दोन जिवलग मित्र, त्यांनी एकमेकांची साथ दिली व शेवटी सोबतच झाला. तालुक्यातील सावरगाव येथील भगवान विनायक काळे (वय ३५ हमु. सरस्वती कॉलनी) व बहिरगाव येथील किशोर किसनराव दाबके (वय ३८, हमु. शिवनगर), असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या एसयुव्हीला सोमवारी पहाटे उज्जैन-कोटा मार्गावर अपघात झाला. काळे हे जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते.
मिळालेल्या माहितीनुसार भगवान काळे हे औरंगाबाद येथे जिल्हा परिषद बालकल्याण विभागात कनिष्ठ लिपिक होते, तर किशोर दापके हे एका दुचाकी शोरूममध्ये व्यवस्थापक होते. भगवान काळे, किशोर दापके, तय्यब शहा, शेख रफिक, जफरखान जावेदखान हे पाच मित्र ९ डिसेंबर रोजी महिंद्रा एसयुव्ही ३००या वाहनाने (एम. एच.२० डी. जे.३८३९) तीन दिवसाचे नियोजन करून दिल्ली व उत्तर भारतात पर्यटनासाठी गेले होते. तेथून परत येत असताना उज्जैन-कोटा महामार्गावरील सुसनेरजवळ त्यांच्या वाहनाचा सोमवारी पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान, अपघात झाला. या अपघातात काळे व दापके यांचा मृत्यू झाला, तर इतर तिघे जखमी झाले आहेत. या अपघाताची पूर्ण माहिती समजली नाही.
ही माहिती कन्नड शहरात समजल्यानंतर सामजिक कार्यकर्ते, नातेवाईक व मित्र उज्जैनकडे रवाना झाले आहेत. भगवान काळे यांनी कन्नड येथे बालविकास प्रकल्पात दहा वर्षे काम केले आहे. ते सध्या जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पहात होते. बदली झाल्यानंतर ते औरंगाबाद येथे वास्तव्यास होते. त्यांच्या वडिलांचे लहानपणी व आईचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले, असा परिवार आहे. किशोर दाबके यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, विवाहित बहिणी, असा परिवार आहे.
प्रचार थांबवला
निधनाची माहिती समजताच नगरपरिषद निवडणुकीचा सरस्वती कॉलनी व शिवनगरमधील प्रचार थांबवण्यात आला. शहरातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, नागरिकांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट