आयुष्यभर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलताना, कुटुंबाला सावरताना, मुलांना समर्थपणे वाढवताना आणि त्याचवेळी अर्थाजनाचीही जबाबदारी पेलताना मल्टिटास्किंग महिलेची फरफट होत आहे. कुटुंबातील सर्वांची काळजी घेताना महिलेचे स्वतःच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. महिलेने स्वतःची काळजी नाही घेतली, तर संपूर्ण कुटुंबाचा कणाच मोडणार आहे, हे पुरते ध्यानात घेऊन प्रत्येक महिलेने शारीरिक-मानसिकदृष्ट्या ठणठणीत झाले पाहिजे, असा सूर नवरात्रोत्सवानिमित्त ‘मटा’ कार्यालयात आयोजित ‘राऊंड टेबल’मध्ये महिला डॉक्टरांमधून उमटला.
व्यायाम-श्रमातील फरक ओळखा
महिलांमध्ये व्यायामाचे प्रमाण अत्यल्प आहे. विशिष्ट वर्गातील काही टक्के महिला व्यायामाबाबत जागृत आहेत. मुळात शारीरिक श्रम आणि शारीरिक व्यायाम यामधला फरकच महिलांना माहीत नाही, मान्य नाही. आपण दिवसभर घरातील काम करतो म्हणजे व्यायामच करतो, असे त्यांना वाटते. मात्र, व्यायाम हा कामापेक्षा वेगळा आहे आणि तो तितकाच आवश्यक आहे, हे समजून घेणे आणि त्यानुसार नियमित व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे. त्यातच बहुतांश महिला स्थूलता वाढल्यानंतर, मानदुखी-पाठदुखी-कंबरदुखी सुरू झाल्यानंतर किंवा इतर कुठलातरी त्रास सुरू झाल्यानंतर व्यायामासाठी येतात.
– डॉ. रूपाली मुळे, फिजिओथेरपिस्ट
नियमित स्व-तपासणीला पर्याय नाही
स्त्री आरोग्यासारख्या महत्वाच्या विषयावर ‘राऊंड टेबल’ आयोजित केल्याबद्दल ‘मटा’ला मनापासून धन्यवाद. ‘ब्रेस्ट कॅन्सर’च्या क्षेत्रात काम करताना या क्षेत्रातील महिलांची चिंताजनक स्थिती जाणवल्याशिवाय राहात नाही. स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि पंचविशीपासून असे रुग्ण दिसून येतात. पहिल्या टप्प्यात ‘ब्रेस्ट कॅन्सर’चे निदान झाले, तर तो शंभर टक्के बरा होतो, ही जमेची बाजू लक्षात घेऊन प्रत्येक महिलेने ‘सेल्फ एक्झामिनेशन’ म्हणजेच स्तनांची नियमितपणे स्व-तपासणी केली पाहिजे. प्रत्येक गाठीचे निदान करून घेणे गरजेचे आहे. सगळ्या गाठी कर्करोगाच्या नसतात, हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र, कुठलीही गाठ असली तरी महिलांमध्ये प्रचंड भीती-लाज असते आणि त्यामुळे त्या डॉक्टरांकडे जात नाही. तसेच वयाच्या चाळीशीनंतरच मॅमोग्राफी करावी व ती वारंवार करू नये.
– डॉ. अरूणा कराड, ब्रेस्ट कॅन्सर तज्ज्ञ
बिघडलेल्या जीवनशैलीत दुरुस्ती गरजेची
आजघडीला बहुतांश आजार हे चुकीच्या जीवनशैलीशी-ऋतूचर्येशी निगडित आहेत आणि त्याला महिला अपवाद नाही. आज प्रत्येक आघाडीवर महिलांना धावपळ करावी लागते. त्यातूनच अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. सद्यस्थितीत महिलांमध्ये ‘हार्मोनल इम्बॅलन्स’, पाळीच्या समस्या, ‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज’ (पीसीओडी), वंध्यत्वाच्या समस्या वाढल्या आहेत. आम्ही कॉलेजमध्ये असताना आमच्यासोबतच्या मुलींचे वजन ५० किलोंच्या आत असायचे. आता बहुतेक तरुण मुलींचे वजन ६० किलोंपेक्षा जास्त असते. रजोनिवृत्तीनंतरच्या स्थूलतेचेही प्रमाण वाढले आहे. जंक फूडचे सेवन वाढले आहे आणि त्यामुळेही शरीराचे कुपोषण होत आहे. महिलांनी जीवनशैलीत-आहार-विहारात सर्वार्थाने बदल करणे गरजेचे असून, पंचकर्म, स्वेदन, बस्ती, शिरोधारा, नस्य यासारख्या उपाययोजना उपयुक्त ठरत आहेत.
– वैद्य अनघा नेवपूरकर, आयुर्वेदतज्ज्ञ
कॅन्सर रोखा अन् वेळीच उपचार करा
शहरांमधून ‘ब्रेस्ट कॅन्सर’ झपाट्याने वाढत आहे आणि ग्रामीण भागात अजूनही गर्भाशय-गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण खूप जास्त आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये भारत हा सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. ‘सायलेन्ट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ओव्हेरियन कॅन्सर’चे प्रमाणही लक्षणीय आहे. या कॅन्सरची कुठलेही लक्षणे दिसत नाही व त्यामुळेच तो दुर्लक्षित राहतो. योग्य काळजी घेतली तर ब्रेस्ट कॅन्सर व गर्भाशयाचा कॅन्सर टाळता येतो. स्तनांची स्वतपासणी नियमित केल्यास कोणतीही गाठ जाणवल्याशिवाय राहू शकत नाही. स्व-तपासणीबाबत शास्त्रीय व्हीडिओ उपलब्ध असून, महिला मंडळांच्या तसेच महिलांच्या कार्यक्रमांमध्ये असे व्हीडिओ दाखवून महिलांमध्ये जनजागृती केली पाहिजे. त्याचवेळी सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत केल्या जाणाऱ्या व खासगी रुग्णालयांमध्येदेखील अवघ्या १०० रुपयांमध्ये केल्या जाणाऱ्या ‘पॅपस्मिअर’ तपासणीद्वारे गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान होऊ शकते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे वैयक्तिक, परिसर व सार्वजनिक स्वच्छता हे अनेक आजारांना रोखणारे प्रभावी अस्त्र आहे, हे लक्षात घेऊन महिलांनी आपल्या कुटुंबाला सुदृढ केले पाहिजे.
– प्रा. डॉ. वर्षा देशमुख, स्त्रीरोगतज्ज्ञ विभाग, घाटी
महिलांमध्येही वाढतोय काचबिंदू
नोकरी-कुटुंब-मुलांना वाढवणे या सगळ्या धावपळीत महिलांमध्ये मानसिक ताणतणावही वाढत आहे. त्याचवेळी ज्याप्रमाणे टीव्ही-कम्प्युटर-मोबाइल गेम्सच्या अतिवापराने मुलांना चष्मा लागणे, डोळ्यांमध्ये कोरडेपणा येणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत. त्याचप्रमाणे शहरी महिलांमध्येही व्हॉटस्अप-सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या निरनिराळ्या समस्या निर्माण होत आहेत. चाळीशीनंतरच्या महिलांमध्ये काचबिंदूदेखील वाढत आहे. डोळ्यांतील प्रेशर वाढणे, कोरडेपणा वाढणे यासारख्या समस्याही महिलांमध्ये दिसून येतात. त्यामुळे प्रत्येक महिलेने चाळीशीनंतर आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
– डॉ. रेणुका देशपांडे, नेत्रतज्ज्ञ
आरोग्य जागृतीचे उपक्रम गरजेचे
कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे, मुलांचे संगोपन करणे, नोकरी-अर्थाजन करणे, या सगळ्या आघाड्यांवर काम करताना महिलांवरील ताण वाढत आहे. त्यातच घरघुती हिंसेचे प्रकारही वाढत आहेत आणि केवळ शिक्षणामुळे अशा प्रकारांवर आळा बसू शकत नाही. ग्रामीण भागातील महिलांची स्थिती तर अजूनच खराब आहे. त्यामुळेच महिलांच्या आरोग्य जागृतीचे कार्यक्रम-उपक्रम सर्वत्र व सातत्याने आयोजित करणे व त्यात अधिकाधिक महिलांना सहभागी करून घेणे खूप गरजेचे आहे.
– डॉ. मंजुषा शेरकर, बालरोगतज्ज्ञ
मानसिक आरोग्याला हवे प्राधान्य
पस्तीशीच्या महिलांमध्येही कॅल्शियम, बी-१२, व्हीटॅमिन डी व इतर अनेक आवश्यक घटकांची कमतरता दिसून येते. त्याचबरोबर महिलांमध्ये-गृहिणींमध्ये नैराश्यही वाढत आहे. मात्र, त्याविषयी महिलांमध्ये जागृती नाही. समुपदेशन हीदेखील आजची गरज आहे. त्याविषयी महिलांसह संपूर्ण कुटुंबात अनास्था आहे. चाळीशीनंतर तसेच मेनोपॉजनंतर महिलांचे मानसिक आरोग्य जपले जाणे गरजेचे आहे. महिलांचे मानसिक आरोग्य ठणठणीत राहिले तरच त्या कुटुंबाला पुढे नेऊ शकतील.
– प्रा. डॉ. माधुरी कुलकर्णी, फार्माकॉलॉजी विभाग, घाटी
शाळांमधून मुलींना हवे आरोग्य शिक्षण
अलीकडे वंध्यत्वाची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, वंध्यत्वाचे प्रमाण स्त्री-पुरुषांमध्ये समसमान आहे. पुरुषांमध्येही शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या वाढतच आहे. मात्र, तरीसुद्धा महिलांकडे बोट दाखवले जाते. एकीकडे अशी स्थिती आहे, तर दुसरीकडे लवकर वयात येण्याचे मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी-कमी होत आहे. हल्ली सातव्या-आठव्या वर्षीच मुलींची पाळी सुरू होत आहे. अनियमित पाळीच्या समस्याही लक्षणीय आहेत. याबाबत नेमकी कशी काळजी घ्यायची, वैयक्तिक स्वच्छता कशी राखायची, या विषयी फार कमी शास्त्रोक्त माहिती वयात येणाऱ्या मुलींना आहे. त्यामुळे शाळांमधून मुलींना आरोग्य शिक्षण दिले गेले पाहिजे.
– डॉ. अपूर्वा देशपांडे, स्त्रीरोगतज्ज्ञ
..तरच कुटुंबाचा कणा शाबूत राहील
अॅनेस्थेशियाच्या क्षेत्रात काम करीत असताना, १८ वर्षांच्या आणि पस्तीशीच्या गर्भवतीलाही भूल देण्याची वेळ येते. १८ वर्षांच्या मुलीला काहीही माहिती नसते आणि ती आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी कशी घेणार, असा प्रश्न पडतो. दुसरीकडे करिअरमुळे लग्नाला उशीर होणाऱ्या महिलांचे वजन ९०-९५ किलोंपर्यंत गेलेले असते, रक्तदाब वाढलेला असतो, मधुमेह असतो आणि अशा स्थितीत घाबरलेल्या महिलाही हमखास दिसत आहेत. मात्र, महिलांना उत्तम दृष्टीकोन असेल, तर त्या पतीशिवायही संपूर्ण कुटुंब सावरू शकतात. त्यामुळे महिलांमध्ये उत्तम-व्यापक दृष्टीकोन विकसित होणे गरजेचे आहे आणि असा दृष्टीकोन शिक्षणाशिवायही विकसित होऊ शकतो. अशा दृष्टी लाभलेल्या महिलांमुळे संपूर्ण कुटुंबच नव्हे तर समाजही पुढे जातो. अर्थात, महिलांनी त्यागाचे उदात्तीकरण न करता कालबाह्य त्यागाच्या कल्पनेतून बाहेर पडले पाहिजे आणि स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.
– डॉ. ज्योती तुपकरी, भूलतज्ज्ञ
‘पीएचसी’पासून दंतोपचार मिळावेत
महिला शिक्षित असली, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असली तरी तिला तिच्या आरोग्यावर पैसा खर्च करण्याची परवानगी असेलच असे नाही. हेच चित्र मुख आरोग्याबाबत दिसून येते. मुळातच मुख आरोग्याचा विषय दुर्लक्षित आहे. तो महिलांच्या बाबतीत आणखीनच दुर्लक्षित आहे व ग्रामीण भागातील महिलांची स्थिती तर नक्कीच वाईट आहे. ग्रामीण भागात तंबाखू सेवनाचे प्रमाणही महिलांमध्ये जास्त दिसून येते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये दंतोपचाराच्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजे.
– प्रा. डॉ. माया इंदूरकर, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय
‘कॉन्ट्रासेप्टिव्ह’बाबत हवी जनजागृती
अलीकडे तरुणी-महिलांमध्ये ‘एमटीपी’चे प्रमाण उल्लेखनीयरित्या वाढले आहे. याबाबतच्या धोक्यांविषयीची फारशी माहिती महिलांना नसते. त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात आणि समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरचा शोध सुरू होतो. ग्रामीण भागात आणखी स्थिती वाईट आहे आणि या प्रकारांचे दूरगामी परिणामही दिसून येतात. त्याचवेळी संततीप्रतिबंधक औषधी-साहित्याच्या माहितीचा अभावही महिलांमध्ये आहे. या संदर्भातील योग्य-शास्त्रीय माहिती शहरी-ग्रामीण महिलांना होणे गरजेचे आहे. या विषयी जगजागृतीपर उपक्रम झाले पाहिजेत.
– डॉ. ललिता बजाज, स्त्रीरोगतज्ज्ञ
‘रेसिपिएंट’ म्हणूनत सर्वांत मागे
मूत्रपिंडविकारग्रस्तांमध्ये महिला रुग्णांचे प्रमाणदेखील पुरुष रुग्णांच्या बरोबरीने आहे. मात्र, पुरुष रुग्ण आधी रुग्णालयात येतात आणि जसे-जेव्हा जमेल तेव्हा महिला रुग्ण येतात. जेव्हा मूत्रपिंडदान (किडनी) करण्याची वेळ येते, तेव्हा सर्वांत पुढे महिलाच असते. मग ही महिला कधी आई असते, कधी पत्नी, तर कधी बहीण असते. मात्र, महिलेला जेव्हा किडनी देण्याची व तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची वेळ येते तेव्हा फार कमी कुटुंबीय पुढे येतात. मूत्रमार्गाचा जंतुसंसर्गामुळेही महिलांमध्ये किडनी निकामी होण्याचे प्रमाण उल्लेखनीय आहे आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी पुरेशा सुलभ शौच्चालयांचा अभाव असणे हेही मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाचे महत्वाचे कारण आहे.
– डॉ. क्षीतिजा गाडेकर, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ
‘न्युट्रिशनल अॅनेमिया’ सर्वसामान्य
पॅथॉलॉजी क्षेत्रात काम करताना तरुणी-महिलांमध्ये ‘न्युट्रिशनल अॅनेमिया’ सर्वाधिक प्रमाणात दिसून येतो. मात्र त्याविषयी युवती-महिलांमध्ये जागृती नाही. अनेक महिलांमध्ये लहान वयापासूनच अॅनेमिया असतो. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना करणाऱ्या महिला फार कमी असतात. एकंदरीत ‘एचबी’, व्हीटॅमिन डी, बी-१२ आदी आवश्यक घटक कमी असण्याच्या समस्येकडे फारसे लक्ष न देण्याची वृत्ती सर्रास दिसून येते, जे सर्वथा चुकीचे आहे.
– डॉ. जया चाबुकस्वार, पॅथॉलॉजिस्ट
कुटुंबाचे करताना वाढतोय ताण
मुलांच्या शाळा-शिकवण्या-क्लासेस-अभ्यास यामध्ये महिलांची मोठी दमछाक होत आहे आणि त्यामुळे अनेक महिला सतत तणावग्रस्त राहतात. मुलांचे-कुटुंबाचे करून झाल्यानंतर वेळ मिळाला तरच स्वतःच्या आरोग्यासाठी एखादा व्यायाम-एखादी गोष्ट करण्याचा त्या विचार करतात. स्वतःसाठी एखादी बाब आवर्जुन करणे हे महिलांना मान्य नसते. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी त्यागाच्या भूमिकेत राहणे महिलांच्या आरोग्याचा बळी घेणारे ठरते.
– डॉ. प्रवरा जोशी, जनरल प्रॅक्टिश्नर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट