जिल्हा परिषद मैदानावरील फटाक्यांच्या बाजाराला आग लागून अवघ्या ४० मिनिटांमध्ये फटाक्यांच्या दुकानांची शनिवारी (२९ ऑक्टोबर) राखरांगोळी झाली. याचे गंभीर परिणाम घटनास्थळाच्या दोन ते तीन किलोमिटपर्यंतच्या रहिवाशांवर होणार आहे. यामुळे एकूणच श्वसनविकार व दमा असणाऱ्यांचा त्रास वाढण्याची मोठी शक्यता असून, ‘रिअॅक्टिव्ह एअरवे डिस्फक्शन सिन्ड्रोम’चा (रॅडस्) त्रास सर्व वयातील व्यक्तींना आणि त्यातही लहान मुले व वृद्धांना होण्याची शक्यता असून, काळजी व वेळीच उपचार घेण्याचे आवाहन वैद्यकतज्ज्ञांनी केले आहे.
फटाका मार्केटला शहरातील सर्वांत मोठी आग लागून फार मोठे नुकसान झाले. याचे व्यापक परिणाम दिसून येत आहेत. यासंदर्भात श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश देशपांडे म्हणाले, ‘अशा प्रकारच्या घातक वायुच्या भडक्यामुळे ‘रिअॅक्टिव्ह एअरवे डिस्फक्शन सिन्ड्रोम’चा (रॅडस्) त्रास सर्व वयातील व्यक्तींवर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यातही घटनास्थळाच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंतच्या व्यक्तींना याचा सर्वाधिक त्रास होण्याची शक्यता आहे. परिणामी, घशात खवखव होणे, श्वसनमार्गाला सूज येणे, छाती भरून येणे, दम लागणे, गुदमरल्यासारखे वाटणे, कोरडा खोकला होणे, दम्याचा त्रास होणे किंवा असलेला दम्याचा त्रास वाढणे असे त्रास होऊ शकतात. असे वेगवेगळे त्रास होणाऱ्यांपैकी अनेकांना उपचारांची आवश्यकता भासू शकते.’
मुळात वातावरण बदलामुळे शहरात काही दिवसांपासून ‘ब्राँकायटिस’ वाढला आहे. त्यातच फटाक्यांच्या तीव्र घातक धुरामुळे एकूणच श्वसनविकार निश्चितच बळावणार आहेत आणि यातील काहींना रुग्णालयातदेखील दाखल करावे लागू शकते. त्यामुळे योग्य काळजी घ्या, त्रास होत असेल तर उपचार घ्या, असे आवाहनही डॉ. देशपांडे यांनी केले आहे.
कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. अतुल पोरे यांच्यानुसार, साध्या सर्दीपासून वेगवेगळ्या जंसुसंसर्गांचा त्रास होणे, रॅश येणे, तात्पुरत्या स्वरुपात बहिरेपणा येणे, असे विविध त्रास संभवतात. दम्याच्या रुग्णांनी स्वतःला जपणे खूप आवश्यक आहे. वेळच्या वेळी औषधे घेणे गरजेचे असून, गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अॅलर्जीमुळे होऊ शकतात नेत्रविकार
घातक वायुमुळे दोन किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या रहिवाशांना अॅलर्जीमुळे डोळे येणे, डोळ्यांना जळजळ होणे, डोळ्यांची आग होणे, खाज सुटणे असे वेगवेगळे त्रास होऊ शकतात. डोळ्यांच्या त्रासासाठी वारंवार थंड पाण्याने डोळे धुणे, गरजेनुसार नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, असे नेत्रतज्ज्ञ डॉ. अमित वांगीकर यांनी ‘मटा’ला सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट