या माध्यमातून ज्या काही महत्त्वाच्या विभागाकडून महसूल मिळतो त्यात नोंदणी व मुद्रांक विभाग महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे रेडी रेकनरच्या दरात वाढ करू नये अशी मागणी आहे. दुष्काळाचा फटका महसुली उत्पन्नाला बसला आहे. मात्र, तरीही या दरामध्ये माफक सुधारणा होण्याचे संकेत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले होते. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या किमतीत कमी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये रेडी रेकनरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. यावर्षी स्थावर व्यवसाय क्षेत्रात असलेली मंदी, नोंदवलेले खरेदी-विक्री व्यवहार, दुष्काळामुळे वसुलीचा टक्का याबाबींचा विचार करून यंदा ही वाढ करण्यात येणार आहे.
काय आहे प्रस्तावात?
गेल्यावर्षी रेडी रेकनरच्या दरात महापालिका क्षेत्रात ११ टक्के वाढ, तर सातारा- देवळाई भागामध्ये १० ते २५ टक्के, ग्रामीण भागामध्ये ही वाढ १० टक्के होती. मात्र, दुष्काळामुळे खरेदी विक्रीचे व्यवहाराच कमी झाले असून महापालिका हद्दीत ही वाढ ६ ते ८ टक्के तर ग्रामीण भागात ४ ते ५ टक्के वाढ करावी, असा प्रस्ताव विभागीय नगररचना विभागाने शासनाकडे पाठवला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट