Manoj.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद ः कर्जाच्या ओझ्यात पिचून चिपाड झालेले आयुष्य. दोनवेळेच्या जेवणाची भ्रांत. लग्नाला आलेल्या पोरीचा घोर. ज्यावर पोट ती शेती दुष्काळाकडे गहाण. पैशाच्या वसुलीसाठी सावकाराने लावलेला तगादा. यामुळे मराठवाडा, विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेत जीवन संपवले. क्षणात त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. अशा दोनशे मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पालकत्व स्वीकारण्याचे पुण्यकर्म शांतीवनच्या दीपक नागरगोजे या मोठ्या दिलाच्या बापाने केले आहे.
मराठवाड्यात विविध प्रश्न घेऊन २००१पासून काम करणाऱ्या शांतीवनला (आर्वी, ता. शिरूर) दुष्काळाने हेलावून सोडले. त्यांनी बीड जिल्ह्यात सर्वेक्षण केले. तेव्हा घरातील कर्ता गेल्यामुळे अनेक घरात भीषण दारिद्र्याने ठाण मांडल्याचे दिसले. त्यांच्या तरुण कळ्यांच्या आयुष्यात अंधार दाटला होता. या मुलांना घर देण्याचा निर्णय दीपक नागरगोजे यांनी घेतला. त्यासाठी फेसबूक, व्हॉटस् अॅपवरून या संकल्पनेची माहिती सर्वदूर पोहचवली. तेव्हा औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, बुलडाणा, अहमदनगर जिल्ह्यातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची नावे शांतीवनपर्यंत आली. या मुलांचे पालन-पोषण, शिक्षण, स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत निवासासह सर्व खर्च उचलण्यासाठी शांतीवनने हात पुढे केला. यातली १३४ मुले संस्थेत दाखल झाली आहेत. त्यांचे थांबलेले आयुष्य पुढे सुरू झाले आहे. उर्वरित मुले लवकरच दाखल होणार आहेत. सध्या शांतीवन ७०० वंचित मुले, १७ विधवा आणि घटस्फोटितांचे घर झाले आहे. विधवा, घटस्फोटितांना महिनाकाठी चार हजारांपर्यंतचे वेतन मिळेल असे काम दिले जाते. संस्थेने २०० मुलींना दत्तक घेतले आहे. त्यांचा निवास वगळता शिक्षण, एक वेळ जेवण असा खर्च शांतीवन उचलते. इथली १४ मुले पुण्यात उच्चशिक्षण घेत आहेत. ६० महिलांचा स्वयंरोजगार ग्रुप तयार करून त्यांना रोज २०० रुपये मिळतील असा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ११ शेतकऱ्यांना दत्तक घेऊन त्यांना आधुनिक शेती कशी करायची, इथपासून आर्थिक सहकार्य केले जात आहे. संस्थेने दुष्काळाशी दोन हात करत पाच कोटी लिटरचा तलाव उभारला आहे. सध्या साडेतीन कोटी लिटर पाणी तलावात साचले आहे. ८०० मीटर नदीखोलीकरण केले आहे. परिसरात बायोगॅस प्रकल्प उभारला असून, १५ घनमीटरची रोज एक टाकी त्यातून तयार होते.
सचिन, नानाची मदत
शांतीवनचे काम पाहून सचिन तेंडुलकरने संस्थेस खासदार निधीतून ४० लाखांची मदत केली. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने वसतिगृह उभारणी सुरू केली आहे. पुण्याचे शशिकांत चितळे, सुरेश जोशी यांनी मदत केली आहे.
बारावीत असताना बाबा आमटेंच्या शिबिरात गेलो आणि आयुष्य बदलले. साधनाताई आमटेंच्या नावाने शाळा सुरू केली. येथे वंचितांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय. लोकसहभातून कामाचा व्याप वाढला. याचे समाधान वाटते.
- दीपक नागरगोजे, शांतीवन
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट