म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. टंचाईवर मात करण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस आयुक्तालयातील देवगिरी मैदानावर आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. 'मराठवाड्यात भीषण टंचाई असून शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत, अन्नधान्य वाटप करत आहे,' सांगून पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नसून अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले याची नव्या पिढीने जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
ध्वजारोहणानंतर झालेल्या संचलनात पोलिस, भारत बटालियन, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेना आदींच्या १८ तुकड्या सहभागी झाल्या. सामाजिक न्याय, शिक्षण, वाहतूक, वनीकरण, आरोग्य विभागाचे चित्ररथ सामील झाले. एमआयटी आणि ज्ञानेश्वर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, सुभाष झांबड, महापौर त्रिंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, विषेश पोलिस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी, महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
समारंभात पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आलेले पोलिस अधिकारी प्रकाश कुलकर्णी आणि शशिकांत पाटील यांचा गौरव करण्यात आला. नक्षलग्रस्त भागात उत्तम कामगिरी बजावणारे १६ पोलिस अधिकारी, कर्मचारी, वाहतूक शाखा, सिटीचौक पोलिस ठाणे आणि वाळूज पोलिस ठाणे यांनी आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त केल्याबद्दल अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, नागनाथ कोडे, रामेश्वर थोरात आदींचा समावेश आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट