म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा भारिप बहुजन महासंघाचा माजी नगरसेवक अमित भुईगळ याच्यासह ६ पदाधिकाऱ्यांना शनिवारपर्यंत (२२ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहंम्मद यांनी मंगळवारी दिले.
‘मुंबईतील आंबेडकर भवन का पाडले’ असे म्हणत औरंगाबाद दौऱ्यावर आलेले राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ, उपाध्यक्ष श्रीरंग ससाणे, दिनेश साळवे, संदीप वाघमारे, प्रदीप इंगळे, गौतम गवळी व अन्य दोन महिलांनी सोमवारी मारहाण केली. रत्नाकर गायकवाड यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात अमित भुईगळसह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून अमित भुईगळसह ८ जणांना अटक केली असून, त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या आठ जणांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींच्या इतर साथीदारांना अटक करावयाची आहे, त्या साथीदारांची नावे व इतर माहिती घेणे आहे, त्यांच्यावर हल्ला करताना वापरण्यात आलेली चप्पल जप्त करावयाची आहे, त्यांच्यावर हल्ला करण्यामागाचा उद्देश काय होता, हल्ला करताना कोणते शस्त्र वापरले आहे का आदी बाबींची चौकशी करावयाची आहे. त्याचवेळी भुईगळ याच्याविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने अधिक तपास करावयाचा आहे. त्यामुळे ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात विनंती सहायक सरकारी वकील अॅड. बी. एम. राठोड यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने वरील सहा जणांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संशयित आरोपींतर्फे अॅड. बी. एच. गायकवाड, अॅड. संजय भिगारदेव, अॅड. एम. एन. देशमुख, अॅड. एस. एम. पटेल, अॅड. विलास वाघ, अॅड. प्रवीण कांबळे यांच्यासह २८ वकिलांनी काम पाहिले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकूण आठ जणांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्या दोन महिलांना कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची हर्सूल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
३०७ कलम रद्द करण्याची मागणी
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केल्याप्रकरणी लावण्यात आलेले संशयित आरोपींवरील ३०७ कलम मागे घेण्यात यावे या मागणीसाठी एका शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. पोलिस आयुक्तांनी घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करीत या कलमाबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले.
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर सोमवारी दुपारी भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हल्ला करीत मारहाण केली होती. मुंबईतील आंबेडकर भवन पाडण्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी भारिप बहुजनचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह सात जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दंगल करणे आदी कलमानुसार गुन्हे दाखल केले असून अटक केली आहे. आहे. खुनाचा प्रयत्न करण्याचे कलम ३०७ लावणे म्हणजे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. यावेळी आयुक्तांनी, आरोग्य तपासणी व प्राथमिक तपासानंतर कलमांचा विचार करण्यात येईल व यामध्ये कलम ३०८ लावता येईल का याचा पुनर्विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात पँथर्स रिपब्लिकनचे अध्यक्ष गंगाधार गाडे, प्रा. अविनाश डोळस, अॅड. अभय टाकसाळ, बुद्धप्रिय कबीर, रमेश खंडागळे, मिलींद दाभाडे, गौतम खरात, मिलींद बनसोडे, बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांच्यासह सुमारे १०० ते १५० कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते.
पोलिस आयुक्तांची नाराजी
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घडलेली घटना लज्जास्पद असून एका अतिमहत्त्वाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पत्नीसमोर मारहाण करणे चूक असल्याचे सांगितले. या घटनेमुळे राष्ट्रीय स्तरावर नकारात्मक संदेश गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या घटनेत पोलिसांही मारहाण करण्यात आली असल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा मारहाण करणाऱ्यामध्ये समावेश असल्याने दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.
तक्रार आल्यास विनयभंगाचा गुन्हा
रत्नाकर गायकवाड यांचा बचाव करण्यासाठी सरसावलेल्या त्यांच्या पत्नीला देखील मारहाण करण्यात आली. गायकवाड यांच्या पत्नीची तक्रार आल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत पोलिस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट