Abdulwajed.Shaikh@timesgroup.com
औरंगाबाद ः ‘स्पर्धेच्या युगात शासकीय कंपन्यांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सेवा आणि सुविधा वाढविण्यासाठी महापारेषणाचा कारभार अधिक चांगला करण्याची गरज आहे. मागील तीन वर्षांपासून आकृतीबंध तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे आगामी वीस वर्षांचे नियोजन होईल. राज्यात दरवर्षी नवे १५ उपकेंद्र सुरू करू,’ असे प्रतिपादन महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष राजीवकुमार मित्तल यांनी ‘मटा’शी बोलताना केले.
- आकृतिबंध तयार करताना तंत्रज्ञ आणि यंत्रचालक यांच्याबाबत तुम्ही काय विचार केला आहे?
- आकृतिबंध तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. हा आकृतिबंध तयार करताना पुढीच वीस वर्षांचा विचार केला आहे. यात प्रत्येक वर्गाचे काम, भविष्यात लागणारी गरज याचा विचार करून सध्या प्रारूप तयार करण्यात आले आहेत. यात आवश्यक तो बदल केला जाईल.
- कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा विचार होणार का?
- आकृतीबंध तयार करताना संघटनांच्या सूचनांची दखल घेतली जाईल. सध्याचे प्रारूप तुम्ही पाहिल्यास काही वर्गात जास्त कर्मचारी, तर काही वर्गात कमी कर्मचारी आहेत. या प्रारूपमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांचे नुकसान न करता त्यांचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे.
- भविष्याच्या दृष्टीने काय उपाययोजना आहे?
- २००० नंतर वीज क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले. वीज मंडळाचा एकछत्री कारभार संपुष्टात आला. महानिर्मितीसह रिलायन्स, टाटा आणि बेस्ट कंपन्या वीज निर्मितीच्या क्षेत्रात उतरल्या. त्यामुळे महापारेषणामध्ये कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. महापारेषणाचा सध्याचा व्याप मोठा आहे. कंपनीत १६८५९ कर्मचारी आहेत. हे कर्मचारी ६३३ उपकेंद्राच्या माध्यमातून वीज व्यवस्थेचे काम पाहतात. आगामी काळात दरवर्षी १५ उपकेंद्र अधिक वाढवावे लागतील. त्या दृष्टीने कामाचे नियोजन सुरू आहे.
- आकृतीबंधाचे काम केव्हापर्यंत पूर्ण होईल?
- आकृतीबंधाचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. संघटनांचे मत घेतल्यानंतर हा आकृतीबंध तयार करण्यात येईल. स्पर्धेच्या युगात भविष्याची गरज आणि सध्याचे मनुष्यबळ याचा विचार करून आकृतिबंध लवकरच सर्वसंमतीने लागू केला जाईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट