म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले खासदार आणि औरंगाबादचे सेनेचे पहिले महापौर मोरेश्वर दीनानाथ सावे (वय ८४) यांचे गुरुवारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी लीलावती, अनिल, अजित आणि अतुल ही मुले आणि अंजली ही कन्या, सुना-नातवंडे असा परिवार आहे. अंजली सिनेमागृहापासून शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मंगळवारी दुपारी सावे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. औरंगाबाद शहराच्या कला, क्रीडा, उद्योग, शिक्षण आणि राजकारणातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून सावे यांची ओळख होती. हैदराबाद मुक्तिसंग्रामातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरचे ते दोन वर्षे अध्यक्ष होते. औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून समर्थनगर वॉर्डातून ते निवडून आले होते. शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. महापौरपदाच्या कार्यकाळात शहराची निकड लक्षात घेता त्यांनी पाण्याच्या टाक्या उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर १४०० मीटर व्यासाच्या जलवाहिनीचा निर्णयही त्यांच्याच कार्यकाळात झाला होता.
'कर्मयोगी'
प्रा. डॉ. शरद भोगले, अध्यक्ष, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ
मोरेश्वर उपाख्य अण्णासाहेब सावे यांच्याशी माझी ओळख गेल्या ५३ वर्षांपासून आहे. १९६२मध्ये सावे यांनी औरंगाबाद शहरातील अप्सरा सिनेमा चालवायला घेतला होता. त्यांचे बंधू बाळासाहेब सावे, कै. केशवराव देशपांडे आणि अॅड. वसंत डंख या त्रयींबरोबर मीही सिनेमाचे परीक्षण आणि जाहिरातीचा मजकूर लिहिणे अशी कामे करीत असे. त्यातूनच अण्णांशी ओळख झाली. मैत्री वाढली, तारा जुळल्या. तब्बल पाच दशकं हा स्नेह टिकला. वारंवार भेटी आणि गप्पांमुळे आमचं एक उचापती मंडळ तयार झालं होतं. या मंडळाचा केंद्रबिंदू अर्थातच अण्णा असायचे. या मंडळात विविध व्यवसायांतील पंधरा जण सहभागी असायचे. चांगल्या कामांसाठी सार्वजनिक हिताच्या आणि समाजोपयोगी कार्यात हे मंडळ सहभागी होत असे. नादब्रह्म संगीत महोत्सवात पं. भीमसेन जोशी, बिरजू महाराज, बेगम परवीन सुलताना या दिग्गजांनी हजेरी लावली होती. संगीतातलं एक अक्षर किंवा स्वर न कळणारे उचापती मंडळाचे सर्व सदस्य घरचं लग्न असल्यासारखे राबत होते.
अंधांच्या क्रीडा स्पर्धा, टेबल टेनिस, बुद्धिबळाच्या स्पर्धा होत असत. जिथे जिथे अण्णा, तिथे तिथे उचापती मंडळाचे सदस्य तयार होत होते. खरेतर माझ्यातला निवेदक त्यांनीच ओळखला. गुणग्राहक म्हणून अण्णा प्रसिद्ध होते. नादब्रह्मच्या एका कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारे नियोजित निवेदक न आल्यामुळे अण्णांनी ही कामगिरी माझ्यावर सोपविली आणि पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले. गेल्या अनेक वर्षांपासून यानंतर शेकडो कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मी केले. उत्तम निवेदकाचा गुण त्यांनीच हेरला. मी त्यांचे ऋण कसे फेडू शकेन? गेल्या पाच दशकांत अण्णांनी विविध क्षेत्रं आपल्या कर्तृत्वानं गाजवली. बांधकाम कंत्राटदार म्हणून धरणे, कालवे आणि इमारती बांधल्या. चित्रपट प्रदर्शक म्हणून ते नावाले होते. औद्योगिक क्षेत्रात 'सवेरा' उद्योग समूहाने औषधनिर्माण, इंजिनिअरिंग, वाहतूक, करमणूक आदी क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी म्हणून नाव कमाविले आहे. सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. बिग इव्हेंट मॅनेजमेंटचे तंत्र त्यांनी अनुभवाने साध्य केले होते. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे त्यांनी केलेले नियोजन परिपूर्ण असायचे. अण्णा पुस्तकप्रेमी होते. वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांची ग्रंथसंपदाही वैविध्यपूर्ण होती. एखाद्या व्यक्तीचा व त्यांचा स्नेह जुळला की तो कायम राहतोच. साठ-साठ वर्षे ऋणानुबंध असलेल्या व्यक्तीचे दूरध्वनीवरून शुभेच्छा संदेश त्यांना येत होते आणि तेही तत्परतेने त्यांना प्रतिसाद देत होते. जुनी पत्रं, फोटो, निमंत्रणपत्रिका ते अगत्यपूर्वक सांभाळून ठेवत असे. पुस्तक, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतील कात्रणांचे महत्त्वाचे विषय, स्थानिक व देशभरातील घटना आदींची हजारो कात्रणे त्यांच्या संग्रहात होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट