नवरात्रौत्सवात देवीभक्तांना महाद्वारातूनच प्रवेश देण्यात यावा, या मागणीवर तुळजापूर येथील संघर्ष समिती ठाम आहे. त्यासाठी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणपतीचे विर्सजन करणार नाही, असा पवित्रा घेतल्याने राज्य सरकारकडून याप्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. सोमवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी घाटशीळ मार्गाची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षानिवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थितीत राहणार आहेत. दुसरीकडे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे त्यांच्या निर्णयावर ठाम असून एटीएस, खोचर समिती व आपत्कालीन व्यवस्था विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.
नवरात्रौत्सवात गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांना मंदिराच्या मागील बाजूने घाटशीळमार्गे प्रवेश देण्यात येत आहे. गेल्या वर्षी तुळजापुरातील व्यापाऱ्यांनी व पुजाऱ्यांनी या प्रकारास विरोध केला होता. परंतु, देवस्थान समितीने आपली हटवादी भूमिका पार पाडून भविकांना घाटशीळमार्गेच प्रवेश दिला. या मार्गे भाविकांना तीन किलोमीटरची आधिक वाटचाल करावी लागत आहे. त्याशिवाय त्याचा येथील व्यापारावरही परिणाम झाला. शिवाय देवस्थानच्या दर्शनी भागाचे महत्त्व लोप पावत चालले आहे.तुळजापूर देवस्थानच्या रूढी व परंपरेत देवस्थान समिती हस्तक्षेप करत असून, ही समिती भावनांशी खेळ करीत असल्याचा आरोप करीत तुळजापूर संघर्ष समितीच्यावतीने सहा दिवस उपोषण करून तुळजापूर बंदचे आयोजन केले होते. यासाठी तुळजापुरातील नागरिकांनी मोर्चा काढला होता.
भाविकांची व देवस्थानची सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन देवस्थान समितीने गतवर्षी नवरात्रौत्सवात भविकांना घाटशीळ मंदिरात प्रवेश मार्गे मंदिरात प्रवेश दिला. या व्यवस्थेबाबत भाविकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, या मार्गाची पाहणी एटीएस, खोचर समिती व आपत्कालीन व्यवस्था विभागान केली असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी नारनवरे यांनी स्पष्ट केले. रविवारी औरंगाबाद विभागाचे पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांनी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
दरम्यान, सोमवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी घाटशीळ मार्गाची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षानिवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थितीत राहणार असल्याने या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोनशे कोटी रुपयांचा निधी द्यावा
मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यासाठी ग्राम विकास विभागाने दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानंतर एटीएस, खोचर समिती व आपत्कालीन व्यवस्था विभागाने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे शक्य होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नारनवरे यांनी दिली.
मंदिराच्या सुरक्षिततेसाठी परिसरात १५० मीटरचा डी झोन तयार करण्यात यावा. रस्त्याचे रुंदीकरण करावे. परिसरातील अतिक्रमण काढून धोकादायक इमारती पाडाव्यात. त्यासाठी एटीएस, खोचर समिती व आपत्कालीन व्यवस्था विभागाने केलेल्या सूचनाची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत देणार आहोत.
डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट