माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेचा अर्ज भरताना आधारकार्ड बंधनकारक केले होते. अनेक विद्यार्थ्यांनी आधारकार्ड काढले नसल्याने अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितल्याने मंडळाने मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेचा निकालापर्यंत आधारकार्ड सादर करावेत, अशा सूचना शाळांना दिल्याचे मंडळातील अधिकारी सूत्रांनी सांगितले.
मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. परीक्षेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना आधार क्रमांक भरणे बंधनकारक आहे. परीक्षा अर्ज भरण्याच्या काही महिन्यांपूर्वी हा निर्णय जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक मंडळाने काही दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १७ ऑगस्टपासून सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरताना नव्याने आधारकार्ड क्रमांकाचा रकाना समाविष्ट करण्यात आला आहे. आधारक्रमांक उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आधारकार्डचा क्रमांक देणे बंधनकारक केले. अनेक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नसल्याने विद्यार्थी, पालकांचा ताण वाढला होता.
याबाबत अनेक मुख्याध्यापकांनी मंडळाला कळविले होते. त्यावर मंडळाने निर्णयात सवलत देत, अर्जासोबत तात्काळ आधार क्रमांक देण्याची गरज नसल्याचे शाळा, ज्युनिअर कॉलेजांना कळविल्याचे कळते. फेब्रुवारी-मार्चपर्यंत किंवा निकाल जाहीर होईपर्यंत आधार क्रमांक शाळांनी कळवावेत, अशा सूचना दिल्या आहे.
३५ टक्के विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही
यंदापासून परीक्षा अर्जावर आधारकार्ड क्रमांक बंधनकारक करण्यात आला. आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया शाळास्तरावर सुरू आहे, तर अनेकांना आधारकार्ड मिळालेले नाही. प्रशासकीय पातळीवरून होत असलेल्या विलंबामुळे अद्याप ३५ टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट