म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
परतीचा पाऊस अजून शिल्लक आहे. यंदा जायकवाडी धरण शंभर टक्के भरेल. त्यामुळे मराठवाड्यात हक्काचे पाणी पेटवायचे काम नको. त्यासाठी समन्वय साधला पाहिजे, असे म्हणत पालकमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मवाळ भूमिका मांडत शिवजलक्रांतीची यशोगाथा सांगितली.
जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणी असले, तरी मराठवड्यातील इतर धरणे कोरडी आहेत. नगर व नाशिकची धरणे भरली असून, तेथून पाणी सोडून कालवे भरून घेतले जात आहेत. यावर पालकमंत्र्यांना विचारले असता त्यांनी एकदम मवाळ भूमिका घेतली. ते म्हणाले, पाणी पेटवायचे काम आता कमी केले पाहिजे. नगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यात पाण्याबाबत कोणताही वाद न करता शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मी असा मंत्री नाही की जेथे गेलो तेथे धरण भरतील असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यावर टोला मारला. यावेळी कदम यांनी शिवसेनेने दुष्काळात केलेली मदत वाटप; तसेच शिवजलक्रांतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, दुष्काळात शिवसेनेच्या वतीने २७ हजार शेतकऱ्यांच्या घरात धान्य पोचवण्यात आले. आरोग्य सुविधा, पाण्याच्या टाक्या वाटप, सामूहिक विवाह सोहळा आदी कार्यासाठी १५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली, तर शिवजलक्रांतीच्या माध्यमातून साडेपाच कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. शिवललक्रांतीच्या माध्यमातून कोणत्या तालुक्यात काय कामे झाली आहेत, किती जमीन ओलीताखाली आली, या बद्दलची सर्व माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याचेही कदम यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे तसेच अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पाणी, जलसाठा, खरिपाच्या आढावा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणारी बैठक पालकमंत्र्यांनी सुभेदारी विश्रामगृहावर उरकून घेतली. या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनातील मोजक्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना सांगणार
गेल्यावर्षी औरंगाबाद येथे मंत्रिमंडळ बैठकीची पूर्ण तयारी करण्यात आली होती. तयारी संदर्भात मी आढावाही घेतला होता, मात्र कुठे माशी शिंकली ते माहित नाही, पण बैठक रद्द करण्यात आली. बहुदा दुष्काळी परिस्थितीमुळे बैठक झाली नसावी. यंदा मंत्रिमंडळ बैठकीचा विषय आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट