बीड बायपासजवळील सारा सिद्धी वसाहतीमधील नागरिकांना मुलभूत नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. साफसफाई, ड्रेनेज लाइन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदी समस्यांमुळे येथील नागरिकांची कुचंबणा होत आहे.
बीड बायपास परिसरात २००२ पासून सारा सिद्धी वसाहत व राजेशनगरमध्ये २००८ पासून घरे होण्यास सुरुवात झाली. या वसाहतींमध्ये प्रामुख्याने मध्यमवर्गीय, सेवानिवृत्त कर्मचारी, व्यावसायिक राहतात. पण, गेल्या १५ वर्षांपासून मुलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. सारा सिद्धी वसाहतीमध्ये तयार केलेले सेफ्टी टँक कमी क्षमतेचे आहेत. पूर्वी सांडपाणी ओढ्यातून वाहून जायचे. परंतु मोठ्या प्रमाणावर घरे झाली असून, ड्रेनेज लाइन नसल्यामुळे ते ओव्हर फ्लो होत आहेत. परिणामी, सोसायटीच्या मोकळ्या जागेत सांडपाणी तुंबत आहे. त्यामुळे दुर्गंधी व डासांचा प्रादूर्भाव होतो. कचरा घेऊन जाणारी घंटागाडी हायवेपर्यंतच येते, वसाहतीमध्ये फिरकत नाही. पाण्याचे टँकरही इकडे आलेले नाहीत. सारा सिद्धीमधील चार पैकी दोन बोअर आटले आहे. उर्वरित दोन बोअरचे पाणी कमी झाले आहे.
या भागात पथदिवे देवळाई चौकापर्यंतच आहेत, त्यापुढे अंधार आहे. राजेशनगरमध्ये रस्त्याची कामे झालेली नाहीत. पावसाळ्यात चिखलातूनच जावे लागते. नाल्या नसल्यामुळे पाणीही तुंबून राहते. कंटाळून रहिवाशांनी स्वखर्चानेच तात्पुरता रस्ता बनवला आहे. जनावर मरून पडले तर, त्याची विल्हेवाट प्रशासन लावत नाही. चोरी, पोलिस ठाण्याशी संबंधित वादात चिकलठाणा पोलिस ठाण्याला जावे लागते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट