Sudhir.Bhalerao@timesgroup.com
औरंगाबाद ः हर्सूल पंचक्रोशीत मोठ्या आकाराचे दोन तलाव असूनही पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्रतेने जाणवत आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्यापासून हर्सूलवासीय अद्यापही वंचितच आहेत. अवघ्या तीन विहिरींमधील पाण्यावर हर्सूलकरांची तहान भागवली जात आहे. पिण्याचे पाणी विकत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नागरिकांसमोर राहिलेला नाही.
हर्सूल पंचक्रोशीत जटवाडा रोडवरील हर्सूल तलाव आणि हर्सूल-सावंगी तलाव असे दोन मोठे आकाराचे तलाव आहेत, परंतु या दोन्ही तलावांचा सद्यस्थितीत हर्सूलवासीयांना काहीच उपयोग होताना दिसत नाही. जवळपास सहा महिने अर्ध्या औरंगाबाद शहराला हर्सूल तलावातून पाणी पुरवठा होतो, मात्र या तलावातून हर्सूलला पाणी पुरवठा होत नाही, अशी विचित्र स्थिती या भागात आहे. हर्सूल-सावंगी तलाव हा गेल्या पाच-सात वर्षांपासून ओसाड जागेसारखाच आहे. पावसाळ्यातही या तलावात फारसे पाणी येत नाही. त्यामुळे या तलावातील पाण्यावर अवलंबून राहाता येत नाही. या तलावाजवळच्या परिसरात तीन विहिरी आहेत. तेथील पाण्यावरच हर्सूलवासीय आता पाण्याची तहान भागवत आहेत.
चौका परिसरातील डोंगरावरून हर्सूल-सावंगी तलावात पाणी येते, परंतु पावसाचे अत्यंत कमी प्रमाण असल्याने हा तलाव भरला नाही. हा तलाव भरला तर पाच वर्षे पाण्याची व्यवस्था होऊ शकेल. या तलावाच्या पाण्याच्या स्त्रोताकडे कोणीही गांभीर्याने पाहात नसल्याने तलाव कोरडाठाक पडलेला आहे.
३० रुपये ड्रम
पाण्याचे दुर्भीक्ष्य असल्याने विकतचे पाणी घेऊन नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. खासगी व महापालिकेच्या पाण्याच्या टँकरद्वारे या भागात पाणी पुरवठा केला जातो. हर्सूल पंचक्रोशीतील प्रत्येक कुटुंब पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून आहे. महापालिकेचे टँकर नियमित येते, मात्र एका गल्लीत पुन्हा टँकर येण्याकरिता आता १८ दिवसांचा कालावधी लागत आहे. दरमहा ३०० रुपये नागरिक पाण्यासाठी मोजत आहे. एक ड्रम पाण्यासाठी ३० रुपये आकारले जात आहेत. त्यात दोन हजार लीटर पाणी मिळते. एका पाण्याच्या टँकरमध्ये वीस ड्रम पाणी असते. साहजिकच एका टँकरमधून सहा हजार रुपयांची मिळकत होत आहे. खासगी टँकरही आसपासच्या शेतातून पाणी आणत आहेत.
हर्सूल परिसरात अनेक नव्या वसाहती उभ्यारल्या आहेत. हर्सूल गावठाणासह एकतानगर, राधास्वामी कॉलनी, चेतनानगर, जहागिरदार कॉलनी, भगतसिंगनगर, मयूरपार्क, फुलेनगर, पिसादेवीरोड, होनाजीनगर असा मोठा परिसर आहे. जवळपास ६०-७० हजार लोकसंख्या या भागाची झाली आहे. हर्सूल गावठाणाचीच लोकसंख्या २० हजारांवर आहे. या परिसरात अजुनही शेती केली जाते. वाढत्या नागरीकरणाचा धोका शेतीला निर्माण झालेला आहे. पाण्याची कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने या परिसरातील नागरिकांना पाणी संकटाचा दरवर्षी सामना करावा लागत आहे. कायमस्वरुपी पाण्याचे नियोजन करण्याची नागरिकांची मागणी आहे.
जायकवाडीच्या पाण्यापासून वंचित
जायकवाडी धरणाचे पाणी औरंगाबाद शहराला होते, मात्र हर्सूल परिसरात धरणाचे पाणी देण्याची सुविधाच नाही. हर्सूल-सावंगी रोडवर दोन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. त्यात तीन विहिरींतून पाणी आणले जाते आणि तेथूनच पाणी पुरवठा होतो. जायकवाडी धरणाचे पाणी मिळावे, अशी या भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनच मागणी आहे, मात्र महापालिकेने या मागणीकडे कधीही गांभीर्याने पाहिलेले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या अनेकांनी 'मटा'शी संवाद साधताना व्यक्त केली.
हर्सूल तलावात चर खोदून अनेक खासगी टँकरचालक पाणी नेतात. या पाण्याचे शुद्धीकरण झालेले नसते. पाण्याच्या दर्जाविषयी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, परंतु याकडेही कोणालाच गांभीर्याने लक्ष देण्यास वेळ नाही.
हर्सूल-सावंगी तलाव पूर्णपणे भरला तर, पाच वर्षे पाणी या भागात पुरवले जाऊ शकते. चौका घाटातून या तलावात पाणी येते. अन्य पाण्याचे स्त्रोत निर्माण केले तर हा तलाव संपूर्ण शहराची पाण्याची गरज भागवू शकतो. पाण्याची ओरड सुरू झाल्यानंतरच पाणी प्रश्न कळतो, हे चुकीचेच आहे. पाण्याची कायमस्वरुपी नियोजन करणे आवश्यक बनले आहे.
- सांडू औताडे
दोन मोठे तलाव असूनही हर्सूल परिसरातील नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज असली तरी दैनंदिनीसाठी पुरेसे पाणीदेखिल मिळत नाही अशी परिस्थिती आहे. पाण्याचे गंभीर संकट असून, नागरिक त्याचा सामना करीत आहेत. जायकवाडी धरणातील पाणी या भागातील नागरिकांना मिळायलाच हवे.
- माधव वाणी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट