म. टा. प्रतिनिधी, जालना
राज्यातील दिग्गज गायक-वादक कलावंतांच्या हजेरीमुळे आठ दशकांपासून अंबडचे वेगळेपण जपणारा श्रीदत्त जयंती संगीतोत्सवला तीन वर्षांपासून खंड पडला आहे. मराठवाड्याच्या समृद्ध वारसा जपणाऱ्या या महोत्सवामध्ये खंड पडल्यामुळे, एक समृद्ध सांस्कृतिक चळवळ लयाला जाण्याची शक्यता आहे.
अंबड येथे आठ दशकांपासून हा श्रीदत्त जयंती संगीतोत्सवाची ही परंपरा सुरू होत. गायनाचार्य गोविंदराव जळगावकर यांनी या समृद्ध परंपरेला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काही वर्षांनंतरच या महोत्सवाला मोठे रुप येत गेले आणि तीन-तीन दिवसांपर्यंत हा महोत्सव चालत होता. पहाटेपर्यंत चालणाऱ्या मैफली हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य होते. या महोत्सवासाठी मोठमोठे कलावंत अंबडला आले होते. महोत्सवाचा खर्च वाढत होता, तसे महोत्सवाला मदतीचा हात देणाऱ्यांचीही संख्या वाढत गेली. यामध्ये तत्कालीन आमदार विलासराव खरात, माजी मंत्री राजेश टोपे यांनीही मदत केली. अन्य स्थानिक दात्यांनीही या महोत्सवाला मदत केली. मात्र, संगीतोत्सवाचे स्वरूप वाढत असताना, वाढत्या खर्चाचा डोला सांभाळण्यामध्येही अडचणी येत गेल्या. विशेषत: गोविंदराव जळगावकर यांच्या निधनानंतर अडचणीत वाढल्या आणि महोत्सवामध्ये खंड पडला. राजेश टोपे यांनी या संगीतोत्सवाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला, अंबडला गायनाचार्य गोविंदराव जळगावकर नाट्यगृहाची भव्य इमारत उभारण्यात आली त्यात त्यांचा अर्धाकृती पुतळाही उभारण्यात आला होता.
‘तुम्हीही माझ्याकडे या!’
गोविंदराव जळगावकर यांनी सुरू केलेल्या या महोत्सवामध्ये मोठमोठे कलाकार सहभागी होत असले, तरीही ते विनामानधनच या महोत्सवामध्ये सहभागी होत असत. गोविंदराव जळगावकर स्वतः आग्रा घराण्याचे गायक होते. त्यांना संपूर्ण देशभरातून निमंत्रणे यायची. मात्र, या कार्यक्रमांसाठी त्यांनीही कधी कुणाकडून मानधन घेतले नाही. त्यांची अट एकच असायची, ते म्हणत ‘तुम्हीही माझ्याकडे या!’ ही सारी कलावंत मंडळी गोविंदराव जळगावकर यांच्या प्रेमाखातर विनामानधन सहभागी होत असत.
सहभागी कलावंत
या संगीत महोत्सवामध्ये अनेक दिग्गज कलावंत सहभागी झाली आहेत. पंडित राजन-सजन मिश्र, शंकरबापू अपेगावकर, उस्ताद सैदोद्दिन डागर, उस्ताद उस्मानखां, विमलाराजे देशपांडे, पंडित भाऊसाहेब दीक्षित, आरती अंकलीकर, उस्ताद सुल्तानखा, पंडित रोणू मुजुमदार, शौनक अभिषेकी, पंडित अजय पोहणकर, श्रुती सडोलीकर, डॉ. अश्विनी भिडे, पंडित राजा काळे, पंडित रूपक कुलकर्णी, पंडित मुकेश जाधव, पंडित प्रभाकर कारेकर,पंडित रामनारायण, उस्ताद शाहिद परवेझ, पंडित नाथराव नेरळकर, पंडित शिवदास देगलूरकर, पंडित राम बोरगावकर, हेमा उपासनी यांचा यामध्ये समावेश आहे.
श्रीदत्त जयंती महोत्सव हा ग्रामीण मराठवाड्यातील एकमेव सांस्कृतिक महोत्सव आहे. मात्र, वाढत्या खर्चामुळे तो बंद पडला आहे. आता हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने आणि सामान्य नागरिकांनीच पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. अंबडची ओळख श्री दत्त जयंती संगीतोत्सव आणि गायनाचार्य गोविंदराव जळगावकर यांच्यामुळे निर्माण झालेली असून, ती लुप्त होण्याची भीती आहे.
- महेश वाघमारे,
अप्पा जळगावकर यांचे भाचे
अंबड आणि जालना जिल्ह्यातील थोर सांस्कृतिक परंपरेचा वारसा जोपासना करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल. अंबड पालिकेच्या माध्यमातून हा संगीत महोत्सव कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी आमचे पूर्ण सहकार्य असेल.
- नारायण कुचे, आमदार, भाजप
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट