म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोपर्डीसारख्या संवेदनशील घटनेवर विरोधकांनी केलेले राजकारण हा गलिच्छपणा आहे. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी सर्वोत्तपोरी प्रयत्न करणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून त्यासाठी लागेल ते प्रयत्न केले जातील असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी व महिला बचत गटाच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीष महाजन यांच्यासह भाजपची नेतेमंडळी उपस्थितीत होती. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘गेली पंधरा वर्ष आघाडी सरकारने राज्यात सत्ता उपभोगली. मात्र, त्यांना कधीच मराठा आरक्षणाची आठवण झाली नाही. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्कारावा लागल्याने आरक्षणाची आठवण झाली. त्यावेळी राजकीय स्वर्थापोटी घाई-घाईने मराठा आरक्षणाचा ठराव घेतला. हा ठराव न्यायालयात टिकला नाही. त्या उलट भाजप सरकारने सत्तेवर येताच आरक्षणाचा कायदा मंजूर केला. या संदर्भात न्यायालयात सरकारच्यावतीने देशातील दिग्गज वकील नेमण्यात आले आहेत. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कटीबद्ध आहे.’
कोपर्डीसारख्या घटना दुर्देवी व निषेधार्थ आहेत. या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी याकरीता उज्ज्वल निकम यांच्या सारख्या वकिलांवर विश्वास ठेऊन सराकरने दोषरोपपत्र दाखल करण्याची भूमिका पूर्वीच ठरवली होती. परंतु, दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आंदोलनाचे इशारे काही जणांनी दिले. हा राजकीय गलीच्छपणा आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी आमदार तानाजी मुटकूळे, आमदार तुषार राठोड, माजी आमदार पाशा पटेल उपस्थितीत होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट