खुलताबाद तालुक्यातील ५०पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली असून, २०१४-१५ या खरीप हंगामातील कर्जाची वसुली करू नये, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. त्याचा तालुक्यातील २९०९ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
खरीप हंगाम २०१५च्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती सहाय्यक निबंधक सहकार अर्चना वाडेकर यांनी 'मटा'ला दिली. एप्रिलअखेरीस खुलताबाद तालुक्यात २९०९ शेतकरी सभासद असून, पीक कर्जाची ६ कोटी रुपये चालुबाकी आहे. वसुलीसाठी कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने खरीप हंगामात घेतलेल्या व परतफेड न केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची योजना जाहीर केली आहे. ११ मार्च २०१६च्या शासननिर्णयानुसार अशा गावातील शेतकऱ्यांनी २०१५च्या खरीप हंगामात घेतलेल्या पीक कर्जाचे पाच वर्षे मुदतीच्या मध्यम मुदत कर्जत पुनर्गठन करावे. त्या कर्जाचे पाच हप्ते पाडणे आवश्यक आहे. यासाठी कर्जदार शेतकऱ्यांची संमती आवश्यक आहे. ३१ मार्च २०१६ वसुली होऊन थकित चालुबाकीदारांचे पुनर्गठन व्याजासह केले जाणार आहे. त्याची परतफेड सहा टक्के दराने करायची आहे. पुनर्गठन ३० एप्रिल २०१६पर्यंत करणे अपेक्षित होते. याविषयीची माहिती ठराव, पुनर्गठन पात्र शेतकऱ्यांची यादी संकलित करण्याचे काम सुरू आहे. खुलताबाद तालुक्यातील २९०९ सभासद शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे ६ कोटी बाकी असून, वसुलीची कारवाई सुरू आहे. पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना लगेच नवीन पीक कर्ज दिले जाणार आहे. खरीप २०१५मध्ये पीककर्ज घेतलेल्या व परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांनी सेवा संस्थेच्या गटसचिवाशी संपर्क साधून संमतीपत्र द्यावे, असे आवाहन सहाय्यक निबंधक सहकार वाडेकर यांनी केले आहे.
गेल्या वर्षी पावसाने दगा दिल्यानंतर खरिपाचे पीक हातचे गेले होते. त्याचबरोबर पाण्याअभावी रब्बी पिकाची पेरणीही करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढले. जानेवारीपासून विभागात ३९२ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. यापार्श्वभूमीवर सरकारने पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट