Sudhir.Bhalerao@timesgroup.com
औरंगाबादः निझाम राजवटीच्या काळात नोकरी, उदरनिर्वाहासाठी आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरील मन्नेरवारलू समाज मराठवाड्यात आला. नोकरी, व्यवसायाच्यानिमित्ताने तो महाराष्ट्रात पसरला. विखुरलेल्या या समाजाला एकत्रित आणण्याकरिता महाराष्ट्र मन्नेरवारलू समाज संघटनेची स्थापना करण्यात आली. या समाजाची आणि संघटनेची वाटचाल आजच्या समाजमनमध्ये.
-
आंध्रातील मांडवा भागातून मन्नेरवारलू समाज प्रामुख्याने औरंगाबादमध्ये आला. छावणी भागात हा समाज मोठ्या संख्येने राहतो. पूर्वीच्या काळात भातशेती, मजुरी हेच या समाजाचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत होते. आज हा समाज प्रामुख्याने गवंडी, सुतारकाम काम करून उदरनिर्वाह करतो. उदरनिर्वाहासाठी हा समाज कायम भटंकती करीत असल्याने पूर्वीच्या काळात या समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत अल्प होते. शिक्षणाचे महत्त्व लक्षात आल्यानंतर या समाजाने मुला-मुलींच्या शिक्षणावर भर दिला. आठवी-दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मुले कुटुंबाला हातभार लावण्याकरिता सुतार, गवंडी काम करीत असत. त्यामुळे शिक्षण अर्धवट राही. त्याचा फटका हा समाज आजही सोसत आहे. या समाजाची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी बहुतांश मुलांचे शिक्षण अर्धवट राहिले. आता या परिस्थितीत बदल होताना दिसत आहे. बहुतांश पालक मोलमजुरी करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत, असे संस्थापक अध्यक्ष मनोहर यादव व सचिव यशवंत यादव यांनी सांगितले. प्रमाणपत्राची मुख्य अडचण
मन्नेरवारलू समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात येतो. दरनिर्वाहासाठी कायम भटकंती करीत राहिल्याने या समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळवणे हे अत्यंत अवघड व किचकट झाले आहे. प्रमाणपत्राअभावी या समाजाला आरक्षणाचे कोणतेच लाभ मिळत नाहीत. शासकीय लाभापासून हा समाज अद्यापही मोठ्या प्रमाणावर वंचित आहे. मुला-मुलींनाही शिष्यवृत्ती व अन्य फायदे मिळत नाहीत. त्यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणातही अडसर ठरत आहे, अशी खंत सचिव यशवंत यादव यांनी व्यक्त केली.
निझाम राजवटीच्या काळापासून हा समाज औरंगाबादमध्ये राहतो आहे. या समाजाला एकत्रित आणण्याकरिता १९७५मध्ये महाराष्ट्र मन्नेरवारलू समाज संघटनेची स्थापना करण्यात आली. मनोहर यादव हे संस्थापक अध्यक्ष आहेत. शासनाची कठोर भूमिका व वेगवेगळ्या कायद्यांमुळे हा समाज आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहे. पूर्वजांचे प्रमाणपत्र, पन्नास वर्षांपूर्वीचा पुरावा असे काही पुरावे सादर करणे एक आव्हान ठरलेले आहे. त्याचा फटका या समाजाच्या युवा पिढीला बसत आहे. प्रमाणपत्रासाठीच्या अटी शिथिल केल्या, तर मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील, असे यशवंत यादव यांनी सांगितले.
विविध सामाजिक उपक्रम
मन्नेरवारलू समाज संघटनेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मुर्त्यालंबादेवी, पोतंम्बादेवी, यलम्मादेवी हे मन्नेरवारलू समाजाचे कुलदैवत. पूर्वीच्या काळात समाजातील विवाह सोहळे हे तीन दिवसापर्यंत चालत. पूर्वीपासूनच या समाजात हुंडा पद्धत नाही. विवाह सोहळ्याचा खर्च वधू-वर पक्ष आपापल्यापरीने करतो. अलीकडच्या काळात विवाह सोहळेही आटोपशीर पद्धतीनेच होत आहेत. त्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसत आहे. वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह सोहळ्याचे संघटनेतर्फे आयोजन केले जाते. गणपती, नवरात्र, सक्रांत असे उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरे केले जातात. तेलगू ही मातृभाषा असली, तरी आता हिंदी आणि मराठी हीच या समाजातील बोलीभाषा बनलेली आहे. या भाषेतूनच शिक्षण व व्यवहार करतात, असे यशवंत यादव यांनी सांगितले.
आखाडी पूजा
आषाढ महिन्यात मुर्त्यालंबादेवी देवीची पूजा हा समाज एकत्रितपणे उत्साहात करतो. यंदाही हा पूजा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक प्रशांत तारगे, मनोहर यादव, गजानन चॅम्पीयाल, सुभाष कॅदल, राजू पोतराज, विजय संकेत, शशिकांत गणपे, राजेश गोरे, दीपक गवल, मनोज एरपुले, पुरुषोत्तम कोमरे, संतोष गवल, आनंद पंदीकर, प्रीती दुबे, मंगला पंदीकर, विजया यादव, राणी नेरले आदी उपस्थित होते. ही परंपरा हा समाज ४२ वर्षांपासून नियमितपणे पाळत आहे.
महाराष्ट्र मन्नेरवारलू समाज संघटना कार्यकारिणीः संस्थापक अध्यक्ष मनोहर यादव, अध्यक्ष गजानन चम्पीयाल, उपाध्यक्ष शशिकांत गणपे, सचिव यशवंत यादव, सहसचिव मनोज यरपुले, पुरुषोत्तम कोमरे, कोषाध्यक्ष राजेश गोरे, सदस्य - दीपक गवल, राजेश दुबे, संदीप गुंडलेकर, गजानन मनोरे, बाबुलाल जुन्नाडकर, जितेश गंगावते, राजेश नित्यालू.
-
जातीचे प्रमाणपत्र मिळवणे हेच मोठे आव्हान मन्नेरवारलू समाजासमोर आहे. त्यामुळे शासकीय लाभापासून हा समाज वंचित राहात आहे. यात शिथिलता आणल्यास समाजातील युवा पिढीला फायदा होऊ शकेल. - मनोहर यादव, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र मन्नेरवारलू समाज संघटना
-
शिक्षणाकडे कल वाढल्यामुळे मुला-मुलींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आर्थिक कारणांमुळे शिक्षण अर्धवट राहाता कामा नये. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक सुटसुटीत करणे आवश्यक आहे. - यशवंत यादव, सचिव, महाराष्ट्र मन्नेरवारलू समाज संघटना
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट