म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'धार्मिक आणि सांस्कृतिक वैविध्यता असलेला भारत जगाच्या पाठीवरील एकमेव देश आहे. वैविध्येतूनच आपण समृद्ध होत असतो. दुसऱ्यांवर दबाव निर्माण करून हिंदूराष्ट्र निर्माण करू असे कुणाला वाटत असेल, तर ते नुकसान करून घेत आहेत,' असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. प्रशांत भूषण यांनी केले. अमन कमिटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अमन कमिटीच्या वतीने अमन, शांती, भाईचारा आणि सदभावना यांच्यासाठी शनिवारी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. वसंतराव नाईक महाविद्यालयात सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर अॅड. प्रशांत भूषण, साथी सुभाष लोमटे, अॅड. अदिल अहमद, अण्णासाहेब खंदारे, अॅड. शकील व जे. एस. पिंपळे उपस्थित होते. शांती व सौहार्दता कायम ठेवण्याच्या मुद्यावर भूषण यांनी भाष्य केले. 'स्वराज अभियानाच्या माध्यमातून न्यायासाठी लढा उभारला आहे. शांती कायम ठेवण्याचे मॉडेल औरंगाबाद शहरात तयार झाले आहे. आपला देश वैविध्यपूर्ण असून सांस्कृतिक व धार्मिक वैविध्यता ताकद आहे. वैविध्ययेतून समृद्ध होऊ याचा विचार कुणी करीत नाही. शांती आणि सौहार्दतेचा प्रत्येकाला फायदा होतो, पण दुसऱ्यांवर दरारा निर्माण करणारे ही गोष्ट समजून घेऊ इच्छित नाही. इतर धर्मियांवर विचार लादून हिंदूराष्ट्र साकारण्याची कल्पना करणे म्हणजे स्वतःचे नुकसान करून घेणे आहे. भाजपचे सरकार आल्यानंतर हा मुद्दा जास्त उफाळला आहे. समाजात दुही निर्माण करून भाजप राजकारण करीत आहे. काही मुस्लिम पक्षसुद्धा हाच विचार करतात. मात्र, सामाजिक एकता आपले बलस्थान आहे' असे अॅड. भूषण म्हणाले.
'शिक्षण, पायाभूत सुविधांपासून सामान्य वंचित आहेत. ९३ टक्के लोक असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. स्वतःच्या न्याय-हक्कांसाठी लढण्याचेही त्यांच्यात बळ नाही. सर्व जमिनी मूठभरांच्या ताब्यात देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सौहार्द टिकू द्यायचे नाही असे सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे. त्यामुळे शांती व सौहार्दता टिकवणे आपली जबाबदारी आहे,' असे साथी सुभाष लोमटे म्हणाले. या कार्यक्रमात आवेज अहमद, एस. पी. जवळकर, माजी महापौर मनमोहनसिंह ओबेरॉय, सलीम मिर्झा, ज्ञानप्रकाश मोदाणी, मेहराज सिद्दीकी व मनीष जैस्वाल यांनी विचार मांडले.
संघाची मते बुरसटलेली
'सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पसंख्याकांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. या गोष्टीवर विश्वास ठेवू नका,' असे आवाहन अॅड. भूषण यांनी केले. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निष्ठा व सामाजिक बांधिलकी कौतुक करण्यासारखी असते. मात्र, धार्मिक सलोखा टिकवण्याबाबत त्यांची मते बुरसटलेली आहेत,' अशी टीका भूषण यांनी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट